स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:30 PM2019-01-03T19:30:16+5:302019-01-03T19:45:15+5:30

महाराष्ट्रातल्या किल्ल्यावरील अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला २०० वर्षे पूर्ण होत आहेत.

two centuries completed for Decision to destroed fort in maharashtra | स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी

स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी

googlenewsNext
ठळक मुद्देइंग्रजांनी त्यांच्या राजवट संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले उद्ध्वस्त करण्यास सुरुवात होती केली

- नितीन ससाणे- 
जुन्नर : मराठी साम्राज्य ज्या गडकोट किल्ल्यांच्या आधारे उभे राहिले, किल्ल्यांच्या आधारावर ते टिकले ते किल्ले, त्यावरील वास्तु, तटबंदी, चोरवाटा, दरवाजे उद्ध्वस्त करून टाकून ब्रिटिश राजवटीने पुन्हा मराठा सरदार, मावळे यांनी किल्ल्यांचा आधार घेऊन संघटित होऊन आपल्याला विरोध करू नये, याची खबरदारी घेतली. यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यावरील अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. ऊन, वारा, पाऊस तसेच काळाच्या ओघात सध्या राज्यातील अनेक तसेच किल्ल्यांवरील वास्तूंची दुर्दशा झालेली दिसत असली तरी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी त्यांच्या राजवटीच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले उद्ध्वस्त  करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रात इंग्रजांनी पेशव्यांकडून जो मुलुख जिंकला त्यास मुंबई इलाख्यात समाविष्ट करण्यात आले. त्यावर कमिशनर म्हणून माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची नेमणूक करण्यात आली होती. तिसरे मराठा इंग्रज युद्ध झाले तरी दुसरे बाजीराव यांनी किल्ल्यांच्या आधारे इंग्रजांना विरोध करून जेरीस आणले होते. हे किल्लेच उद्ध्वस्त करावेत, असे एलफिन्स्टन याचे मत होते. त्याप्रमाणे इंग्रज अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या होत्या.  

 
जुन्नर परिसरातील शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, हरिश्चंद्रगड, कुंजरगड, नारायणगड हे सात किल्ले कसे उद्ध्वस्त केले गेले यासंदर्भात मोडी लिपीतील पत्रे भारत इतिहास संशोधक मंडळात उपलब्ध आहेत. अहमदनगर मुलुखाचे कलेक्टर हेन्री पॉटिंजर याने शिवनेरी किल्ल्याचा कमाविसदर रामराव नरसिंह याला लिहिलेल्या पत्रात पुण्यातून विष्णूसाहेब नावाचा इंजिनिअर किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी नारायणगडास आले आहेत. तसेच  कॅप्टन इस्टनससाहेब बहादूर आले आहेत. त्यास दूध वगैरे जो हमजीनस लागेल तो खूशखरेदी मोलास देत जाणे, कमत्ती न करणे, अशी ताकीद देण्यात आली होती. १८ डिसेंबर १८१८ रोजीचे हे पत्र आहे. इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला किल्ला जीवधनवरील नाणे घाटाकडील दरवाजा आजही पाहावयास मिळतो.          
  त्याचप्रमाणे कर्नल प्रॉथर, जनरल प्रिटझलर, कॅप्टन रोज, मेजर मूर या अधिकाऱ्यांनादेखील राज्यातील इतरत्र असणारे किल्ले उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कर्नल प्रॉथरने लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, प्रचितगड, सरसगड, शूरगड, सरसगड, राजमाची, कोरीगड, सुधागड या किल्ल्यांवरील वास्तु, तटबंदी, चोरवाटा, दरवाजे उद्ध्वस्त केले. जनरल प्रिट्झलर व कॅप्टन रोज, मेजर मूर यांनी अनुक्रमे सातारा व रायगड इलाख्यातील किल्ल्याना सुरुंग लावले. तर सर्वच किल्ल्यांवर जाणारे प्रमुख मार्ग उखडून टाकण्यात आले. 
.............
1ब्रिटिश राजसत्तेला भविष्यात स्थानिकांकडून  कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये, स्थानिकांनी किल्ल्याच्या आधारे कोणतेही सैन्यबळ जोपासू नये, त्यांनी संघटीत होऊ नये यासाठी बळ देणारे किल्लेच उद्ध्वस्त करण्याचे इंग्रजांचे नियोजन होते. 
.......
2छत्रपती शिवरायांनी डोंगरदºयांत घनदाट निबिड जंगलात असणारे किल्ले व शत्रुवर अचानक हल्ला करून शत्रूचे नुकसान करून पटकन किल्ल्याच्या सुरक्षित  आश्रयास जाण्याची युद्धपद्धती म्हणजे ‘गनिमी कावा’ याच्या आधारे बलाढ्य मुघल सत्तेला शह दिला होता. 
3थोड्याशा शिबंदीच्या पाठबळावर मराठा सैनिकांनी एका एका किल्ल्याच्या आधारे बलाढ्य शत्रूपक्षाला एक एक वर्ष झुंजायला लावल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळेच हे दुर्गवैभव नष्ट करण्याचे इंग्रजांचे नियोजन राहिले होते, असे इतिहास संशोधक व लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: two centuries completed for Decision to destroed fort in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.