‘तमाशा श्रेष्ठच’ ... उतरती कळा लागली टीकाही तथ्यहीन : बी. के. मोमीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 06:00 AM2019-02-10T06:00:00+5:302019-02-10T06:00:04+5:30

प्रपंच चालवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय केले, मात्र गाणी विकली नाहीत, तशीच दिली...

'Tamasha is the best' ... The decline has been criticized. Of Momin | ‘तमाशा श्रेष्ठच’ ... उतरती कळा लागली टीकाही तथ्यहीन : बी. के. मोमीन 

‘तमाशा श्रेष्ठच’ ... उतरती कळा लागली टीकाही तथ्यहीन : बी. के. मोमीन 

Next
ठळक मुद्देविठाबाई नारायणगावकर पुरस्कार मानकरी

- राजू इनामदार -   
पुणे: शिक्षण इयत्ता नववी, वय अवघे ११ वर्षे, कवठे (ता. शिरूर) गावातील गणपती उत्सवात कार्यकर्त्यांना काही गाणी हवी होती. ती नवव्या इयत्तेतील एका मुलाने तयार करून दिली. गाणी भलतीच गाजली. गावात सतत तीच गाणी धुमधडाक्यात वाजू लागली. मग एक गाणे, दुसरे, तिसरे आणि आता वयाची ७५ वर्षे झाली तरीही अजून सुरूच आहे. इतक्या वर्षांच्या या साधनेचा आता राज्य सरकारने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन सन्मान केला. लोकमान्यता तर होतीच आता राजमान्यता मिळाल्याचे समाधान आहे, या शब्दांत शाहीर बशीरभाई मोमीन उर्फ बी. के मोमीन यांनी विठाबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त केल्या. त्यानंतर लगेचच बशीरभाई गाणी लिहिण्यात दंग होऊन जातात. गाण्याचे त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत. प्रपंच चालवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय केले, मात्र गाणी विकली नाहीत, तशीच दिली. त्याची त्यांना खंत नाही तर अभिमान आहे.
 तमाशा कलेला उतरती कळा लागली आहे असे सगळेच कलावंत म्हणत असताना शाहीर मोमीन मात्र अशा बोलण्यात काही अर्थ नाही असे मत व्यक्त करत ते कसे बरोबर आहे ते पटवूनही सांगतात. तमाशा श्रेष्ठच आहे असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

--तमाशा आता चालत नाही, फड बंद पडत आहेत... 
मोमीन- तमाशा चालत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. चांगले किलहिले जात नाही म्हणून चालत नाही हे बरोबर आहे. मला आठवते पुर्वी गण, गवळण, वग असा तमाशा असायचा. उजाडले तरी रसिक वग संपल्याशिवाय उठत नाही. आता जमाना फास्ट झाला आहे. मग त्याप्रमाणे बदलायला नको का? नाटकं बदलली, चित्रपट बदलले मग तमाशानेही बदलायला हवे. जे बदलले नाहीत ते बंद पडले. ज्यांनी स्वत:त बदल घडवला ते टिकले. रघुवीर खेडकरांचा फड पाहा. सगळे कसे शिस्तबद्ध चाललेले असते. 
पण या बदलामुळेही मूळ तमाशा संपला असे म्हटले जाते..़? 
-याही टिकेत माझ्या मते काही अर्थ नाही. नाटक तरी आता पूर्वीप्रमाणे नटी, सुत्रधार असे होते का? मग तमाशाच मुळचा रहावा असा आग्रह का? बदलला म्हणजे त्यातले काय बदलले ते स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. लावणी, गाणी हा तमाशाचाच प्रकार आहे. फक्त गाणी सादर होतात, पण त्या गाण्यांचा बाज तमाशाचाच असतो. काही गाणी नसतात चांगली पण सगळ्याच गाण्यांना असे लेबल लावून चालणार नाही.
-तुम्ही कधीपासून गाणी लिहायला लागला. 
- मी गण, गवळण वगही लिहिलेत, पण गाणी जास्त लिहिली. वयाच्या ११ व्या वर्षी लेखणी हातात घेतली ती अजून खाली ठेवलेलीच नाही. किती गाणी झाली त्याची गणती नाही. दत्ता महाडिक यांनी माझी सर्वाधिक गाणी केली. भावना शब्दात पकडणे, मीटरमध्ये बसवणे, चपखल शब्दांची रचना करणे हे अवघड आहे. वगातील प्रसंगाला अनुसरून गाणी लिहावी लागतात. ती बसवावी लागतात. शब्द रोजच्या वापरातले व भावना मात्र कधीतरीच दिसणारी असे असले की ती गाणी चालतात. गुणगुणावीशी वाटतात.
-कोणकोणत्या तमाशासाठी गाणी लिहिलीत.
दत्ता महाडिक यांना सर्वाधिक गाणी दिली. चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर आणि अनेकजण. आता आठवतही नाही. मोमीनने लिहिलं, दत्ताने गायलं असे आमचे मैत्र होते. विरहाची, प्रेमाची, भेटीची, खाणाखुणांची अशी अनेक गाणी लिहिली. अजूनही लिहितो आहे. 
-हिंदी चित्रपटातील गाणी व तमाशातील गाणी यात काय फरक आहे.
- तमाशातील गाण्यांसाठी निरीक्षण लागते. ग्रामीण बाज लागतो. भावना सगळीकडे सारख्याच असल्या तरीही त्या व्यक्त करण्यात शहरी ग्रामीण असा फरक असतोच. मी नेहमी निरीक्षण करत असतो. त्यातून सूचत जाते. मग लिहितो. प्रयत्नपुर्वकही लिहितो व सुचते तेही लिहितो. हिंदी गाण्यांबाबत काय बोलणार? त्यांचे सगळेच वेगळे असते. 
- लावण्या लिहिल्या की नाहीत?
आजपण माझ्याकडे १५० लावण्या तयार आहेत. संगीतकार राम कदम यांच्याबरोबर माझा बराच उशिरा संपर्क आला. त्यांना काही गाणी लिहून हवी होती. त्यावेळी माझे नाव कोणीतरी सुचवले. मला पाहिल्यावर त्यांना वाटले हा काय लिहिणार, पण गाणी पाहिली आणि त्यांना पसंती दर्शवली. त्यानंतर आमचा दोस्ताना बराच वाढला.
रातराणीचा गंध बहरला, 
सजण येईना, चंद्र ढळला,
 झोप येईना, मदन पेटवी जीवा.
 यात विरह शब्दात पकडला आहे. अशी लावण्याही अनेक लिहून झाल्या.
पुरस्काराबद्धल काय भावना आहेत.
लोकमान्यता होतीच आता राजमान्यताही मिळाली याचे समाधान आहे. मी कधीही गाणी लिहून पैसे कमावण्याचा उद्योग केला नाही. गाणी लिहून होत गेली, ती सर्वांनाच देत गेलो. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माज्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळण्यासारखीच गोष्ट आहे. 

Web Title: 'Tamasha is the best' ... The decline has been criticized. Of Momin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.