संडे स्पेशल मुलाखत : अकराशे कोटींच्या तोट्यातून फायद्यात आलेली बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 07:00 AM2019-05-19T07:00:00+5:302019-05-19T07:00:12+5:30
वयाची शंभरी (१०८ वर्षे) पार केलेल्या राज्य सहकारी बँक तोट्याच्या गर्तेत सापडली होती. हा तोटाही थोडाथोडका नव्हे, तब्बल ११०० कोटींच्या घरात होता....
- विशाल शिर्के
वयाची शंभरी (१०८ वर्षे) पार केलेल्या राज्य सहकारी बँक तोट्याच्या गर्तेत सापडली होती. हा तोटाही थोडाथोडका नव्हे, तब्बल ११०० कोटींच्या घरात होता. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन, त्यावर प्रशासक नेमण्याची वेळ आली. मात्र, अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत हा तोटा भरुन, तब्बल ३१६ कोटींचा नफा मिळविण्याची किमया सध्याच्या बँक व्यवस्थापनाने केली आहे. बँकेच्या इतिहासातील हा सर्वोच्च नफा आहे. त्यानिमित्त बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्याशी '' लोकमत '' प्रतिनिधीने संवाद साधला.
* बँकेला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी काय केले ?
पूर्वी राज्य बँक म्हणजे केवळ जिल्हा बँका आणि साखर कारखान्यांना पतपुरवठा करणारी बँक अशी ओळख होती. बँकेच्या उपविधित बदल करुन, पतसंस्था, नागरी बँका आणि गृह संस्थांना देखील संचालक मंडळामध्ये स्थान दिले. त्यामुळे पतसंस्था आणि नागरी बँकांच्या ठेवी वाढल्या. ठेवी वाढल्याने कर्ज वितरणासाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळे बँकेच्या नफ्यातही वाढ झाली. अनुत्पादित कर्ज खात्यातील (एनपीए) अनेक कर्जदार न्यायालयात गेले होते. त्यांच्यासाठी एकरकमी कर्जफेड योजना आणली. न्यायालयाबाहेर तडजोड करुन कर्जवसुली केली. परिणामी एनपीएचे प्रमाण ७ वरुन १.१५ टक्क्यांवर खाली आले. कर्ज वसुलीसाठी साखर कारखान्यांच्या मालमत्तेची विक्र न करता, ते चालविण्यास दिले. असे आठ कारखाने चालविण्यास दिल्याने, कर्ज वसुली देखील झाली. या उपाययोजनांबरोबरच वायफळ खर्चात बचत करण्याचे धोरण स्वीकारले.
* बँकेच्या उत्पन्नवाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या?
बँकेच्या उत्पन्नामध्ये नक्की गळती कोठे होत आहे, याचा शोध घेतला. व्याज आणि दंड आकारणीत गल्लत झाल्याचे दिसून आले. त्यात सुधारणा केली. या शिवाय कायदेशीर बाबींवर अनावश्यक खर्च होत होता. बँकेच्या पॅनेलवर तब्बल १९० वकील होते. ती संख्या ६० पर्यंत खाली आणली. ट्रेझरी बिझनेसवाढीसाठी कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत १३ कोटी रुपयांचा नफा कमविला. पुर्वी कूलरच्या सफाईचे कामही बाहेरच्या व्यक्तीकडून केले जायचे. त्यासाठी शिपायांना प्रशिक्षण दिले. लहानसहान कामांवर होणाऱ्या खर्चात बचत झाली. बँकींग प्रणालीसाठी १२० कोटी रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा रद्द करुन, सध्याच्या संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यासाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च आला.
..............
बँकेच्या कामकाजात शिस्त आणताना, सहकारातील सर्वच घटकांना सामावून घेतले. एकरकमी कर्जफेड योजनेतून थकीत कर्जाची वसुली, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्वेच्छा निवृत्ती, अनावश्यक खर्चात केलेली बचत अशा प्रकारच्या विविध उपायांमुळे बँकेने तोट्यातून नफ्याच्या दिशेने वाटचाल केली.
विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
-------------------
११ ऑक्टोबर १९११ रोजी बँकेची स्थापना झाली. मार्च २०१९ अखेरीस बँकेच्या ठेवी १५,८४० कोटी असून, कर्जे १९,७०० कोटी रुपयांची आहेत. तर, एकूण व्यवसाय ३५,५४० कोटी रुपयांवर पोहचला आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य बँकेचा १२,५६६, गुजरात ११,९७८ आणि आंध्रप्रदेशाचा ११,५५७ कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. म्हणजेच तिन्ही राज्यांचा एकत्रित व्यवसाय एकट्या महाराष्ट्र राज्य बँकेचा आहे.
----------------