युतीत पुन्हा ठिणगी? भाजपचा नवा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:52 AM2019-06-05T02:52:29+5:302019-06-05T02:52:50+5:30

प्रत्येकी १३५-१३५ जागा : तर १८ जागा मित्रपक्षांना

Sparks again in the war? BJP proposes new proposal to Shivsena | युतीत पुन्हा ठिणगी? भाजपचा नवा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य

युतीत पुन्हा ठिणगी? भाजपचा नवा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य

Next

यदु जोशी 

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांना सोबत घेऊनही भाजपने ३०३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. महाराष्ट्रातही हाच फॉर्म्युला वापरायचा आणि शिवसेनेवर अवलंबून राहण्याची पाळीच येऊ द्यायची नाही, अशा हालचाली भाजपत सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप-शिवसेनेने प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात आणि उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना देण्याचा नवा प्रस्ताव भाजपकडून पुढे करण्यात आला आहे.

भाजपच्या या फॉर्म्यूल्याने शिवसेनेच्या भुवया उंचावल्या असल्या तरी अजून काही ठरलेलेच नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी असा फॉर्म्यूला शिवसेनेला मान्य नसल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढतील, असे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुगली टाकून लहान मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जातील आणि उर्वरित २७० जागांपैकी प्रत्येकी १३५ जागा भाजप-शिवसेना लढतील, असे जाहीर केले.

२०१४च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला १२२, रासपाला १ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. सात अपक्षांनी देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यात बहुमतासाठी १४५ जागा आवश्यक आहेत. युतीमध्ये १३५ जागा लढवायच्या आणि १३० पर्यंत जागा निवडून आणायच्या. मित्रपक्षांनाही कमळावर लढायला सांगायचे. त्यातील दहाएक जागा जिंकल्या की आकडा १४० पर्यंत जातो, जो बहुमताच्या जवळ असेल. २०१४ मध्ये सुरुवातीला शिवसेनेचा पाठिंबा नसूनही फडणवीस यांनी सरकार टिकविले होते. केंद्रात मिळालेल्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला १२५हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी होती. शिवसेनेकडील लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे जवळपास ४० आमदार आहेत.

मित्रपक्षांच्या हाती कमळ!
भाजपच्या मित्रपक्षांमध्ये रासपा, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पार्टी हे युतीमध्ये भाजपचे मित्रपक्ष आहेत. आमचे उमेदवार आमच्याच चिन्हावर लढतील, असे रासपाचे प्रमुख महादेव जानकर यांनी म्हटले असले तरी त्यांच्या उमेदवारांच्या हातीही कमळ देण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Sparks again in the war? BJP proposes new proposal to Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.