निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल; नराधम यापुढे असं कृत्य करणार नाही : मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 02:13 PM2017-11-29T14:13:05+5:302017-11-29T14:16:52+5:30

आपण त्या तरूणीला परत आणू शकत नाही, पण या निकालाने तिच्या आत्म्याला शांती मिळेल ,फाशीच्या या शिक्षेमुळे नराधम यापुढे असं कृत्य करणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. 

With this punishment, peace be upon the spirit of fearlessness; Naradham will not do this act anymore: Chief Minister | निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल; नराधम यापुढे असं कृत्य करणार नाही : मुख्यमंत्री 

निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल; नराधम यापुढे असं कृत्य करणार नाही : मुख्यमंत्री 

Next

मुंबई:  राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आपण त्या तरूणीला परत आणू शकत नाही, पण या निकालाने तिच्या आत्म्याला शांती मिळेल ,फाशीच्या या शिक्षेमुळे नराधम यापुढे असं कृत्य करणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. 

सरकारी वकील उज्वल निकम आणि सर्व चौकशी अधिका-यांचं अभिनंदन करतो, अनेक अडचणींवर आणि खटल्याला उशीर करण्याचा प्रयत्न होत असतानाही या खटल्याचा रेकॉर्ड वेळेत निकाल लागल्याबद्दल मी अभिनंदन करतो असं मुख्यमंत्री म्हणाले. 

सुप्रिया सुळे आणि निलम गो-हेंनी केलं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत-

 कोपर्डीच्या आमच्या पीडित भगिनीला अखेर न्याय मिळाला याचे आंतरिक समाधान आहे. माननीय न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे या वृत्तींना धरबंद बसेल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. दुसरीकडे या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी सुनावण्यात आल्याचे  शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही स्वागत केले. या निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल- धनंजय मुंडे

 कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल आणि हा निकाल उच्च न्यायालयात कायम राहील ही जबाबदारी राज्य शासनाची आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन या पुढे अशा घटनांना पायबंद बसेल. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे. हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत. या निकालासाठी प्रयत्न करणा-या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो असं मुंडे म्हणाले. 

तिघाही आरोपींना फाशी -

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (दि़ २९) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात तुडूंब गर्दी जमली होती. 

कोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) गतवर्षी १३ जुलै रोजी  सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या आजोबांच्या घरुन मसाला घेऊन परतत असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने पोलिसात फिर्याद दिली होती. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनेनंतर पळताना फिर्यादीने पाहिले होते. त्याची दुचाकीही घटनास्थळी आढळली. तो पुरावा घटनेत महत्त्वपूर्ण ठरला. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी तिनही दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती.
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयाने आज पप्पू शिंदे याला अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार (पोक्सो) दोषी धरले. दोष सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांना कट रचणे, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे या कलमांखाली दोषी धरण्यात आले. त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

घटनेनंतर 1 वर्षे चार महिन्यात निकाल-

नगर येथील  स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला़ जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला.

Web Title: With this punishment, peace be upon the spirit of fearlessness; Naradham will not do this act anymore: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.