MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 02:11 PM2018-05-24T14:11:10+5:302018-05-24T14:11:10+5:30

भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले.

MLC Election Shiv Sena has got remarkable success with effective planning | MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

Next

मुंबईः 'झीरो टू हिरो' म्हणजे काय, हे शिवसेनेनं आज विधानपरिषद निवडणुकीत दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा कार्यकाळ संपत असल्याने परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात दोन जागांवर आपला झेंडा फडकवून सेनेनं 'डबल धमाका' केला आहे. या विजयातून त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहेच, पण भाजपालाही इंगा दाखवला आहे.

शिवसेनेनं नाशिकमध्ये मिळवलेला दणदणीत विजय हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. कारण, ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला - अॅड. शिवाजी सहाणे यांना काँग्रेससोबत भाजपानेही पाठिंबा दिला होता. असं असतानाही, ६४४ पैकी ३९९ मतं मिळवून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. वास्तविक, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना आणि मित्रांचं संख्याबळ २१२ इतकंच होतं. परंतु, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सगळी जुळवाजुळव व्यवस्थित केली आणि राष्ट्रवादीसोबत भाजपाही तोंडावर आपटली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळ गटानं शिवसेनेला साथ दिल्यानं त्यांचं बळ चांगलंच वाढलं होतं. त्याशिवाय, भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ही जागा थोडक्यात गमवावी लागली होती. त्यावेळी भुजबळांनी राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांसाठी गणित जुळवलं होतं, यावेळी त्यांच्याच समर्थकांनी ते बिघडवलं, अशी चर्चा आहे. 

परभणी-हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद जास्त होती. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्राणी यांनी इथून सहज विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली. इथेच त्यांचं समीकरण बिघडलं आणि शिवसेनेचं भाग्य उघडलं. राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींनी आपली मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकली आणि विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली. भाजपाची मदतही इथे निर्णायक ठरली. विप्लव बाजोरिया यांना २५६ मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश देशमुखांना २२१ पर्यंत मजल मारता आली. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडेच ठेवली असती, कदाचित चित्र वेगळं असतं. पण त्यांची चूक सेनेच्या पथ्यावर पडली. 

तिकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद मतदारसंघात, नारायण राणेंनी राष्ट्रवादीच्या अनिकेत सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या राजीव साबळेंना पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव नक्कीच त्यांचा 'स्वाभिमान' दुखावणारा असला, तरी विधानपरिषेदतील संख्या दोनने वाढल्यानं त्यांची मान उंचावलीही आहे. या निवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदारांची संख्या ९ वरून ११ झाली आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने आपल्या अमरावती (प्रवीण पोटे) आणि चंद्रपूर (रामदास आंबटकर) या दोन जागा राखल्या आहेत.  

Web Title: MLC Election Shiv Sena has got remarkable success with effective planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.