मराठा क्रांती मोर्चा : आवाऽऽऽज मराठ्यांचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:43 AM2017-08-10T04:43:27+5:302017-08-10T04:43:53+5:30

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल, समितीला कॅबिनेट दर्जा देण्यात येईल, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही, असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने तातडीने घेतले.

Maratha Kranti Morcha: Voice of Marathas ... | मराठा क्रांती मोर्चा : आवाऽऽऽज मराठ्यांचा...

मराठा क्रांती मोर्चा : आवाऽऽऽज मराठ्यांचा...

googlenewsNext

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल, समितीला कॅबिनेट दर्जा देण्यात येईल, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही, असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने तातडीने घेतले अन् हक्काच्या लढ्यासाठीचा मूक आवाज सरकारदरबारी यशस्वीपणे पोहोचवण्याची किमया मराठ्यांनी लीलया साधली.

‘त्या’ कन्यांनी केले प्रभावित 
मुंबई : मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या पाच तरुणींचा उत्साह आणि आत्मविश्वास सर्वांनाच प्रभावित करून गेला. सहकारमंत्री सुभाष देशमुख त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी घेऊन आले. त्यापैकी दोन जणींनी मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल अतिशय प्रभावीपणे मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडली. फडणवीस मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील, विनोद तावडेंसह बहुतेक मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते, तसेच मराठा समाजाच्या विविध संघटनांचे नेतेदेखील या वेळी उपस्थित होते.

माथाडी सहकुटुंब मोर्चात सहभागी
नवी मुंबई : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून आलेल्या लाखो आंदोलकांच्या उपस्थितीमुळे नवी मुंबईसह पनवेलही मराठामय होऊन गेले. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होती.
व्यापारी व माथाडी कामगार सहकुटुंब आंदोलनात सहभागी झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले होते. आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांमुळे नवी मुंबई, पनवेलला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मोर्चातील माथाडी कामगारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सातारा, कोल्हापुरातून आलेल्या आंदोलकांच्या निवासाची, तसेच दहा हजार नागरिकांच्या जेवण व न्याहारीची सोय एपीएमसीमत केली होती. सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


रेल्वेमुळे रस्ते वाहतूककोंडी टळली
 मोर्चात सामील होणाºया आंदोलकांनी रस्तामार्गे प्रवास टाळून रेल्वेचा पर्याय स्वीकारल्याने, कल्याण-शीळ मार्ग असो की, ऐरोली-मुलुंड मार्गावर ‘मराठा क्रांती मोर्चा’करिता आलेली वाहने बुधवारी सकाळी फारशी दिसली नाहीत. ऐरोली ते
चेंबूर या महामार्गावर मात्र बाहेरगावहून येणाºया समाजबांधवांच्या गाड्या दिसून आल्या. हेच दृश्य ठाणे ते सायनदरम्यान दिसून आले.
 मुंबईकडे जाणारा वाहनांचा ओघ दुपारी १२पर्यंत सुरू होता. बंदोबस्तावरील वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन मोर्चातील वाहनांना होताना दिसले. त्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी जाणारी वाहने कुठेही थांबली नाहीत आणि सकाळी कार्यालयाकडे जाणाºयांचा खोळंबा झाला नाही. कसारा, कल्याण, ठाणे, डोंबिवली स्थानकांसह कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लोकल येताच ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणांनी ती स्थानके दुमदुमत होती. 

वाशीत टोल माफ
मराठा आंदोलनासाठी मुंबईमध्ये हजारो वाहने जात होती. टोल नाक्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी टोलची सक्ती करण्यात येत नव्हती. पोलिसांनीही टोल व्यवस्थापनाला टोलसाठी कोणाचीही अडवणूक करू नये व वाद होणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या होत्या.

सकाळी काही काळ ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर टोलवसुली सुरू होती. यामुळे काही काळ वाहतूक मंदावल्याने कोंडी झाली होती. मात्र, नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने टोलवसुली थांबविण्यात आल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. खारेगाव टोलनाका, आनंदनगर टोलनाका येथे मोर्चेकºयांकरिता अल्पोपाहाराची सोय केली होती. आनंदनगर टोलनाका ते कॅडबरी जंक्शनदरम्यान काही काळ वाहतूककोंडी झाली होती. तशीच कोंडी चेंबूरजवळ झाली होती. अन्यत्र शांततेत व सुरळीतपणे वाहतूक सुरू होती.

खारघरमधील सेंट्रल पार्क, पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, सीबीडी, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानासह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विशेष वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून आलेली २० हजारांपेक्षा जास्त वाहने या परिसरात पार्क केली होती. सर्व आंदोलक रेल्वे मार्गे रवाना झाले. मोर्चामध्ये माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधून हजारो कामगारांनी सानपाडा रेल्वे स्टेशनपर्यंत शिस्तबद्धपणे मोर्चा काढला.

 
मावळे शिवरायांचे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत, तसेच काही जणांनी त्यांच्याप्रमाणे वेशभूषा करत, मोर्चात सहभाग घेतला. शिवाजी
महाराजांचे हे मावळे आरक्षणासह आपल्या अन्य मागण्यांसाठी जोशात घोषणा देत होते.

मोर्चातील काही महत्त्वाच्या घोषणा...

हरियाणाला पाणी द्यायचे नाही, म्हणून पंजाबचे ४२ आमदार हातात राजीनामा घेऊन तयार झाले आणि आपल्या प्रश्नांसाठी मराठा समाजाचे १४७ आमदार हातावर हात ठेवून अजून किती दिवस बसून राहणार..?

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या गुरुजींचा क्लास लावला... सरसकट, तत्त्वत: या निकषांत शेतकºयाच्या गळ्याला फास लागला...!

हा मोर्चा म्हणजे म्हटले तर सूचना समजा, इशारा समजा आणि त्यापुढेही जाऊन आमची धमकी समजा...

लक्षात ठेवा राजकारण्यांनो.. मराठी समाज अजून जातीवर उतरलेला नाही.. तसा जर तो उतरला, तर महाराष्ट्रात कुणीच निवडून येणार नाही. मराठी समाजाच्या नेतृत्वाने समाजाशी गद्दारी केली, तर हा समाज तुम्हाला तुडविल्याशिवाय राहणार नाही.

आम्ही इंग्रजांना झुकविले आहे.. आम्ही ज्यांना सत्तेत बसविले, त्यांच्याच विरोधात लढायची वेळ आज आली आहे.

मराठा समाज एके काळी बागायतदार होता.. आता मात्र, १०० एकराचा मालक दहा गुंठ्यांचा धनी झालाय.

Web Title: Maratha Kranti Morcha: Voice of Marathas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.