मंचाऐवजी शेतकऱ्यांसमवेत बसून राहुल गांधी यांनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:10 PM2017-09-08T20:10:12+5:302017-09-08T20:10:29+5:30

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद साधला.

Instead of meeting the farmers, Rahul Gandhi had organized dialogue | मंचाऐवजी शेतकऱ्यांसमवेत बसून राहुल गांधी यांनी साधला संवाद

मंचाऐवजी शेतकऱ्यांसमवेत बसून राहुल गांधी यांनी साधला संवाद

googlenewsNext

परभणी, दि. 8 - पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद साधला. त्यामुळे एरंडेश्वरच्या शेतकरी संवाद कार्यक्रमाला एक भावनिक स्वरूप प्राप्त झाले होते. शेतक-यांनी मन मोकळा संवाद साधत राज्य शासनाविषयी संताप व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजी एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०० शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंचही उभारला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. दुपारी २.०५ वाजता खा.राहुल गांधी यांचे एरंडेश्वर येथे आगमन झाले. सुरुवातीलाच १३ शेतकºयांनी खा.गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर खा.गांधी मंचावर पोहचले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस बाला बच्चन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांची उपस्थिती होती. 

खा.अशोक चव्हाण यांनी अवघ्या पाच मिनिटांचे प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी शेतक-यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन केले. एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतक-यांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले. बालासाहेब काळे हे समस्या मांडत असतानाच खा.राहुल गांधी अचानक मंचावरुन उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतक-यांमध्ये येऊन चक्क मांडी घालून ते बसले. त्यानंतर शेतक-यांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गा-हाणे मांडत होते. काँग्रेसचे गट निरीक्षक तथा एरंडेश्वरचे रहिवासी असलेले प्रा.व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी खा. राहुल गांधी यांच्यासमोर शेतकºयांच्या समस्या मांडल्या. राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी खा.राहुल गांधी यांनी शेतक-यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे दहा हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनीही एकालाही कर्जमाफी मिळाली नाही, असे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी केंद्र शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन शेतक-यांना दिले. याच ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलाही उपस्थित होत्या. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.  खा.गांधी यांनी ३५ मिनिटे शेतक-यांशी संवाद साधला. या संवादात राज्य शासनाच्या धोरणांपासून ते सध्याची पीक परिस्थिती, पिकांना मिळणारा भाव, शेतक-यांच्या आत्महत्येची कारणे अशा विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. 

राहुल गांधी म्हणाले 

गुजरात राज्यात नॅनो कार प्रकल्पासाठी एका उद्योजकाला ६५ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते आणि कर्ज दिल्यानंतरही नॅनो कार मात्र दिसत नाही. या उलट महाराष्ट्रातील शेतकरी अनेक समस्यांनी वेढला असताना त्यांना कर्ज दिले जात नाही, ही समस्या गंभीर आहे. आम्ही ‘मन की बात’ नाही तर ‘दिल की बात’ करणारे सरकार आणू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

भाजप सरकारच्या निर्णयांमुळे व्यापारी, शेतकरी, मजूर आणि सर्व सामान्य नागरिकही आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडला. सुरुवातीला कॅशलेस व्यवहाराचे आवाहन करीत नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण देश रांगेत उभा राहिला. या निर्णयाने देशाला आर्थिक नुकसान पोहचविले. त्यानंतर काळे धन परत आणू असे आमिष दाखवून ९९ टक्के काळा पैसा पांढरा करुन घेतला. अलीकडेच जीएसटी कायदा देशभरात लागू केला असून या कायद्याने व्यापाऱ्यांंना देशोधडीला लावले आहे. बोटावर मोजण्याइतक्या उद्योगपतींचे भले करण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, असा आरोप करीत काँग्रेस हा शेतक-यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची भाषा समजतो. शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमाफीसाठी या शासनाला भाग पाडू, असे राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Instead of meeting the farmers, Rahul Gandhi had organized dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.