चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:47 PM2019-04-17T12:47:22+5:302019-04-17T13:05:39+5:30

कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही.

Failure of Congress to take good publicity : Suhas Palshikar | चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यां प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थकमहाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यताराफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये

पुणे : ‘‘मोदी विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताच राष्ट्रीय मुददा नसल्याने त्यांचा प्रचार स्थानिक पातळीवरच सुरू आहे. कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही. राहुल गांधी यांची स्विकारार्हता कमी आहे. काँग्रेसचा जाहिरनामा चांगला असला तरी तो जनतेपर्यंत पोहोचवायला कोणी नाही,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले. भाजपाच्या जागा २२० पेक्षा कमी निवडून आल्या तरच त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘2019 ची निवडणूक समजून घेताना’ या विषयावर पळशीकर बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यावेळी उपस्थित होते.


भाजपच्या प्रचार रणनितीविषयी बोलताना पळशीकर म्हणाले, की 2014च्या निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक राष्ट्रीय मुद्यांवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. या विषयांवर बोलण्यासाठी पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांकडे मुद्दे नसतात. या रणनितीपुढे प्रादेशिक पक्षांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. बिजु जनता दलाच्या नवीन पटनायक यांना केंद्रातल्या निवडणुकीसाठी तुम्ही हवा तो विचार करा, राज्यात मात्र आम्हाला मत द्या, असे आवाहन करावे लागते, यावरुन हे स्पष्ट होते. हिंदूत्त्व, राष्ट्रवाद, सुरक्षा या प्रश्नांपुढे प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवा, हे ठसवण्याचा मोदींचा प्रयत्न असतो. 
मोदींच्या निवडणुकीच्या प्रचाराची विकास, राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद ही त्रिसूत्री आहे. केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणे अवघड जाईल हे मोदींना माहिती आहे. देशापुढचे प्रश्न जटील असून ते सोडविण्यासाठी देवदूत आला असल्याचे भावनिक वातावरण निर्माण करण्यात मोदींना २०१४ मध्ये यश आले. त्यांच्या या प्रतिमेला अद्यापही तडा गेलेला नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत आणि भारताबददल आमच्या खेरीज कुणालाच प्रेम नाही हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे ‘पुलवामा'तला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेतला गलथानपणा होता, यापेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात आहे, त्यानंतर हवाई हल्ले करुन कसे प्रत्युत्तर दिले, हेच सूत्र जनमानसात रुजवण्यात मोदी यशस्वी ठरले. मात्र निवडणूका टप्प्यांमध्ये होणार असल्याने याही मुद्यांचा प्रभाव आता ओसरला आहे, याकडेही पळशीकर यांनी लक्ष वेधले.  
...................
पळशीकर म्हणतात
* राफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. ‘काहीतरी झालं असेल पण मोदींनी काही केले नाही,' हीच मतदारांची मानसिकता आहे.
* मनसेचे नेते राज ठाकरे आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्यावर मर्यादा आहेत.
* ‘मोदी पंतप्रधान व्हावेत,’ असे भाजपाचे नसलेल्या मतदारांनाही वाटते. समर्थक यांना वाटते. ‘दुसरे कोण आहे,' अशी संभ्रमाची अवस्था त्यामागे आहे. हा भाजपासाठी ‘प्लस पॉईंट’ आहे 
* उत्तरप्रदेशात भाजपच्या 30 ते 40 जागा कमी होऊ शकतात. निरर्थक भीती
मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थक असल्याचे मत पळशीकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जे मोदी दोन निवडणुका जिंकू शकतात ते तिसरी निवडणूकही जिंकू शकतील. मग त्यांनी निवडणूक न घेण्याचे कारण काय?
‘बहुजन वंचित’चा फटका काँग्रेस आघाडीला?         
महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढण्यामागे प्रकाश आंबेडकरांचे विधानसभेचे गणित असू शकते. वंचित आघाडीतल्या एमआयएमसोबत कॉंग्रेस गेली असती तर त्यांच्यासाठीही तो आत्मघात ठरला असता. 

Web Title: Failure of Congress to take good publicity : Suhas Palshikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.