एक्सप्रेस-वे: मुंबईकडे जाणारी वाहने एक तासाच्या अंतराने सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 12:19 PM2017-12-24T12:19:14+5:302017-12-24T13:03:26+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्टयांमुळे आज दुसर्या दिवशीही झालेली वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट जवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलीसांनी घेतला आहे.
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्टयांमुळे आज दुसर्या दिवशीही झालेली वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट जवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलीसांनी घेतला आहे. एक एक तासाच्या अंतराने ही रोखलेली वाहने पुन्हा सोडण्यात येणार आहेत. या एक तासाच्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरुन सोडण्यात येणार असल्याचे महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.
सलग सुट्टयांमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुसर्या दिवशी देखिल खंडाळा ते आडोशी बोगदा दरम्यान व खालापुर टोलनाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लाख प्रयत्न करुन देखिल वाहनांची संख्या वाढल्याने ही कोंडी सुटत नसल्याने यावर पर्याय म्हणून द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने लोणावळा एक्झिटजवळ थांबविण्यात येणार आहे. यापैकी लहान वाहने लोणावा शहरातून सोडण्यात येतील व अवजड वाहने पुर्णपणे थांबविण्यात येणार आहे. एक एक तासाच्या अंतराने ही वाहने सोडण्यात येतील. या दरम्यान मुंबईकडून येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गीकांवरुन सोडण्यात येणार आहे. याकरिता महामार्ग पोलीसांचा ताफा द्रुतगतीवर तैनात करण्यात आला आहे.