वनस्पती विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:40 AM2018-05-22T07:40:57+5:302018-05-22T07:40:57+5:30

आपण जे अन्न खातो यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पती या गवतवर्गीय आहेत.

Diversity of plants | वनस्पती विविधता

वनस्पती विविधता

googlenewsNext

महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीमुळे, हवामानामुळे वनसंपदा विषम आणि भिन्न स्वरूपाची आहे. अनेक वैविध्यपूर्ण वनस्पतींनी नटलेले आपले राज्य आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या वेगवेगळ्या विभागांमध्ये मिळून १८७ कुळांतील १ हजार ८१ जातींच्या तीन हजार २५ प्रजाती सापडतात. यामध्ये लेगुम कुळातील १७६, सूर्यफुलाच्या कुळातील ५७, कारवी कुळातील ४०, कॉफी कुळातील ३८, रुई कुळातील २५, स्क्राफुलारीसी कुळातील २४, तुलसी कुळातील २२ वनस्पती, गवतवर्गीय वनस्पती १०४ आणि समृद्ध जंगलाचे निर्देशांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आॅर्किडस् कुळातील ३४ वनस्पतींची नोंद झाली आहे. यामध्ये नवनवीन प्रजातींची भर पडतेच आहे. याशिवाय अल्गी, फंगी, नेचेवर्गीय याही वनस्पती येतात.
आजमितीला अंदाजे २५ जाती आणि ६९४ प्रजाती भारतात सापडत असलेल्या प्रदेशनिष्ठ वनस्पती असून, त्यापैकी आठ जाती आणि १५७ प्रजाती महाराष्ट्रात प्रदेशनिष्ठ आहेत. आपण जे अन्न खातो यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पती या गवतवर्गीय आहेत. दुर्दैवाने गवताळ भूप्रदेशांना आपण पडीक दुर्लक्षित जमीन समजतो; पण या पड जमिनीवर वैशिष्टपूर्ण वनस्पतींची विविधता आढळून येते. याच जमिनीवर गवताचे निर्मूलन करून सध्या मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात येत आहे. जैवविविधतेमध्ये विविध खाण्यायोग्य वनस्पती भाजीपाला, कडधान्ये, वेलवर्गीय यांचाही समावेश होतो. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून हायब्रीड बियाणांचा सुळसुळाट झाला आहे. त्याच्या परिणामी पारंपरिक बी-बियाण्यांचा झपाट्याने ºहास होत आहे. गावरान आंब्यामध्ये चव, रंग, वास आकार अशी विविधता सापडते. रानमेव्यामध्ये जांभूळ, करवंद, फणस यातही विविधता आढळते.
शाश्वत जैवविविधता संवर्धनासाठी या विविध गावठी वाणांचे बीज संकलन ते रोपवाटिका निर्माण करणे ही एक चळवळ बनली पाहिजे. गावठी काशी भोपळा, गावरान भेंडी-वांगी, टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय गावठी पडवळ, दोडका, गिलका, काकडी, वाले, पोकळा, लाल मठ, तसेच कंदभाज्या, रानभाज्या हे सर्व स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे आहेत, तसेच खाण्यासाठीदेखील रुचकर आणि पौष्टिक आहेत; मात्र हे सर्व लयाला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ममताबाई भांगरे, शांताबाई धांडे, राहीबाई पोपरे यांनी गावरान वाणांचे परंपरेने संवर्धन केले आहे. त्यांचे हे काम उल्लेखनीय व अनुकरणीय आहे. बाएफ या संस्थेने याकामी पुढाकार घेऊन अकोले तालुक्यातील आदिवासी महिलांना संघटित व प्रोत्साहित केले आहे.
भारताचा विचार केला, तर पूर्व हिमालय व पश्चिम घाट हे दोन जैवविविधतेने समृद्ध हॉट स्पॉट आहेत. उच्च प्रतीची प्रदेशनिष्ठता, नवीन प्रजातींचा शोध आणि मानवी हस्तक्षेप यामुळे हे दोन भाग अतिसंवेदनशील आहेत. यापैकी अरबी समुद्राला समांतर डोंगररांगांना आपण पश्चिम घाट संबोधतो. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू व केरळ या सहा राज्यांचा समावेश होतो. पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील पर्वतरांगांना आपण सह्याद्री असे म्हणतो. यामध्ये नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो. या ठिकाणी कंदिलपुष्प (शिरोपेजीया) या दुर्मिळ संकटग्रस्त वेलवर्गीय वनस्पतीची कमालीची विविधता आढळून येते. फ्रेरिया इंडिका ही दुर्मिळ वनस्पती सह्याद्रीत सापडते. दक्षिण पश्चिम घाटातील सातारा-सांगलीच्या पूर्व भागात पावसाच्या कमी प्रमाणामुळे वनस्पती विविधतापण कमी आहे. महाराष्ट्र, तसेच विदर्भ, खान्देश या ठिकाणीदेखील पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. त्याचा परिणाम शेतीवर, आर्थिक-सामाजिक जीवनावर होत आहे. याला तेथील भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. शेतीमधील बदललेली पीकपद्धती व गेल्या २० वर्षांत पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याने भूगर्भाताील पाण्याची पातळीदेखील झपाट्याने खालावत आहे. यासाठी वॉटर शेड मॅनेजमेंटबरोबरच व्यापक प्रमाणात सुसंगत देशी झाडे लावणे व जैवविविधतेची जपणूक करणे, जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. सह्यादी ही प्राचीन पर्वतरांगप्रणाली असून, सह्याद्रीतून अनेक नद्यांचा उगम झाला आहे. त्यामुळे येथील धरणे भरतात. शेती, विद्युत प्रकल्प, तसेच आर्थिक-सामाजिक जीवनमानात सह्याद्रीचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. येथे अनेक दुर्मिळ संकटग्रस्त औषधी वनस्पती, तसेच जैवविविधतेने समृद्ध देवराया आढळून येतात; पण खूपशा देवराया या विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्राचा विचार करता देवराया या घाटमाथा, तळकोकण व घाटाच्या पूर्वेकडील उताराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आहेत. देवराई ही औषधी दुर्मिळ, संकटग्रस्त वनस्पतीचे आश्रयस्थान असते. देवराईतील झाडे ही तेथील जमिनीवर छत्र तयार करतात. त्यामुळे पावसाचा मारा भूभागावर प्रत्यक्षपणे होत नाही.
वनस्पती हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. वैश्विक तापमानवाढ, वातावरण बदल या जागतिक समस्या मानवी हस्तक्षेपामुळे, हव्यासामुळे निर्माण झाल्या आहेत. वनस्पतीची विविधताच आपणाला यातून तारणार आहे. हे आपण सदैव ध्यानात घेतले पाहिजे. जैवविविधतेबाबत आपण जगात सातव्या क्रमांकावर आहोत, ही गौरवशाली बाब आहे. हे टिकविण्यासाठी कमी होत जाणारे जंगलक्षेत्र वाचविणे आणि वनस्पती विविधता अबाधित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.
चौकट
केवळ १४ टक्के जंगलक्षेत्र
पाणी संवर्धनासाठी झाडे, जैवविविधता व वनस्पती शास्त्राचा व्यवहार्य व डोळसपणे अभ्यास करणे ही खरी गरज आहे. राष्टÑीय वन धोरणानुसार आपल्या देशामध्ये ३३ टक्के जंगल क्षेत्र असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात हे क्षेत्र अवघे १४ टक्के आहे. नैसर्गिक जंगल निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. आज मानवी हस्तक्षेपामुळे वनस्पती जैवविविधतेचा ºहास मोठ्या प्रमाणात होतो आहे. जमिनीचा वापर पद्धती, अशाश्वत खाणकाम, बेलगामपणे चालत असलेले पर्यटन, वनवा, रस्ते, लोहमार्ग, अधिवास आकुंचन, वाढते उद्योगीकरण, अशाश्वत शहरी विकास, बाहेरून आलेल्या तणांचा वाढता प्रादुर्भाव, एकसुरी झाडांची लागवड आदी बाबी याला कारणीभूत आहेत.
- सुहास मारुतराव वायंगणकर
कोल्हापूर

Web Title: Diversity of plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.