सुपर ४० विद्यार्थी घडविणाऱ्या धोरणावर शासन उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:04 AM2019-07-19T04:04:53+5:302019-07-19T04:05:01+5:30

राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्षी सुपर ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण सर्वसुविधांसह ५ शासकीय विद्यानिकेतनमधून मोफत दिले जाते़

Government disappointed on Super 40 student policy | सुपर ४० विद्यार्थी घडविणाऱ्या धोरणावर शासन उदासीन

सुपर ४० विद्यार्थी घडविणाऱ्या धोरणावर शासन उदासीन

Next

- धर्मराज हल्लाळे 
लातूर : पाचव्या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्षी सुपर ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण सर्वसुविधांसह ५ शासकीय विद्यानिकेतनमधून मोफत दिले जाते़ मात्र गेल्या काही वर्षात शासनाने आपल्याच गुणवत्तापूर्ण धोरणाबद्दल उदासीनता दाखवत एका विद्यार्थ्यांमागे ५०० रूपयांचे तुटपुंजे अनुदान कायम ठेवले असून, ५० टक्के रिक्त जागांकडेही लक्ष नाही.
ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना सर्वसुविधांसह मोफत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ़ मधुकरराव चौधरी यांनी १९६६ मध्ये शासकीय विद्यानिकेतने सुरू केली़ ज्या विद्यानिकेतनांचे प्राचार्य पद ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि़वि़ चिपळूणकरांसारख्या विद्वानांनी सांभाळले़ अनेक प्राचार्य नंतरच्या काळात राज्याचे शिक्षण संचालक झाले़ सद्य:स्थितीत अमरावती, औरंगाबाद, धुळे, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) येथे शासकीय विद्यानिकेतने आहेत़ जिथे ६ वी ते १० वी पर्यंत निवास, भोजन या सुविधांसह मोफत शिक्षण मिळते़ प्रत्येक वर्गात ४० या प्रमाणे २०० विद्यार्थी क्षमता आहे़ अमरावतीच्या विद्यानिकेतनमध्ये आज १५० विद्यार्थी आहेत़ तर धुळ्यात ७३, औरंगाबाद १०८, पुसेगाव ६७, केळापूरला ११४ विद्यार्थीच प्रवेशित आहेत़ सहावीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही प्रमाणात संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे़
सुपर ४० चे गणित बिघडले़़़
ज्यावेळी विद्यानिकेतने सुरू झाली त्यावेळी गुणानुक्रमे सुपर ३० विद्यार्थ्यांची निवड होत असे़ त्यात १० आदिवासी विद्यार्थी समाविष्ट करून संख्या ४० वर आहे़ सुपर ३० चित्रपटातील विद्यार्थी ज्या पार्श्वभूमीतून येतात, त्याच परिस्थितीतून आलेल्या सुपर ४० विद्यार्थ्यांचे गणित उदासीन धोरणाने बिघडले आहे़ ५०० रूपयांत निवास, भोजन खर्च भागविणे हा मोठा खर्च आहे़ गेल्या महिन्यात शासनाने आश्रमशाळा अनुदानात वाढ केली, त्याच धर्तीवर विद्यानिकेतनकडे पाहिले पाहिजे़
ना शिक्षक, ना सुविधा...
धुळ्यात १२ शिक्षक मंजूर आहेत चारच़ विद्यार्थ्यांसाठी १६ शौचालये त्यातील एकच सुरू़ विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळणेही अवघड़ औरंगाबादमध्ये आठच शिक्षक़ माजी विद्यार्थी संघटनेच्या मदतीने काही सुविधा मिळाल्या़ बांधकाम खात्याने इमारतीची डागडुजी केली आहे़ पुसेगाव (सातारा) येथेही माजी विद्यार्थ्यांनी शाळेला रंगरंगोटी केली़ मात्र इमारतीच्या देखभालीकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे़ केळापूर (यवतमाळ) येथेही पाचच शिक्षक आहेत़ तुलनेने अमरावतीची विद्यानिकेतन इमारत सुसज्ज आहे़
>मुलींचे विद्यानिकेतन नाही...
१९६६ ला सुरू झालेल्या औरंगाबादच्या विद्यानिकेतनला दिवंगत पंतप्रधान पी़व्ही़ नरसिंहराव यांनी ते केंद्रात मंत्री असताना भेट दिली होती़ राज्य शासनाची सुपर ३० ची संकल्पना त्यांना आवडली़ त्यानंतर देशभर जवाहर नवोदय विद्यालये स्थापन झाली़ जेथून प्रेरणा मिळाली ती विद्यानिकेतने मात्र आज मोडकळीला आली आहेत़ विशेष म्हणजे १९६६ साठी केवळ मुलांसाठी सुरू झालेली विद्यानिकेतने अजूनही मुलींसाठी सुरू होऊ शकली नाहीत़

Web Title: Government disappointed on Super 40 student policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.