कोल्हापूरच्या पर्यटनाची ‘वाट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:37 AM2018-11-22T00:37:57+5:302018-11-22T00:38:16+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : १२ ऐतिहासिक किल्ले, १४ स्मारके, १0 पेक्षा अधिक नद्या, २५ हून ...

'Wat' of tourism in Kolhapur! | कोल्हापूरच्या पर्यटनाची ‘वाट’!

कोल्हापूरच्या पर्यटनाची ‘वाट’!

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : १२ ऐतिहासिक किल्ले, १४ स्मारके, १0 पेक्षा अधिक नद्या, २५ हून अधिक छोटी-मोठी धरणे, सह्याद्रीच्या डोंगररांगांतील खोल दऱ्या, दाट जंगले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. आई अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, खिद्रापूरचे प्राचीन मंदिर भाविकांना खेचून आणत आहे. इथला इतिहास अंगावर रोमांच उभा करतो आणि भूगोल मनाला मोहवून टाकतो. म्हणजेच पर्यटनासाठी पूरक असणाºया बहुतांशी बाबी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. तरीही कोल्हापुरात आलेला पर्यटक एक दिवसच थांबतो आणि तांबडा-पांढरा खाऊन कोकण, गोव्याकडे सटकतो. हा पर्यटक दोन-तीन दिवस कोल्हापुरात राहायचा झाला तर मग त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे; मात्र सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन विकास भरकटलेल्या अवस्थेत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. एखाद्या जागेचे माहात्म्य, भविष्यकालीन वाव याचा विचार न करता आपल्या मतदारसंघातील शक्य आहे तेवढी मंदिरे आणि गावे प्रादेशिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेत घालायची. त्यातून कोट्यवधी रुपये मंजूर करून आणायचे. त्या ठिकाणी सभामंडप, रस्ते करायचे. पेव्हिंग ब्लॉक्स पसरायचे आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करायची, अशी परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे.
ज्याला वाटतेय, त्याने ते ते करावे, अशा पद्धतीने पर्यटन क्षेत्रामध्ये काम सुरू आहे. साकल्याने एकत्रित बसून जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे शासकीय पातळीवरील प्रयत्नांमध्ये फारसे कुणाला स्वारस्य नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. नाही म्हणायला वनखात्याच्या वतीने जेऊरजवळ साहसी पर्यटनासाठीचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे; पण त्याची माहिती फारशी कुणाला नाही. तसेच उजळाईवाडीजवळही वनखात्याच्या वतीने एक प्रकल्प उभारत आहे; मात्र पर जिल्ह्यातील, परराज्यांतील, परदेशातील पर्यटकांसाठी खेचून आणणारे आकर्षक प्रकल्प निर्माण करण्याची गरज आहे. तांबडा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, आजºयाचा घनसाळ तांदूळ, वाडीची बासुंदी याचेही मार्केटिंग आवश्यक आहे.
पन्हाळ्यावरील माहिती केंद्र इमारत पडून
गेली चार वर्षे पन्हाळ्यावर माहिती केंद्र पडूनच आहे. सुमारे एक कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले. दगडी उत्तम इमारत बांधण्यात आली; मात्र या ठिकाणी पुढच्या कोणत्याही सुविधा नसल्याने ही इमारत धूळ खात पडून आहे. पर्यटनाकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोनच यातून स्पष्ट होतो. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून ही इमारत बांधण्यात आली आहे.
पन्हाळ्यावरील लाईट अ‍ॅन्ड साउंड प्रकल्प कागदावर
पन्हाळ्यावरील लाईट अ‍ॅन्ड साउंड प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. तो सुरुवातीला अंबरखाना येथे उभारावयाचा होता; परंतु नंतर जागा बदलण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी २0 जून २0१७ ला तीन कोटी रुपये पन्हाळा नगरपालिकेला देण्यात आले आहेत. पुरातत्व विभागाची मान्यताही मिळाली आहे. मात्र, जागेची अडचण निर्माण झाली आहे; त्यामुळे हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.
भवानी मंडपातील लाईट, साउंड प्रकल्प हवेतच
वास्तविक,अंबाबाई मंदिराजवळील भवानी मंडप म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू. या ठिकाणी एैसपैस जागा आहे. येथे कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचे सादरीकरण करणारा आणि ध्वनी प्रकाश प्रकल्प जर साकारला, तर तो लोकप्रिय ठरणार आहे. या प्रकल्पाची काही वर्षांपूर्वी चर्चाही झाली. कोल्हापुरात आल्यानंतर एका ठिकाणी अशा पद्धतीचे कुठेही सादरीकरण केले जात नाही.
१५ मिनिटांचा माहितीपट, १५ मिनिटांचे मर्दानी खेळ, विविध वैशिष्ट्यांचे सादरीकरण आणि जिल्हा पर्यटनाबाबतची एकत्रित माहिती असे हब या ठिकाणी विकसित होऊ शकते. अनायसे येथे रोज हजारो भाविक येत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळणार आहे; परंतु यावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी येथे पार्किंग करायचे की नाही? यातच अजून प्रशासन अडकून आहे.
प्राणीसंग्रहालय का नाही?
न्यू पॅलेसच्या आवारात काही सांबर, भेकर, हरणे आणि मोर आहेत. या प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात भव्य प्राणीसंग्रहालय उभारण्याची गरज आहे. आज पुण्यापासून गोव्यापर्यंत एकही प्राणीसंग्रहालय नाही. कोल्हापूरचे हवामान, उपलब्ध जागा, पाण्याची सुविधा या सर्व बाबींचा विचार करता, असे मोठे प्राणीसंग्रहालय उभे करणे अशक्य नाही. कोल्हापूरला येणाºया भाविक पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. या दृष्टीने शासनाने विचार करण्याची गरज आहे.
चित्रपटसृष्टीचे दर्शन घडविणारे दालन हवे
बॉलिवूड जेव्हा ख्यातनाम नव्हते तेव्हा कोल्हापूरमध्ये चित्रपट तंत्रज्ञान शिकण्यासाठी कराची, कलकत्ता, मद्रासहून अनेकजण येत असत. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार करणारे पेंटर बंधू कोल्हापूरचे. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, आॅस्कर विजेत्या भानू अथैय्या, सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांडरे, अनंत माने, जगदीश खेबुडकर, आशा काळे या सगळ्या मंडळींची जडणघडण कोल्हापूरच्या मातीतलीच. सुधीर फडके कोल्हापूरचेच. ग. दि. माडगूळकर, लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूरमधूनच. मराठी चित्रपटसृष्टीचा पायाच कोल्हापूरमध्ये घातला गेला; मात्र त्याचे यथार्थ दर्शन घडविण्याची सोय कोल्हापूरमध्ये नाही. या सर्वांच्या आठवणी, कारकीर्द, प्रवासाचे टप्पे हे सर्व आकर्षण ठरू शकते; परंतु याबाबतीत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाकडे पाठविण्या-पलीकडे काहीही झालेले नाही.
दांडेलीत जमते, कोल्हापुरात का नाही?
कोल्हापुरातून पावणेदोनशे किलोमीटरवर असणाºया कर्नाटकमधील दांडेली येथे वनखात्याच्या वतीने अधिकृतपणे जंगल सफरी घडवून आणली जाते; मात्र आपल्याकडे राधानगरीचे दाजीपूरचे अभयारण्य असूनही येथे अशी जंगल सफरीची सोय नाही. दांडेली येथे वनखात्याने आपल्या कार्यालयामध्ये पावती फाडून
उघड्या टपाच्या जीप्स उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात अशी कुठेही सोय नाही.
पालकमंत्र्यांचे
पूरक प्रयत्न, पण...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटनवाढीसाठी सत्ता आल्यानंतर प्रयत्न केले. नवऊर्जा महोत्सवापासून ते आडवाटेवरच्या कोल्हापूरपर्यंत, मुलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीपासून ते पोलीस उद्यानापर्यंत, फ्लॉवर फेस्टिव्हलपासून ते कला महोत्सवापर्यंत अनेक उपक्रम राबविले गेले. कोल्हापूर शहरातील चौक आणि दुभाजक सुशोभित झाले. परंतु, हे मंत्री पाटील यांच्या वैयक्तिक दृष्टीतून आणि सहकार्यातून शक्य झाले. तेच त्यांना शासकीय प्रक्रियेतून फार मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झालेले नाही, हे वास्तव आहे.
सर्व टुर्स आॅपरेटर्स आले, पण पुढे काय?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व टुर्स आॅपरेटर्सना कोल्हापुरात दोन दिवस एकत्र आणण्यात आले. त्यांना कोल्हापूर जिल्हा दाखविण्यात आला; पर्यटनवाढीसाठी नव्या कल्पनाची चर्चा झाली. परंतु त्यापुढे फार काही झाल्याचे ऐकिवात नाही. कोल्हापूर हॉटेल मालक संघ अशा उपक्रमांमध्ये सहकार्याची भूमिका घेतो आणि नंतर त्यांच्या व्यवसायात गुंततो; त्यामुळे पर्यटनवाढीसाठी मोठ्या प्रकल्पाच्या दृष्टीने विचार होत नाही. शासन पातळीवरही याबाबतचा सर्वंकष आराखडा करून त्यामागे ताकद लावल्याचे चित्र दिसत नाही.

Web Title: 'Wat' of tourism in Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.