राजकीय वर्चस्वातून होरपळले पाचगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:19 AM2018-04-24T01:19:45+5:302018-04-24T01:19:45+5:30

Political overcrowding | राजकीय वर्चस्वातून होरपळले पाचगाव

राजकीय वर्चस्वातून होरपळले पाचगाव

googlenewsNext


कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून पाचगाववर वर्चस्व कोणाचे? यावरून ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक पाटील आणि धनाजी तानाजी गाडगीळ या दोघांचा ‘खुनाचा बदला खून’ यातून सूडसत्र पाच वर्षांपूर्वी घडले. त्यानंतर आजही दहशतीच्या छायेखाली पाचगाव राहिले आहे. त्यातून दोन्हीही गटांकडील एकूण ११ जण कळंबा कारागृहात गजाआड होते.
पाचगाव ग्रामपंचायतीच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचे, यावरून दिलीप जाधव विरुद्ध अशोक पाटील यांच्यात अनेक महिने वाद धुमसत होता. तो निवडणुकीच्या निमित्ताने उफाळला. ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप जाधव गटाच्या बाजूने बहुमत मिळाले; पण सरपंचपद हे महिला मागास प्रतिनिधीसाठी राखीव असल्याने त्या गटातून जाधव यांच्याकडे कोणीही विजयी झाले नव्हते, तर अशोक पाटील यांच्या गटाकडे बहुमत नसले तरी सरपंचपदासाठीच्या शोभा भालकर या विजयी झाल्या होत्या. प्रत्यक्ष सरपंच निवडीवेळी दिलीप जाधव गटाच्या राधिका बराले यांनी आपण मागासवर्गीय असल्याचा दाखला आणून बहुमताच्या जोरावर सरपंचपद मिळविले. त्यातून दोन्ही गटांत एकमेकाला वारंवार धमक्या देण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यातून गटात राग खदखदत होता.
आरोपींना कोगनोळी नाक्यावर अटक
दि. १३ फेब्रुवारी २०१३ ला अशोक पाटील हे मित्र उत्तम भोसले, शकील बंडवल, अरुण पाटील, निशांत मानेसोबत घरातून मोटारीतून (एमएच ०९ सीएन ९९९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास न्यू महाद्वार रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेत चेक घेऊन आले. तेथे अशोक पाटील बँकेच्या दारात मोबाईलवर बोलत उभा असताना अचानक दिलीप जाधव आणि अमोल जाधव तेथे आले व त्यांनी अशोक पाटीलवर गावठी पिस्तूलमधून गोळीबारा केला. त्यात पाटील यांच्या डोक्यातून दोन गोळ्या आरपार गेल्याने ते जागीच ठार झाले. यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करून तेथे पिस्तूलमधील पुंगळ्या, गोळ्यांचे तुकडे मिळाले. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालय परिसरात पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर गोपनीय माहितीनुसाार पोलिसांनी पाचही आरोपींना कोगनोळी नाक्यावर दोन दुचाकीवरून पळून जाताना पकडले. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या बॅगमध्ये गावठी पिस्तूल मिळाले. हे पिस्तूल नंतर तपासणीसाठी सांताकृझला पाठविले होते. त्यांनीही या पिस्तूलमधून गोेळ्या झाडल्याचा अहवाल दिला. त्यावेळेपासून सर्व आरोपी हे कळंबा कारागृहातच होते.
धनाजीच्या खुनातून बदला
अशोक पाटीलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा गट अतूर होता; पण दिलीप जाधवसह आरोपी हे कारागृहात असताना त्याच्या कुटुंबियांना मदत करणारा दिलीपचा मेहुणा धनाजी गाडगीळ यात बळी ठरला. २३ डिसेंबर २०१३ ला रात्री पाचगावमध्ये एकाचा वाढदिवस साजरा करताना तेथे धनाजी गाडगीळ गेला होता. त्याचवेळी अशोक पाटील गटाने धनाजीला गाठून त्याच्यावर जांबिया, तलवार, कोयत्याने हल्ला करून ठार केले. त्यावेळी आडवा आल्याने फिर्यादी अमर बावडेकर हाही जखमी झाला होता. त्यातून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून १० संशयितांना अटक करून खटला चालविला होता. घटनास्थळी एक दुचाकी व जांबिया मिळाला होता.
डिजिटल लावण्याचे नियोजन?
या खून खटल्यात एका गटाकडून पाण्याच्या खजिन्यापासून ते पाचगावपर्यंत डिजिटल लावण्याचे सोमवारी नियोजन केले असल्याची चर्चा शहरात सुरू होती; पण दोन्ही गटांना शिक्षा झाल्याने त्याच्यावर पाणी फेरले.
तडजोडीचा प्रयत्न असफल...
अशोक पाटील व दिलीप जाधव यांच्या गटात तडजोडीचा प्रयत्न नेत्यांनी केला; पण एका गटाला वाटत होते की, आपण निर्दोष सुटणार. त्यामुळे दोन्ही गटांच्या तडजोडीचा प्रयत्न असफल झाला.

दोन्ही गटांत चार भावंडे
अशोक पाटील याच्या खूनप्रकरणी शिक्षा झालेल्या पाचजणांमध्ये दिलीप आणि अमोल जाधव हे सावत्र भाऊ, तर धनाजी गाडगीळ प्रकरणात मृत अशोक पाटीलची मुले महेश आणि मिलिंद यांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून भावंडांना शिक्षा झाली.
गाडगीळ खून खटल्यात २३ साक्षीदारांपैकी चार फितूर झाले, तर मृतदेहाच्या शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. माधवी श्रीवस्ती यांच्यासह फिर्यादी अमर बावडेकर, स्वप्निल कांबळे, विक्रांत पठाण, विनायक सुतार यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
साक्षीदार व फितूर
अशोक जाधव खून खटल्यात एकूण ४३ साक्षीदार तपासले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निशांत माने वगळता इतर २३ जण फितूर झाले; पण घटना घडली त्यावेळी माने हा फेव्हिकॉल आणण्यासाठी शेजारी गेला होता, तर खून घडला त्यावेळी रस्त्याकडेला फुटपाथवर सोमेश साठे (कोल्हापूर) हा तरुण मित्रांसोबत बोलत उभा होता. खुनाची घटना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सोमेशची प्रकृती बिघडल्याने तो आठ दिवस गायब होता. पोलिसांनी त्याला शोधून काढून त्याची साक्ष नोंदविली. तीच साक्ष शिक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title: Political overcrowding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.