मुश्रीफ-महाडिक वादाचे मूळ कारण वेगळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:04 AM2019-01-30T01:04:14+5:302019-01-30T06:45:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अगदी अनवधानाने नाव न घेतल्याचा राग म्हणून कागलमध्ये सोमवारी (दि. २८) आमदार हसन मुश्रीफ ...

The original reason for the Mushrif-Mahadik dispute is different | मुश्रीफ-महाडिक वादाचे मूळ कारण वेगळेच

मुश्रीफ-महाडिक वादाचे मूळ कारण वेगळेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अगदी अनवधानाने नाव न घेतल्याचा राग म्हणून कागलमध्ये सोमवारी (दि. २८) आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचेच खासदार धनंजय महाडिक यांचे भाषण रोखण्यामागे खरे कारण वेगळेच आहे. पक्षांतर्गत खदखदच त्यातून व्यक्त झाली आहे.
सोमवारच्या घटनेमध्ये जे चुकून झाले, त्याचा एवढा गवगवा करण्याचे मुश्रीफ समर्थकांना कारण नव्हते, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली आहे. परंतु या घटनेवेळी खाली बसलेल्या कार्यकर्त्यांतून जी शेरेबाजी झाली, तोच महाडिक यांच्या विरोधामागील खरा कळीचा मुद्दा आहे. ‘तुम्ही साडेचार वर्षे कुठे होता? तुम्हांला निवडून कुणी आणले, हे विसरला काय?’ अशी विचारणा कार्यकर्ते करीत होते. महाडिक यांचे संसदेतील कामकाज उत्कृष्ट व छाप पाडणारे भले असेल; परंतु मतदारसंघातील संपर्क असेल किंवा ज्यांनी त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला, त्यांना सोबत घेऊन विकासकामांचा धडाका असेल, यामध्ये ते खूपच मागे आहेत. किंबहुना त्या-त्या मतदारसंघात स्थानिक नेतृत्वाला सोबत घेऊन ते फिरकलेले नाहीत. त्यामुळेच कागलसारखीच भावना इतरही मतदारसंघांत आहे. ते जिथे गेले तिथे मूळच्या महाडिक गटाचे म्हणून समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्व दिले आहे. त्याचाही राग राष्ट्रवादीच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांत आहे. त्याला मुश्रीफ यांचे भाषणात नाव न घेतल्याचे निमित्त मिळाले व त्याचा स्फोट झाला.
कागलमध्ये मुश्रीफ यांच्याविरोधातच नव्हे, तर पराभवासाठी समरजित घाटगे व संजय घाटगे यांचे मनोमिलन घडवून आणण्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत व ते काय करीत आहेत हे लपून राहिलेले नाही. ‘गोकुळ’च्या राजकारणात गेल्या निवडणुकीत मुश्रीफ हे महाडिक यांच्या पाठीशी राहिल्यानेच त्यांच्या ताब्यात ‘गोकुळ’ संघ राहिला, हे स्पष्ट असतानाही महादेवराव महाडिक यांना मुश्रीफ यांचा पराभव करायचा आहे. त्याचे कारण त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांना पाठबळ दिले. म्हणजे ‘गोकुळ’ व लोकसभेला मदत केली हे ते विसरले आहेत व विधानपरिषदेत केलेल्या विरोधाचा पैरा त्यांना फेडायचा आहे. स्थानिक राजकारणात महाडिक गटाने घेतलेल्या या दुटप्पी भूमिकेचीही ती प्रतिक्रिया आहे.
कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांनी दिलेल्या घोषणा असतील किंवा कोल्हापुरात त्यास खासदार गटाने दिलेले प्रत्युत्तर असेल; यातून पक्षातील गटबाजी किती खोलपर्यंत गेली आहे, याचेच दर्शन झाले. त्याची किंमत पक्षाला मोजावी लागणार आहे. या घडामोडीत नुकसान पक्षाचेच होणार आहे. कागलमध्ये गैरसमजातून घोषणा दिल्या गेल्या; परंतु त्यांना लगेच सायंकाळच्या सभेत प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती. या घोषणा देतानाही फक्त महाडिक यांचाच जयघोष झाला. तिथे पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर होते, त्यांचा किंवा पक्षाचा एकदाही जयजयकार झाला नाही. महाडिक यांची कायमच ‘आम्ही म्हणजेच पक्ष’ अशी भूमिका राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब तिथे उमटले. म्हणूनच पक्षनेते अजित पवार यांना शेवटी तराटणी द्यावी लागली. आजच्या घडीला पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून अन्य नेतेही उमेदवारी देण्यासाठी खासदार महाडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत याचा अर्थ त्यांनी पक्षाला गृहीत धरणे हे योग्य नाही.
मुश्रीफ-महाडिक वादाला महापालिकेतील राजकारणाचेही काही पदर आहेत. तिथे खासदारांनी महाडिक गटाची सोय म्हणून भाजप-ताराराणी आघाडीला मदत केली. या आघाडीत महाडिक यांच्याशी कौटुंबिक नाते असलेले सात नगरसेवक आहेत. त्यामुळे परवाच्या महापौर निवडीवेळी त्यातील ‘तुम्ही दोघांना आजारी पाडा,’ असा मुश्रीफ यांचा आग्रह होता. ‘तुमच्या घरात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणताना तुम्ही हा फॉर्म्युला वापरला होता, तो यावेळी वापरा,’ असे त्यांचे म्हणणे होते; परंतु तसे घडले नाही. महापौर निवडीनंतर शनिवार पेठेत झालेल्या सत्कार समारंभात आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जास्त बोचरी टीका केली. तिथे मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांनी जिल्'ाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी टीका केली; परंतु त्याचा राग ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना येण्याचे कारण नाही. त्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले नाही; परंतु नगरसेवक सत्यजित कदम व सुनील कदम यांनी दिले. खासदारांची संमती असल्याशिवाय ते असे प्रत्युत्तर देण्याचे धाडस ते कसे करू शकतील, असे मुश्रीफ गटाला वाटते.
दोन्ही काँग्रेस एकत्रित विश्वासाने या निवडणुकीला सामोरे गेल्यास निवडणूक अवघड नाही; कारण विद्यमान सरकारबद्दल लोकांत नाराजीची भावना आहे; परंतु नेतेच जर एकमेकांच्या पायात पाय घालत बसले तर मात्र अडचणीचे होईल. आता निवडणूक महिन्या-दीड महिन्यात जाहीर होऊ शकते. असे असताना पक्षांतर्गत वादाला तिलांजली देणेच पक्ष व नेत्यांच्याही हिताचे ठरेल.

 

Web Title: The original reason for the Mushrif-Mahadik dispute is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.