मराठा लढला; मराठा जिंकला! : शिव-शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला; साखर, पेढे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:17 AM2019-06-28T01:17:16+5:302019-06-28T01:18:21+5:30

मराठा आरक्षण कायदा घटनेला धरून असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षण वैध ठरल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

 Maratha fight; Maratha won! | मराठा लढला; मराठा जिंकला! : शिव-शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला; साखर, पेढे वाटप

मराठा आरक्षण वैध ठरल्याचा आनंदोत्सव गुरुवारी सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर जयजयकार करून केला.

Next
ठळक मुद्देकोल्हापूरचा वाटा सिंहाचा ---आरक्षण वैध ठरल्याने जल्लोष

कोल्हापूर : मराठा आरक्षण कायदा घटनेला धरून असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षण वैध ठरल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, शाहू महाराज यांच्या जयजयकाराने हा परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र क्रांतिसेनेच्या वतीने दसरा चौक परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक गावांतही मराठा आरक्षण मिळाल्याने साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजातील कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.



कोल्हापूर : मराठा आरक्षण वैध ठरल्याचे वृत्त समजताच दुपारी साडेतीनच्या सुमारास सकल मराठा समाजातील भगिनी-बांधव शाहू स्मारक भवन परिसरात जमल्या. तेथून हे सर्वजण दसरा चौकात आले. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा देत सकल मराठा समाजातील बांधवांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी या ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी गुलाबराव घोरपडे, शंकरराव शेळके, अजय इंगवले, गणी आजरेकर, अवधूत पाटील, मारुती जाधव, ऋतुराज माने, प्रकाश पाटील, शैलेजा भोसले, पूजा पाटील, दीपा ढोणे, मेघा मुळीक, नेहा मुळीक, सुनील पाटील, शिरीश जाधव, प्रताप नाईक-वरुटे, गुरुदास जाधव, चंद्रकांत चव्हाण, पद्मावती पाटील, विजया पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, कृष्णाजी हारुगडे, महादेव पाटील, संदीप पाटील, शरद साळुंखे, पवन निपाणीकर, श्वेता जाधव, ऋषिकेश पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र क्रांतिसेनेचे सुरेश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोल्हापूरचा वाटा सिंहाचा

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कोल्हापूरचा वाटा सिंहाचा राहिला आहे. कोणतेही आंदोलन एकदा हाती घेतले, की ते तडीस नेल्याशिवाय त्यातून माघार घ्यायची नाही, या कोल्हापुरी संघर्षशील वृत्तीमुळेच हे घडले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ५८ मोर्चे निघाले; परंतु त्यातही कोल्हापूरचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा होता. मोर्चे काढूनही सरकारी पातळीवर काही हालचाल होत नाही म्हटल्यावर दसरा चौकात तब्बल ४२ दिवस धरणे आंदोलन झाले. ते आंदोलन मागे घेतानाही कार्यकर्त्यांनी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या मंत्रिगटाला कोल्हापुरात यायला व त्यांच्याकडूून लेखी आश्वासन द्यायला भाग पाडले. आरक्षणाला जोडूनच सारथी संस्थेची उभारणी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम सुरळीत होणे व त्याचा मराठा समाजातील तरुणांना उपयोग व्हावा, यासाठी दबावगट म्हणूनही कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनीच रेटा लावला. वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई हे बिनीचे कार्यकर्ते. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..’ अशी रोखठोक भूमिका घेऊनच हे आंदोलन पुढे नेले. या सर्व आंदोलनात कोल्हापूरच्या सामान्य जनतेचे बळ मोठे होते.

दोन पाटलांचे श्रेय
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मागासवर्गीय आयोगाचे विधि सल्लागार के. डी. पाटील या कोल्हापूरकरांचाही हे आरक्षण मिळवून देण्यात व ते न्यायालयात टिकविण्यात मोलाचा वाटा राहिला.

 

हा समाधानकारक निर्णय झाला आहे; परंतु महाराष्ट्रातील मराठा समाजाची लोकसंख्या पाहता मिळालेल्या आरक्षणाची टक्केवारी कमी आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची गरज आहे. राज्य सरकारने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी सुरू करावी.
- श्रीमंत शाहू छत्रपती.

माझ्या जीवनाचे सार्थक झाले, अशीच माझी आज भावना आहे. मराठा समाजाची अवस्था बिकट झाल्याने आरक्षण अत्यावश्यकच होते. मागास आयोगाने अहवालामध्ये जे निष्कर्ष काढले, ते न्यायालयाने मान्य केले आणि आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री.


न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. मराठा समाजाच्या तीव्र भावना मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना बोलत होतो. त्यामुळे किती टक्के आरक्षण मिळाले यापेक्षा न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकले हे महत्त्वाचे असून, त्याचे मराठा समाजाने स्वागत करावे.
- खासदार संभाजीराजे.

मागासवर्ग आयोगाचा विधि सल्लागार म्हणून रात्रंदिवस काम केले. त्या कामाचे चीज झाले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ व १६ नुसार एखादा समाज सामाजिक ,शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तर अशा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देता येते. हीच आम्ही मांडणी केली होती.
- के. डी. पाटील, माजी न्यायाधीश व आरक्षण आयोगाचे विधि सल्लागार.

या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण आणि नोकरीमध्ये चांगली संधी मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे. तसेच या लढ्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाचे हे यश आहे.
- धनंजय महाडिक, माजी खासदार.


खरे तर हे आरक्षण १६ टक्के मिळणे आवश्यक होते. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणे गरजेचे होते. धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रोश केला, त्यावेळी शासनाने त्या समाजाची फसवणूक केली आहे. सुप्रीम कोर्टातही तज्ज्ञ वकील देऊन निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब करावे.
- हसन मुश्रीफ, आमदार .


भाजप सरकारने आपला शब्द पाळला. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण लागू झाले ही मोठी महत्त्वाची बाब आहे. समाजातील गरजू तरुणांसाठी हे आरक्षण म्हणजे चांगले पाठबळ सिद्ध होईल.
- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, पुणे म्हाडा.

मराठा समाजाने दाखविलेल्या एकीच्या वज्रमुठीचा विजय झाला आहे. हा विजय या आरक्षणासाठीच्या लढ्यात बलिदान दिलेल्यांना समर्पित करतो. मराठा आरक्षणासाठी सरकारच्या पातळीवर तळमळीने काम करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो.
- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.



आरक्षण वैध ठरल्याने सकल मराठा समाजाच्या लढ्याला खºया अर्थाने यश मिळाले आहे. या आरक्षणामुळे मराठा समाजाला उभारी मिळणार आहे.
- शैलेजा भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, अ. भा. मराठा महासंघ.

मूळ आरक्षणाची मागणी १६ टक्केची आहे; त्यामुळे यासाठी सरकार व न्यायालयीन स्तरावर पुन्हा पाठपुरावा करून १६ टक्के आरक्षण मिळवूच. मराठा समाज बांधवांनी रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई अशी दोन्ही पातळींवर लढाई लढली व या लढ्याला यश आले.
- दिलीप पाटील, अध्यक्ष, क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्स


महाराष्ट्रात मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले. कोल्हापुरातील मोर्चा तर भव्यदिव्य झाला. यानंतरही आम्ही सर्वांनी कोल्हापुरात सलग ४२ दिवस आंदोलन केले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे शासनाने आयोग स्थापन केला आणि आज या आयोगाच्या शिफारशींवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
- दिलीप देसाई, अध्यक्ष, प्रजासत्ताक

मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या प्रतीक्षेत होता. नक्कीच या आरक्षणाचा समाजाने फायदा घ्यावा. शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावे.
- रूपेश पाटील, संभाजी ब्रिगेड
 

Web Title:  Maratha fight; Maratha won!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.