कोल्हापूर : आवक वाढल्याने कोथिंबीर निम्म्यावर, भाजीपाल्याच्या दरातही घसरण : कडधान्याचे दर मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:17 PM2018-07-09T13:17:53+5:302018-07-09T13:29:59+5:30

महिन्या-दीड महिन्यापासून घाऊक बाजारात दहा रुपये असणारी कोथिंबिरीची पेंढी आता पाच रुपयांवर आली आहे, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

Kolhapur: Cilantro, due to increase in arrivals, falling at the rate of vegetable prices: the rate of pulse is constant | कोल्हापूर : आवक वाढल्याने कोथिंबीर निम्म्यावर, भाजीपाल्याच्या दरातही घसरण : कडधान्याचे दर मात्र स्थिर

भाजीपाल्याची आवकही वाढल्याने दरात घसरण झाली आहे.  (छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देआवक वाढल्याने कोथिंबीर निम्म्यावर भाजीपाल्याच्या दरातही घसरण : कडधान्याचे दर मात्र स्थिर

कोल्हापूर : महिन्या-दीड महिन्यापासून घाऊक बाजारात दहा रुपये असणारी कोथिंबिरीची पेंढी आता पाच रुपयांवर आली आहे, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.

गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरातही घसरण दिसत असून, घाऊक बाजारात किलोमागे दर चार रुपयांनी कमी झाले आहेत. डाळी व एकूणच कडधान्यांच्या दरांत मात्र फारसा चढउतार दिसत नाही. फळबाजारात अननस, तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढली असून, सीताफळाची रेलचेलही दिसत आहे.


या आठवड्यात कोथिंबिरीची आवक वाढल्याने दर गत आठवड्यापेक्षा निम्म्यावर आले आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात कोथिंबीर, पालेभाज्याचे असे ढीग लागले होते. (छाया- नसीर अत्तार) 

पावसाळा सुरू झाल्यानंतर कोथिंबिरीची आवक एकदम कमी झाली होती. त्यामुळे घाऊक बाजारात १० ते १५ रुपये, तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये पेंढीपर्यंंत दर होता. या आठवड्यात आवक वाढली आहे. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत ३००० पेंढ्यांची आवक झाल्याने दर एकदम घसरले आहेत.

घाऊक बाजारात सरासरी ३०० रुपये शेकडा दर झाल्याने किरकोळ बाजारातही दर खाली आले आहेत. भाजीपाल्याची आवकही हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू असून कोबी, वांगी, ढबू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका व फ्लॉवर या प्रमुख भाज्यांचे दर गत आठवड्यापेक्षा कमी आहेत.

साधारणत: किलोमागे दरांत तीन ते चार रुपयांची घसरण झालेली दिसते. पालेभाज्यांचे दरही काहीसे कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात मेथी, पोकळ्याची पेंढी दहा रुपये तर पालक पाच रुपये पेंढी आहे.

कडधान्य बाजारात एकदम शांतता आहे. आवक व उठाव फारसा नसल्याने दरात चढउतार दिसत नाही. गहू, ज्वारी, नाचणीचे दर स्थिर आहेत. तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळ, मसूरडाळ या प्रमुख डाळींसह सरकी तेल, साखर, मैदा, आटा यांचे दरही कायम आहेत. मसाल्याचे तीळ, जिरे, खसखस, खोबऱ्याच्या दरांत किरकोळ प्रमाणात वाढ झाली असून, एकूण ही बाजारपेठ शांत आहे.

फळबाजारामध्ये अननस, तोतापुरी आंब्यांची रेलचेल वाढली आहे. तोतापुरीची आवक रोज २८ टनांपर्यंत गेली असून, गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत दुप्पट वाढ झाल्याने शहराच्या प्रत्येक चौकाचौकांत हातगाड्यांवर पिवळाधमक तोतापुरी पाहावयास मिळत आहे. ‘दशेरी’, ‘निलम’ आंब्यांचा हंगामही अंतिम टप्प्यात असून बाजार समितीत किरकोळ प्रमाणात त्याची आवक होत आहे.

कांदा वधारला!

गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक निम्म्यावर आल्याने दर चांगलेच वधारले आहेत. घाऊक बाजारात चांगला कांदा १५ रुपयांना झाला असून, सरासरी दर बारा रुपयांपर्यंत आहे. बटाटा व लसणाची आवक कमी-अधिक असली तरी दरात मात्र फारसा फरक दिसत नाही.

 

 

Web Title: Kolhapur: Cilantro, due to increase in arrivals, falling at the rate of vegetable prices: the rate of pulse is constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.