जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:57 PM2018-12-29T12:57:16+5:302018-12-29T12:59:06+5:30

चार तालुक्यातील ६४०० हेक्टर क्षेत्राला होणार फायदा

The recognition of seven ballot bands on Girna river in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना मान्यता

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना मान्यता

Next
ठळक मुद्देकेंद्राकडून मिळणार १०० टक्के निधी :

जळगाव : केंद्र शासनाचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील सात बलून बंधारे प्रकल्पास २८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ७११ कोटींपेक्षा जास्त किंंमतीच्या अंदाजपत्रकासही मान्यता मिळाली आहे. या सात बंधाºयांमुळे जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील ६ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील १६८ किलो मीटर लांबीच्या पट्यातून गिरणा नदी वाहात जाते. गिरणाला मिळणाºया बोरी, तितूर व अंजनी या नद्यांना पावसाळ्यात बरेच पाणी येते व जळगाव तालुक्यात तापी नदीला मिळून वाहून जाते. पावसाळ्यानंतर या नद्यांच्या क्षेत्रात मात्र पाण्याचे दरवर्षी दुर्र्भिक्ष असते.
१५ वर्षांपासून प्रयत्न
गिरणाचे वाहून जाणारे पाणी अडविले जावे यासाठी २००३ पासून प्रयत्न होते. अखेर बलून बंधारे बांधण्याचे निश्चित होऊन त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, बहाळ, भडगाव तालुक्यातील पांढरद, भडगाव, पाचोरा तालुक्यातील परधाडे, कुरंगी आणि जळगाव तालुक्यातील कानळदा येथे बलून बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी हा प्रकल्प यशस्वी ठरणार असल्याचा निष्कर्ष सादर केला व जलसंपदा विभागाने २९ जून २०१५ रोजी अन्वेषण अहवालास शासनाने तत्वत: मान्यता दिली होती.
तापी एकात्मिक जल आराखडामध्ये समावेश
गिरणा नदीवरील या सात बंधाºयांचा प्रकल्प केंद्र शासनाचा पायलट प्रोजेक्ट योजनेत समावेश करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी या प्रकल्पाची माहिती घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सहा महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले होते. जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळास तापी पाटबंधारे महामंडळाने प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव प्रकल्प मंडळाने प्रकल्प अहवाल तयार सादर केला. त्यास आता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता मिळाली. सदर प्रकल्पाचा तापी एकात्मिक जल आराखडामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पाच नगरपालिका, ९० ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना शाश्वत स्त्रोत
जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील सुमारे सहा हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच गिरणा परिसरातील पाच नगरपालिका व सुमारे ९० ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे.

येथे होणार बंधारे व पाणीसाठा (दलघमी)
- मेहरूणबारे - ३.९६
-बहाळ - ३.६८१
- पांढरद - ३.६८१
- भडगाव- २.८३१
- परधाडे - ४.२४८
- कुरंगी - ४.२४८
- कानळदा - २.८३२
- एकूण साठवण क्षमता - २५.४८१

केंद्र सरकारकडून १०० टक्के निधी
या मध्यम प्रकल्पासाठी ७११ कोटी १५ लाख २३ हजार रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकासदेखील सशर्त प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १०० टक्के निधी पुरवठा केंद्र सरकारमार्फत केला जाईल, या अटीवर राज्यपालांनी दिली आहे.

Web Title: The recognition of seven ballot bands on Girna river in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव