...अब जलगाँव, धुलीया बाकी है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:55 PM2018-04-24T16:55:01+5:302018-04-24T16:55:01+5:30

गिरीश महाजन यांनी जामनेर राखले, तर जयकुमार रावल यांनी दोंडाईचा व शिंदखेडा पालिका खेचल्या. खान्देशातील दोन्ही मंत्री जळगाव, धुळे महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी काय रणनीती आखतात याची उत्सुकता आहे.

... now Jalgaon, Dhuliya is rest! | ...अब जलगाँव, धुलीया बाकी है !

...अब जलगाँव, धुलीया बाकी है !

googlenewsNext

चार वर्षातील सत्तेनंतर भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी, मतभेद उफाळून आले आहेत. जळगावात महाजन, खडसे आणि पालकमंत्री असे तीन गट तयार झाले आहेत. तर धुळ्यात भामरे-रावल आणि गोटे असे दोन गट आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अशा गटातटात विभागणी झालेली आहे. मंत्र्यांचे कार्यक्रमदेखील गटातटातर्फे आयोजिले जातात. स्वपक्षाचे केंद्र व राज्य सरकार असताना विकासकामांना गती देण्यात यश आलेले नाही. ही सगळी आव्हाने भाजपापुढे आहेत.
भाजपाची विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी या दोन्ही महापालिकांचे नेतृत्व एका व्यक्तीकडे देण्यात येते की, समिती नेमून सामूहिक निर्णय प्रक्रिया राबविली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळे महानगरचे आमदार अनिल गोटे यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जळगाव महानगरचे आमदार सुरेश भोळे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन घडविणाऱ्या दोन घटना या ठिकाणी नमूद करायला हव्यात. पहिली घटना गेल्या आठवड्यातील धुळ्याची आहे. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदीकिनारी रस्ते उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्या ठिकाणच्या झुलत्या पुलाचे भूमिपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. मुनगंटीवारांसारखा ज्येष्ठ मंत्री धुळ्यात येत असताना जिल्ह्यातील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे कार्यक्रमात दिसले नाही. गोटे यांनी दोघांना बोलावले नसावे, हे कारण त्यामागे असावे. डॉ.भामरे हे तर त्या दिवशी धुळ्यात होते, परंतु ते कार्यक्रमाकडे फिरकले नाही.
दुसरी घटना गेल्या वर्षातील जामनेरची. राजस्व अभियान आणि विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. एकनाथराव खडसे, डॉ.गुरुमुख जगवाणी या भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे जळगावच्या विमानतळावर स्वागत केले, परंतु जामनेरच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री जळगाव आणि दीपनगरच्या कार्यक्रमाला आले नाही, याचे खरे कारण प्रकृती अस्वास्थ्य होते, की पक्षातील गटबाजीचे प्रदर्शन टाळणे होते, याविषयी माध्यमे व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तर मध्यममार्ग स्वीकारत खडसे-महाजन अशा दोन्ही गटांचे कार्यक्रम स्वीकारतात. खासदार रक्षा खडसे यांनी चोपड्यात दिव्यांगांसाठी शिबिर घेतले त्याला पाटील हजर राहिले, त्याच दिवशी महाजन गटाचे आमदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगावातील विज्ञान परिषदेच्या समारोपाला ते उपस्थित होते.
मूळ मुद्दा असा आहे की, पक्षाची ही स्थिती असताना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या महापालिका निवडणुका, धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची निवडणूक ही भाजपा एकसंघपणे कशी लढविणार आहे? चारही ठिकाणी भाजपा सत्तेत नाही. स्वबळावर सत्ता आणेल, अशी स्थिती नाही. शिवसेनेशी सख्य नाही, त्यामुळे युतीची चर्चा ‘जर-तर’मध्ये अडकणार आहे. मग ‘जामनेर तो झाँकी है, जलगाँव अब बाकी है’ अशी घोषणा देऊन भाजपाचे कार्यकर्ते काय साधत आहे, हा प्रश्न आहे.
मुळात जामनेर आणि जळगावची तुलना होऊ शकत नाही. जळगाव हे सहा लाख लोकसंख्येचे शहर आहे. जामनेरात एकूण मतदार ३५ हजार आहेत. त्यापैकी २७ हजार मतदारांनी मतदान केले. तर जळगाव महापालिकेचा एक वॉर्ड हा कमाल २६ हजार मतदार संख्येचा आहे. नेत्यांचा उदोउदो करीत स्वत:च्या निष्ठेचे जाहीर प्रदर्शन करणारा संप्रदाय हल्ली भाजपामध्ये वाढीस लागला आहे, त्यापैकी काहींचा ‘झाँकी-बाकी’चा प्रयत्न आहे.
पक्षातील मतभेद हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा विकासकामांचा आहे. अनिल गोटे आणि सुरेश भोळे या दोन्ही आमदारांचा मतदारसंघ हा महापालिका कार्यक्षेत्राचा आहे. स्थानिक विकास निधीतील कामे शहरात होणार आहेत. त्यासोबतच केंद्र व राज्य सरकारकडून निधी खेचून काही योजना आणणे या आमदारांना शक्य होते. याबाबतीत गोटे उजवे ठरले. धाडसी निर्णय घेत, प्रसंगी टीका, विविध घटकांचा रोष ओढवून घेत त्यांनी विकासकामे रेटून नेली. पांझरा नदी किनारी सुरू असलेले रस्त्यांचे काम, अतिक्रमण हटविण्यात घेतलेला पुढाकार ही त्यांची जमेची बाजू आहे. याउलट आमदार भोळे यांची पहिली टर्म असल्याने नवखेपण अद्याप गेलेले नाही. समांतर रस्त्यांचा प्रश्न, गाळेधारकांचा विषय प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांमधील एक पैशाचे काम अद्याप शहरात झालेले नाही. दोन्ही ठिकाणी आमदारांचे महापालिकेतील सत्ताधारी मंडळींशी वाजत असते, पण त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ नये अशी अपेक्षा असताना नेमके उलटे घडत आहे.
गेल्या वेळी धुळ्यात गोटे यांनी लोकसंग्रामतर्फे सर्व महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, पण अवघी एक जागा त्यांना मिळाली. तर जळगावात भाजपाच्या १४ जागा निवडून आल्या होत्या. विरोधी पक्षातील भाजपाची ही स्थिती पक्ष आता सत्तेत असल्याने बदलेल, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अर्थात अजून चार महिन्यांचा कालावधी हातात असल्याने दुरुस्तीला वाव आहे.
काँग्रेसच्या वाटेवर
जळगावात स्वतंत्र कार्यालय असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जी.एम. फाउंडेशनच्या नावाने स्वतंत्र कार्यालय, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वतंत्र कार्यालय, आमदार सुरेश भोळे यांचे स्वतंत्र कार्यालय, तर खडसे ‘मुक्ताई’ या निवासस्थानी जनतेसाठी उपलब्ध असतात. प्रदेश पदाधिकारी आले की, केवळ कार्यालयात सगळे जमतात. धुळ्यात अशीच स्वतंत्र ठिकाणे आहेत.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: ... now Jalgaon, Dhuliya is rest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.