स्वपक्षाचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होण्याचे आमदारांचे दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:31 PM2019-05-22T12:31:01+5:302019-05-22T12:31:51+5:30

लोकसभा निवडणुकीची २३ रोजी मतमोजणी

MLA's claims of winning the candidate from a bigger margin | स्वपक्षाचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होण्याचे आमदारांचे दावे

स्वपक्षाचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होण्याचे आमदारांचे दावे

Next

जळगाव/धुळे/नंदुरबार : देशभरात यंदाही नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट असल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात पुन्हा भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास भाजपाच्या आमदारांनीतर काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार विजयी होण्याचा दावा आघाडीच्या आमदारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीची २३ रोजी मतमोजणी होणार असून या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार या चारही लोकसभा मतदार संघातील आमदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी हा दावा केला. भाजपचा उमेदवार हमखास विजयी होणार असल्याचे सांगितले. याचे कारण सांगतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम यामुळे जनतेचा विश्वास वाढल्याचे सांगितले. तर काँग्रेस, राष्टÑवादीने सरकारविरोधी नाराजी असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विविध विकास कामे, जनतेच्या हिताचे निर्णय यासह नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट यामुळे जळगाव मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना एक लाखापेक्षा अधिक माताधिक्य मिळून ते विजयी होतील.
-सुरेश भोळे, आमदार
चोपडा विधानसभा मतदार संघात महायुतीच्या अर्थात भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना मताधिक्य राहील. किती मतांचे मताधिक्य राहील हे मात्र सांगता येणार नाही.
-चंद्रकांत सोनवणे, आमदार, चोपडा.
अमळनेर विधानसभा मतदार संघात भाजपच्या उन्मेष पाटील यांनाच आघाडी मिळेल. भाजपला मतदार संघात सुमारे ३० ते ३५ हजार मतांची आघाडी मिळेल कारण तरुणांना केंद्रात नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडळसरे धरणाला नाबार्ड कडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने मतदारांनी भाजपवर विश्वास टाकला आहे.
-शिरीष चौधरी, आमदार, अमळनेर
जळगांव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा विजय निश्चित आहे. सर्वत्र त्यांना मतदारांनी पसंती दिली. सर्वाधिक मतदान जळगांव शहरात आहे. विजयाचे गणित हे जळगांव शहरावर अवलंबून आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघातही तेच मताधिक्य घेतील
-डॉ. सतीश पाटील, आमदार, पारोळा
जळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपाचा अभेद्य गड असून प्रचारात आम्ही मांडलेले विकासाचे व्हीजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेली भावनिक ओढ, कार्यकर्त्यांनी केलेले जीवाचे रान जनतेला भावले आहे. त्यामुळे लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन आपण विजयी होऊ. माझ्या होमपीचवर अर्थात चाळीसगाव विधानसभा मतदार संघात मी स्वत: प्रचार केलेला नाही. येथे प्रचार कार्यकर्त्यांनी केला. आमदारकीच्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत तालुक्यात केलेल्या कामांमुळे येथेही लीड मिळेलच. -उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव.
भाजपाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ४५ हजारांपेक्षाही जास्त आघाडी मिळेल. खासदार खडसे यांनी मतदारसंघात विकासाची कामे केली आहेत. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
-संजय सावकारे, आमदार,भुसावळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वामुळे जनता पुन्हा भाजपलाच कौल देणार आहे. यात जळगाव मतदार संघातील उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील.
-स्मिता वाघ, आमदार
भाजपने देशासह राज्यात केलेले काम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास यामुळे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील.
-चंदूलाल पटेल, आमदार
या लोकसभा निवडणुकीत धुळे व नंदुरबार या दोन्ही जागा कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष आघाडी पटकावेल. कारण आम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दोन्ही उमेदवारांना किती मताधिक्य मिळेल, हे निकालातून स्पष्ट होईल. मतदारसंघात बहुतांश आमदार आमचेच आहेत. त्या सर्वांनी मेहनत घेतली आहे. आणि त्याचे फळ आम्हाला आमच्या पक्षाचे दोन्ही उमेदवारांच्या विजयाच्या रूपाने मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. -अमरिशभाई पटेल, माजी मंत्री, कॉँग्रेस
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे हे निश्चितपणे विजयी होतील. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळेल. आम्ही गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे, धुळे व शिंदखेडा तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी सुलवाडे-जामफळ योजनेसाठी केंद्राकडून आणलेला २४०० कोटी रुपयांचा निधी, मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी, पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक नव्या गाड्या सुरू केल्या, अनेक गाड्यांना थांबा मिळाला. गत पाच वर्षात जनतेच्या बहुतांश अपेक्षांची पूर्ती झाली. त्यामुळे युतीचे उमेदवार डॉ.भामरे हे निश्चितपणे विजयी होतील.
- जयकुमार रावल, रोहयो व पर्यटनमंत्री, महाराष्टÑ
या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी चालेल. पण ज्यांना जनभावनांची कदर नाही, निवडून आल्यानंतर काही काम केले नाही, जनतेची दिशाभूल केली अशा उमेदवारांना मी निकालाच्या माध्यमातून जमिनीवर आणणार आहे. माझ्या प्रतिष्ठेसाठी मी संघर्ष करत आहे. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. जो उमेदवार जास्त मते घेईल, तो निवडून येईल.
- अनिल गोटे, माजी आमदार, धुळे
भाजपा सरकारने गेल्या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. परंतु ती पाळली नाही. त्यात नोटाबंदी, जीएसटी अंमलबजावणी करून व्यापारी, शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना अडचणीत आणले. यामुळे तीव्र नाराजी होती. ती या निवडणुकीत दिसली. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाचे धुळ्याचे उमेदवार कुणाल पाटील व नंदुरबार मतदारसंघाचे उमेदवार के.सी. पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी होतील. कुणाल पाटील यांना १५ ते २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल.
- डी.एस. अहिरे, आमदार, साक्री
नंदुरबारच्या खासदार डॉ.हीना गावीत यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेली कामे तसेच त्यांचा जनसंपर्क यामुळे मतदारसंघातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही प्रभावी झाल्याने तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कामावर जनता खूष होती. भाजप, शिवसेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गट-तट विसरुन डॉ.हीना गावीत यांचा प्रचार केला. सर्वांनी खूप परिश्रम घेतल्याने या वेळी गेल्या निवडणुकीपेक्षा अर्थात एक लाख सहा हजारापेक्षा अधिक मताधिक्क्यांनी भाजप उमेदवाराचा विजय होईल. -विजयकुमार गावीत, आमदार, नंदुरबार
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांनी एकदिलाने उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांचा प्रचार केला आहे. घराघरापर्यंत काँग्रेसची भूमिका मांडण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. याशिवाय भाजपच्या केंद्रातील सरकार, राज्यातील सरकार आणि स्थानिक पातळीवर विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी या वेळी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याने काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी हे लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
-चंद्रकांत रघुवंशी, आमदार, नंदुरबार.

Web Title: MLA's claims of winning the candidate from a bigger margin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव