विकासाच्या गप्पा आणि आकड्यांचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:49 PM2019-07-07T13:49:58+5:302019-07-07T13:55:29+5:30

कोट्यवधीची कामे मंजूर झाली तर ती दिसत का नाही? सत्ताधारी मंडळींना जनतेला द्यावा लागेल विश्वास हतबल, गलीतगात्र झालेल्या विरोधी पक्षाला पोलखोल करण्याचादेखील उत्साह नाही

Development chats and statistics games | विकासाच्या गप्पा आणि आकड्यांचा खेळ

विकासाच्या गप्पा आणि आकड्यांचा खेळ

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील एक ठोस काम दाखवा, असे आव्हान खरे तर विरोधी पक्षाने द्यायला हवे. प्रशासकीय मान्यता, सविस्तर प्रकल्प अहवाल, केंद्र, राज्य सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर, निविदा प्रक्रिया सुरु, कार्यादेशाच्या टप्प्यावर, कमी दराने निविदा घेतल्याने कंत्राटदाराचा वेळकाढूपणा अशा सबबी सत्ताधारी मंडळी सांगत असताना विरोधी पक्षांनी ते ठळकपणे मांडायला हवे. परंतु,पराभवाने ही मंडळी हतबल, गलीतगात्र झाली आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते, विकास पुरुष, संकटमोचक अशी बिरुदे मिरविणारे भाजपाचे नेते आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. केंद्रीय व राज्य अर्थसंकल्प सादर झाल्याने जनतेच्या हिताच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार धूमधडाक्यात सुरु झाला आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचा दावा करीत विकास गंगा अवतरल्याचा भास निर्माण केला जात असला तरी वास्तव वेगळे असल्याची जाणीव सामान्य जनतेला आहे. दुर्देव असे आहे की, विरोधी पक्ष प्रबळ नाही. सत्ताधारी मंडळींच्या ‘उक्ती आणि कृती’मधील भेद अधोरेखित करण्याची चांगली संधी विरोधकांना चालून आलेली असताना हतबल झालेले विरोधी पक्षाचे नेते मूग गिळून गप्प आहेत. केवळ निवडणुकांपुरती जनसामान्यांची आठवण काढायची आणि पाच वर्षे आपल्या संस्था, हित सांभाळायचे असे केले तर जनता कसा विश्वास ठेवणार विरोधी पक्षांवर याचाही विचार करायला हवा. स्थानिक पातळीवर तडजोडी करायच्या आणि राष्टÑीय पातळीवर विरोध दर्शवायचा, याला काही अर्थ नाही. अलिकडे राष्टÑीय पातळीवरुन येणाऱ्या कार्यक्रमांना, आंदोलनाला गर्दी कमी होऊ लागली आहे, हे कशाचे निदर्शक आहे? लोकशाहीमध्ये सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता असते. अन्यथा सत्ताधारी मंडळी बेफाम होतील, अमर्याद अधिकारांचा दुरुपयोग करतील. परंतु, एक-दोन पराभवाने गलीतगात्र झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता पराभूताची आहे, हीच मोठी समस्या आहे. जनतेला चांगला पर्याय मिळाला तर ते निश्चित तो निवडल्याशिवाय राहत नाही, हे इतिहासात डोकावले तरी लक्षात येईल.
२०१४ मध्ये एकनाथराव खडसे जी भूमिका भाजपमध्ये निभावत होते, तीच आता गिरीश महाजन वठवत आहेत. उत्तर महाराष्टÑाच्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरु झालेले आहे. नवापूरच्या जागेसाठी भरत माणिकराव गावीत यांच्यारुपाने काँग्रेसमधील तुल्यबळ नेता भाजपला गवसला आहे. सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष आणि भरत या दोन वारसदारांमध्ये तेथे लढतीची शक्यता आहे. २००९ मध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी सुरुपसिंग नाईक यांचा पराभव करुन धक्का दिला होता.
जळगावात सुरेशदादा जैन हे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर झाल्याने भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. आमदार सुरेश भोळे यांना पत्रकार परिषदा घेऊन विकासाचा पाढा वाचावा लागत आहे, हा घोषणेचा परिणाम म्हणावा लागेल.
खडसे यांचे विधानसभेतील निरोपाचे भाषण आणि रावेरमध्ये तिकिटाविषयी व्यक्त केलेली शंका ही भाजपमधील अंतर्गत खळबळ दर्शविणारी आहे. श्रेष्ठी दुर्लक्ष करीत असल्याने खडसे अधिक आक्रमक होत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशाने भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांमध्ये अमाप उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची दोन महिने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या मंजुरी, भूमिपूजन सोहळे यांचा झगमगाट राहणार आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत आलेला नाही, एवढा निधी मतदारसंघात आला आहे, असा दावा आतापासून आमदार करु लागले आहेत. राष्टÑीय महामार्गासाठी १६०० कोटी रुपयांच्या कामांचे झालेले भूमिपूजन असो की, जळगावसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींचे नियोजनाचा अनुभव जनतेसमोर असताना या घोषणांविषयी विश्वास वाटायला हवा.

Web Title: Development chats and statistics games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.