भाजप बंडखोरांच्या प्रभावाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 08:33 PM2019-04-28T20:33:59+5:302019-04-28T20:34:47+5:30

निष्ठावंतांवरील अन्यायाला नंदुरबारात पुन्हा एकदा फोडली वाचा ; अनिल गोटे ताकद पुन्हा अजमावतायत, बंडखोरी शमविण्यात यश न आल्याने आता विजयासाठी ‘संकटमोचका’च्या नेतृत्वाची कसोटी

Curiosity about the impact of the BJP rebels | भाजप बंडखोरांच्या प्रभावाविषयी उत्सुकता

भाजप बंडखोरांच्या प्रभावाविषयी उत्सुकता

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगाव : उत्तर महाराष्टÑातील भाजप-शिवसेनेच्या ८ जागा निवडून येतील, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले. धुळ्यातील अनिल गोटे यांची बंडखोरी अपेक्षित होती. परंतु, नंदुरबारच्या डॉ.नटावदकर यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची बंडखोरी अनपेक्षित आणि संवादाच्या अभावामुळे झाली आहे. आता या बंडखोरीचा त्रास भाजपला कितपत होतो, विजयाचे गणित त्यावर अवलंबून राहते काय, याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात खान्देशातील उर्वरित दोन म्हणजे धुळे, नंदुरबार मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. एक केंद्रीय राज्यमंत्री, एक विद्यमान खासदार आणि तीन आमदारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. जिल्हानिर्मितीपूर्वी नंदुरबार हा धुळे जिल्ह्याचा भाग होता. आता लोकसभा मतदारसंघातही धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. धुळ्याला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण असे तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहे. अहिराणी पट्टा अशी या मतदारसंघाची ओळख म्हणता येईल.
नंदुरबारात गेल्या निवडणुकीत भाजपचा पहिल्यांदा खासदार निवडून आला. त्यामुळे डॉ.हीना गावीत यांना दुसऱ्यांदा उमेदवारी अपेक्षित होती. त्याप्रमाणे ती मिळाली. मात्र निष्ठावंत कार्यकर्ते डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली. त्यांना गेल्यावेळी दिलेले आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पाळले नाही, असे सांगितले जाते. त्यांचा अर्ज भरताना भाजपतर्फे चारवेळा ही निवडणूक लढविलेले कुवरसिंग वळवी, भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून गेलेले डॉ.नरेंद्र पाडवी हे उपस्थित होते. स्वत: डॉ.नटावदकर यांनी २००४ व २००९ मध्ये भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाचे मातब्बर नेते हे नटावदकर यांच्याबाजूने उभे असल्याचा संदेश त्यातून गेला. डॉ.हीना गावीत या भाजपच्या जिल्हाध्यक्षदेखील आहेत. त्यांचे भाजपचे दुसरे आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह निष्ठावंतांशी चार वर्षात त्यांचे फारसे जमले नाही. कार्यकारिणीला स्थगितीसारखे प्रकार घडले. मूळ राष्टÑवादीतून आलेल्या नेते, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये महत्व दिले जात असल्याची निष्ठावंतांची तक्रार होती. हे मतभेद संपविण्यात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, विद्यमान पालकमंत्री जयकुमार रावल आणि पक्षश्रेष्ठी यांना यश आलेले नाही, हेच बंडखोरीमुळे दिसून आले. काँग्रेसमध्ये बंडाचे वारे होते, पण भरत गावीत यांची पक्ष प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी समजूत घातली.
धुळयात अनिल गोटे हे महापालिका निवडणुकीपासून भाजपपासून दूर गेले होते. तेव्हा दिलेला आमदारकीचा राजीनामा रोखला गेला, पण यावेळी भाजपने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. महापालिका निवडणुकीत गोटेंना आलेले अपयश पाहता त्यांची बंडखोरी दखलपात्र नसल्याचे भाजपने मानलेले दिसते. तात्विक मुद्यापेक्षा ते वैयक्तिक टीकाटिपण्णी अधिक करीत आहेत.
उमेदवारापेक्षा पक्षाकडे पाहून मतदान करा, असा संदेश पक्षाकडून नेहमी दिला जात असतो. नटावदकर आणि गोटे यांच्या समर्थकांना असे मनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात कितपत यश मिळते, ते २३ मे रोजी कळेल.
दिलवरसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी, डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.सुहास नटावदकर अशी मोजकी मंडळी म्हणजे जनसंघ, भाजप अशी ओळख होती. दिलवरसिंग पाडवी हे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. डॉ.नरेंद्र पाडवी हे विधानसभेत निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार एक ते दोन लाखापर्यंतची मते मिळवित असतो, हा इतिहास आहे. विस्तारवादी भूमिकेतून भाजपने डॉ.हीना गावीत यांना २०१४ मध्ये तिकीट दिले. आणि भाजपच्या पहिल्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. पूर्वी नरेंद्र पाडवी यांनी बंड पुकारले, आता नटावदकरांनी पुकारले आहे.

Web Title: Curiosity about the impact of the BJP rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.