जळगाव जिल्ह्यात सहा वर्षात २५६८ अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:11 PM2019-07-17T13:11:11+5:302019-07-17T13:11:41+5:30

सहा महिन्यात ४६५ जण ठार

2568 accidental deaths in Jalgaon district in six years | जळगाव जिल्ह्यात सहा वर्षात २५६८ अपघाती मृत्यू

जळगाव जिल्ह्यात सहा वर्षात २५६८ अपघाती मृत्यू

Next

जळगाव : जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यात जिल्ह्यात ४६५ अपघात झाले असून त्यात २४० जणांचा मृत्यू झाला आहे. ४७७ जण जखमी झालेले आहेत. त्यात ३१५ जण गंभीर तर १६२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात अपघाताचे दर महिन्याला ३०० ते ३५० रुग्ण दाखल होतात, तर खासगी दवाखान्यांची देखील हीच संख्या आहे.
मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या एका वर्षात जिल्ह्यात ८२५ अपघात झाले त्यात ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४४३ जण गंभीर जखमी तर ४५४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात ४ हजार ८९७ अपघात झाले. त्यात २ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार २६३ जण गंभीर तर ४ हजार ५९५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. संपूर्ण देशात दर वर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. तर जखमींची संख्या त्यापेक्षा दोन ते तीन पट आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यात झालेल्या अपघातांची जिल्हा रुग्णालय किंवा पोलीसात नोंद होत नसते. याची आकडेवारी गृहीत धरली तर आणखी संख्या वाढू शकते.
आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.
ब्लॅक स्पॉटवरच अपघात
देशात दहशवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाºया तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीन पेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाय योजना करण्यात आल्या आहे. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत. तेथे अद्यापही कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. तीन दिवसांपूर्वी सावखेडा येथील तरुणाचा बळी हा ब्लॅक स्पॉट असलेल्या शिव कॉलनीजवळच गेला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाहीच
वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नही’ च्या अधिकाºयांची तसेच सर्वपक्षीय पदाधिकाºयांची बैठक घेऊन अपघातास कारणीभूत ठरणाºया अधिकाºयांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत एकाही घटनेत सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा कोणावर दाखल झालेला नाही. उलट गेल्या वर्षी नशिराबादजवळ झालेल्या अपघातात मृत तरुणांविरुध्दच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पोलिसांनी केला होता.
अमृत योजनेच्या कामामुळे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यात दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरीपेक्षा २ ते ३ टक्के रुग्ण या अपघातांचे वाढले आहेत. हात,पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील किरकोळ अपघातामुळे जखमींची संख्या वाढली आहे. -डॉ.प्रताप जाधव, अस्थिरोग तज्ज्ञ

जिल्हा रुग्णालयात अपघाताचे रोज १० ते १५ रुग्ण दाखल होतात. महिन्याचा आकडा ३५० च्यावर आहे. बहुतांश रुग्ण प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात हलविले जातात. प्रत्येक अपघाताचे वेगवेगळे कारण आहे.
-डॉ.दत्तात्रय बिराजदार, अतिदक्षता विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय

Web Title: 2568 accidental deaths in Jalgaon district in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव