भारताची दादागिरी खपवून घ्यायला आम्ही म्यानमार नाही - पाकिस्तानचा इशारा
By admin | Published: June 11, 2015 09:34 AM2015-06-11T09:34:37+5:302015-06-11T10:04:45+5:30
पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही असे सांगत सीमेपलीकडून येणा-या धमक्यांसमोर आम्ही कधीच गुडघे टेकणार नाही' असा इशारा पाकिस्तानचे मंत्री निसार अली खान यांनी दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ११ - भारतीय लष्कराच्या जवानांनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या केलेल्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला असून ' पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही' असा इशारा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी दिला आहे. तसेच ' सीमेपलीकडून येणा-या धमक्यांसमोर आम्ही कधीच गुडघे टेकणार नाही' असेही त्यांनी म्हटले आहे.
माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना खान यांनी हे वक्तव्य केले. 'भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही इतर देशांना एक इशारा आहे' असे राठोड यांनी म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य निसार खान यांना चांगलेच झोंबले असून त्यांनी तत्काळ राठोड यांना प्रत्युत्तर दिले. 'पाकिस्तान हा काही म्यानमारसारखा देश नाही, हे भारताने स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानी सैन्य कोणालाही सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे, हे पाकिस्तानविरोधात कट रचणा-यांनी लक्षात ठेवावे' असे ते म्हणाले.
' भारतीय नेत्यांनी दिवसा स्वप्न पाहण सोडावं, भारताचे 'नापाक इरादे' कधीच यशस्वी होणार नाहीत. पाकिस्तान भारताची दादगिरी कधीही खपवून घेणार नाही' असेही खान यांनी खडसावले आहे.