''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:15 AM2019-01-22T06:15:05+5:302019-01-22T07:30:32+5:30

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम)मध्ये फेरफार करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला गेला, असा सनसनाटी आरोप भारतीय सायबरतज्ज्ञ सईद शुजा यांनी भाजपाला उद्देशून केला.

Victory won by BJP in 2014 by EVM hack | ''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''

''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''

googlenewsNext

लंडन : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम)मध्ये फेरफार करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला गेला, असा सनसनाटी आरोप भारतीय सायबरतज्ज्ञ सईद शुजा यांनी भाजपाला उद्देशून केला. ईव्हीएम मशिन हॅक करणे सहज शक्य आहे असाही दावा त्यांनी केला. शुजा यांनी अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागितला आहे.
येथून स्काइपद्वारे घेतलेल्या व इंडियन जर्नालिस्टस असोसिएशन (युरोप) या संघटनेने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओ कंपनीने ईव्हीएम हॅक करण्यासाठी लो फ्रिक्वेन्सी सिग्नल मिळण्यास भाजपाला मदत केली होती. आताच्या विधानसभा निवडणुकांतही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये ट्रान्समिशन हॅक करण्याचे भाजपाचे प्रयत्न माझ्या सहकाऱ्यांनी तंत्रज्ञानाने हस्तक्षेप करून हाणून पाडले नसते तर या राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपा नक्कीच जिंकला असता.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळीही ईव्हीएम हॅक करण्याचा भाजपाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. त्यामुळे भाजपाला दिल्लीत अवघ्या तीन व आपला ६७ जागा मिळाल्या, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्र, गुजरात व उत्तर प्रदेशात २0१४ सालनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकाही हॅक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती आपण गौरी लंकेश यांना दिली होती. त्यांनी याविषयीची बातमी प्रसिद्ध करण्याचे मान्य केले होते, असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बल हजर होते. शुजा म्हणाले की, ईव्हीएमची निर्मिती करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (इसीआयएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या पथकात माझा समावेश होता. मी २००९ ते २०१४ या काळात कंपनीसाठी काम केले. ईव्हीएम हॅक करता येणे शक्य आहे हे शोधून काढण्याचे काम आमच्याकडे होते. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुका ईव्हीएममध्ये गोलमाल करून जिंकण्यात आल्या आहेत. माझ्या काही सहकाºयांची हत्या झाल्यानंतर जिवाच्या भीतीने मी भारतातून २०१४ साली पळून गेलो. ईव्हीएमशी छेडछाड करणे शक्य नसून या यंत्रांची तज्ज्ञ मंडळींकडून देखभाल केली जाते असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटले होते. त्याला छेद देणारी विधाने सईद शुजा यांनी केली. पत्रकार परिषदेत सईद यांनी चेहरा झाकून घेतला होता.
शुजा यांनी रिलायन्स जिओ कंपनीचा उल्लेख पत्रपरिषदेत केला. जिओ कंपनीने २७ डिसेंबर २0१५ रोजी काम सुरू केले. ती २0१0 साली स्थापन झाली होती. पण ती प्रत्यक्षात दूरसंचार क्षेत्रात सक्रिय नव्हती.
या संदर्भात दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी लोकमतने इसीआयएल कंपनीच्या जनसंपर्क अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना संदेशही पाठविला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
>काँग्रेसचा हॅकिंग हॉरर शो -भाजपा
सईद शुजा यांची पत्रकार परिषद म्हणजे काँग्रेसचा हॅकिंग हॉरर शो होता, अशी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. शुजा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना ते म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधींसह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी आपले ‘पोस्टमन’ म्हणून कपिल सिब्बल यांना शुजा यांच्या परिषदेसाठी पाठवले असावे. ईव्हीएम कधीही हॅक करता येणे शक्य नाही.
>निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक झाल्याचे आरोप फेटाळले
निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक झाल्याचा सईद शुजा यांचा आरोप ठामपणे फेटाळून लावला आहे. ईव्हीएम सरकारी कंपनीतच बनवली जातात, ती हॅक करता येणे शक्य नाही, असे निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट केले आहे.
>गोपीनाथ मुंडेंची हत्या - शुजा
या निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंगद्वारे विजय मिळविण्यात आला हे भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना माहीत होते. ते ती माहिती जाहीर करण्याची शक्यता असल्याने त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप शुजा यांनी केला. ते म्हणाले की, मुंडेंच्या हत्येप्रकरणी एनआयएचे अधिकारी तन्झिल अहमद एफआयआर दाखल करणार होते. पण ते स्वत:च मरण पावले.
>आरोपांविषयी काहीच सांगू शकत नाही -काँग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, शुजा यांनी केलेले आरोप इतके गंभीर आहेत की, त्याविषयी काहीच बोलणे शक्य नाही. ते खरे आहेत की खोटे आहेत, याबद्दल काहीही सांगता येत नाही.

Web Title: Victory won by BJP in 2014 by EVM hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.