मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे?
By Admin | Published: May 26, 2015 01:44 AM2015-05-26T01:44:34+5:302015-05-26T01:44:34+5:30
मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे.
क्वालालंपूर : मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे. मानवी तस्कर या दफनभूमींचा वापर करीत असावेत, अशी भीती मलेशियाचे गृहमंत्री झाहिद हामिदी यांनी व्यक्त केली आहे.
मलेशियन वर्तमानपत्रांच्या माहितीनुसार एका मानवी शिबिराच्या ठिकाणी शंभर मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या महिनाभराच्या काळामध्ये असे मृतदेह, त्यांचे अवशेष व स्थलांतरितांची बेकायदेशीर शिबिरे मलेशिया व थायलंडच्या सीमेवरील जंगलात अनेक ठिकाणी आढळली आहेत. बांगलादेश व म्यानमारमधून पळालेले रोहिंग्या बोटींद्वारे या भागामध्ये उतरत असून त्यांच्या अशा अनेक ठिकाणी तात्पुरत्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे रोहिंग्यांच्या अवैध स्थलांतराबरोबर तस्करीची समस्याही अंदमानच्या टापूतील हिंदी महासागरालगतच्या सर्व देशांमध्ये वाढली आहे.
मृतदेह सापडण्याच्या घटनेचे वर्णन मलेशियातील प्रमुख पोलीस अधिकारी खालीद अबू बकर यांनी अत्यंत दु:खी घटना असे केले आहे. या परिसरामध्ये साधारणत: १३९ सामुदायिक दफनभूमी आढळल्या आहेत. या सर्व अवशेषांची न्यायवैद्यक तपासणी होणार असल्याचेही खालीद यांनी स्पष्ट केले आहे.
१० मे पासून ३६०० रोहिंग्या मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया यांच्या किनाऱ्यावर उतरले असावेत असे सांगण्यात येते. या दफनभूमींमुळे म्यानमार आणि बांगलादेशमधून पूर्वेस बोटींनी येणाऱ्या रोहिंग्यांचा प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचे जाणवत आहे. २९ मे रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या बैठकीत मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार व इतर देश यावर लवकरात
लवकर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)
४बांगलादेशातून पळून जाणारे लोक मानसिकदृष्ट्या रोगी आहेत, इतर देशांमध्ये आश्रय शोधण्यापेक्षा बांगलादेशात जीवन चांगले आहे, असे धक्कादायक विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी केले आहे.
४पळून जाणाऱ्या या लोकांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थलांतर करणाऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा दिली पाहिजे, कारण त्यांच्यामुळे पळून जाणाऱ्या व्यक्तींचे प्राणही धोक्यात जात आहेत, असे त्या म्हणाल्या.