रेल्वे प्रशासनाला २१ वर्षांनंतर सुचले शहाणपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:54 AM2017-07-25T00:54:19+5:302017-07-25T00:54:19+5:30
नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आरक्षित बोगीत बसण्यास मनाई : प्रवासी संतप्त, सर्वच पक्षांचा आंदोलनाचा इशारा, रेल्वेच्या दोन विभागातील वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे. आरक्षीत बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गेल्या आठवडाभरापासून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. कारवाई करण्याचे शहापण रेल्वे विभागाला तब्बल २१ वर्षांनंतर कसे सुचले असा सवाल केला जात आहे.
मुंबई-हावडा मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. येथून दररोज ७० ते ८० रेल्वे गाड्या धावतात. येथे बाजारपेठ व शासकीय कार्यालये असल्याने हजारो प्रवाशी दररोज रेल्वेने ये-जा करतात. गोंदियावरुन नागपूर आणि नागपूरवरुन गोंदिया असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नागपूरवरुन गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा प्रश्न मार्गी लावला.या गाडीला एकूण १९ बोगी असून सुरूवातीपासूनच आरक्षीत बोगीत जनरल तिकिटावर गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास करु दिला जात
होता. त्यामुळे प्रवाशांना सुध्दा सुविधा होत होती. विशेष म्हणजे याच गाडीत दुधवाल्यांसाठी एक स्वतंत्र बोगी देण्यात आली. गेल्या २१ वर्षांपासून गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून करित होते. पण, तब्बल
२१ वर्षांनंतर मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरवरुन गोंदियाला येणाऱ्या प्रवाशांना जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई केली. मागील आठवड्यापासून प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे
प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. नागपूर रेल्वे स्थानक मध्यरेल्वेमध्ये तर गोंदिया रेल्वेस्थानक दक्षिणपूर्व मध्ये रेल्वे विभागात येतो. महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदियावरुन नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई व कारवाई केली जात नाही. मात्र नागपूरवरुन येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वेच्या दोन विभागातील वादात प्रवाशांचा बळी जात असल्याचा ओरड आहे. त्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाला कारवाई करण्याचे शहापण कसे सुचले असा सवाल केला जात आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करण्याची तरतूद नियमात पूर्वीपासूनच होती. मात्र त्याची अंमलबजावी आता केली जात असल्याचे सांगितले.