ताई, बाई, अक्काच लावणार धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:47 AM2019-02-21T00:47:44+5:302019-02-21T00:49:15+5:30
‘ताई,बाई, अक्का विचार करा पक्का...’ हे घोषवाक्य निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वापरले जाते. मात्र जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत हे घोषवाक्य तंतोतंत लागू होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘ताई,बाई, अक्का विचार करा पक्का...’ हे घोषवाक्य निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वापरले जाते. मात्र जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत हे घोषवाक्य तंतोतंत लागू होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ५ लाख ४० हजार २२० महिला मतदारांची संख्या असून नवीन मतदार यादीनुसार १३ हजार ५९३ महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे. यातूनच जिल्ह्याची नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आता जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ मतदार आहेत. यात ५ लाख ३५ हजार ७१५ पुरूष तर ५ लाख ४० हजार २२० महिला व १ अन्य मतदारांचा समावेश आहे. नवीन मतदार यादीनुसार जिल्ह्यात ४ हजार ५०५ महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांच्या संख्येने अधिक आहे. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना महिला मतदारांना जास्तीत जास्त आकर्षीत करणे गरजेचे झाले आहे.
विशेष म्हणजे, मागील मतदार यादीनुसारही जिल्ह्यात महिला मतदारांचीच संख्या अधिक होती. तर मागील मतदार यादीनुसार, जिल्ह्यात १० लाख ५० हजार २६१ मतदार होते. यात ५ लाख २३ हजार ६३५ पुरूष तर ५ लाख २६ हजार ६२४ महिला व २ अन्य मतदारांचा समावेश होता. म्हणजेच, मागील यादीतही २ हजार ९८९ महिला मतदारा पुरूष मतदारांच्या तुलनेत जास्त होत्या. एकंदर, ३१ जानेवारी २०१९ च्या नवीन मतदार यादीनुसार, जिल्ह्यात २५ हजार ६७५ मतदारांची वाढ झाली आहे. यात १२ हजार ८० पुरूष, १३ हजार ५९६ महिला मतदारांची वाढ झाली आहे. मात्र अन्य मतदारांत १ घटला असून यंदा फक्त १ अन्य मतदाराची नोंद करण्यात आली आहे.
यावरून निवडणुकीतील उमेदवारांना महिला मतदारांकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे असणार आहे. महिलांची संख्या जास्त असल्याने उमेदवारांना तारण्यासाठी त्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळेच ‘ताई, बाई, अक्काच उमेदवाराला धक्का देऊन पुढे विजयाचा मार्ग मोकळा करणार असे म्हणणे वागवे होणार नाही.