विद्यार्थी १४ दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:04 PM2017-09-16T22:04:42+5:302017-09-16T22:05:01+5:30
मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा गेला १२ दिवसांपासून खंडित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना गेल्या १४ दिवसांपासून अंधारात झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब शनिवारी (दि.१६) उघडकीस आली आहे.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा गेला १२ दिवसांपासून खंडित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना गेल्या १४ दिवसांपासून अंधारात झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब शनिवारी (दि.१६) उघडकीस आली आहे. शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक घटना घडत असताना त्याची अद्यापही या विभागाच्या अधिकाºयांनी दखल घेतली नसल्याचे चित्र आहे.
गोंदिया शहराला लागून असलेल्या मुर्री येथे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. आदिवासी दुर्गम भागातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. सध्या या वसतिगृहात इयत्ता ६ ते १० चे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. घरापासून दूर राहून चांगले शिक्षण घेवून काहीतरी बनण्याच्या अपेक्षेने हे विद्यार्थी येथे आले.
मात्र येथे त्यांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. शनिवारी एका विद्यार्थ्याचे पालक त्यांच्या पाल्याला भेटण्यासाठी येथे आल्यानंतर पाल्य आणि इतर विद्यार्थ्यांनी गेल्या १४ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याचे सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गेल्या १४ दिवसांपासून विद्यार्थी अंधारात राहत असल्याने त्यांचाही संताप अनावर झाला. त्यांनी लोकमत कार्यालयाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर लोकमत प्रतिनिधीने या वसतिगृहाला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता मागील १४ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याच्या गोष्टीला दुजोरा मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी येथील असुविधांचा पाढा वाचला. एका शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा १४ दिवसांपासून खंडित असून त्याची दखल घेण्यास समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुध्दा दखल घेत नसल्याचे बाब पुढे आली. विशेष म्हणजे सामाजीक न्याय विभागाचे मंत्री असलेले राजकुमार बडोले यांच्याच जिल्ह्यात शासकीय निवासी शाळांची ही स्थिती आहे. तर अन्य जिल्ह्यात काय असेल सवाल एका पालकांने उपस्थित केला.
पत्र व्यवहार करून विभाग मोकळा
या शासकीय निवासी शाळेचे गृहपाल उमेश लोखंडे यांनी खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला पत्र दोनदा पत्र दिले. मात्र त्यांनी हातवर केल्याने त्यांनी या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना पत्र दिले. मात्र त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. यासर्व प्रकारची माहिती समाज कल्याण उपायुक्तांना दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
देखभाल दुरूस्तीची जबाबदारी बांधकामकडे
मुर्री येथे शासकीय अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेची चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळ आणि त्याच्या वरच्या मजल्यावर अभ्यास, भोजन आणि इतर गोष्टींची सुविधा आहे. तर तिसºया मजल्यावर विद्यार्थ्यांच्या झोपण्याची व्यवस्था आहे. मागील २ सप्टेंबरला शार्ट सर्कीटमुळे इमारतीच्या तिसºया मजल्यावरील संपूर्ण वायरिंग जळाली. त्यामुळे या मजल्यावरील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. इमारतीच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे गृहपाल लोखंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करुन देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही.
विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
मुर्री येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विजेच्या समस्येबाबत विचारणा केली असता त्यांनी येथील विविध समस्यांचा पाढा वाचला.गेल्या १४ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे, त्यामुळे अंधारात झोपावे लागत असल्याचे भीत भीत सांगितले. जेवण देखील चांगले मिळत नसून त्याची तक्रार अधिकाºयांकडे केली तर त्यांच्याकडून दमदाटी केली जात असल्याचे सांगितले.
शार्ट सर्किटमुळे वसतिगृहाचा विद्युत पुरवठा गेल्या १४ दिवसांपासून खंडित आहे. तो सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वांरवार पाठपुरावा केला. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून सध्या त्यांची व्यवस्था पहिल्या अणि दुसºया मजल्यावरील खोल्यांमध्ये केली आहे.
- उमेश लोखंडे, गृहपाल.
.........................................
शासकिय वसतिगृहाच्या खंडित वीज पुरवठ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. विद्युत दुरूस्तीची बाब खर्चिक असल्याने ती आम्हाला करता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचीच ही जबाबदारी आहे.
-मंगेश वानखेडे, समाजकल्याण उपायुक्त