थेट केंद्रांवर पोहोचले मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:57 PM2018-05-21T22:57:32+5:302018-05-21T22:58:13+5:30

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात झालेल्या निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८२ पैकी २८१ मतदारांनी सहभाग घेतला.

Voters reaching live centers | थेट केंद्रांवर पोहोचले मतदार

थेट केंद्रांवर पोहोचले मतदार

Next
ठळक मुद्देचामोर्शी केंद्रावर एक गैरहजर : सहा केंद्रांवर २८१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात झालेल्या निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८२ पैकी २८१ मतदारांनी सहभाग घेतला. चामोर्शी मतदान केंद्रावर एक मतदार गैरहजर होते. जिल्ह्यात गडचिरोली, कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी, अहेरी व एटापल्ली या सहा केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींचे सदस्य, जि.प.सदस्य मिळून आणि पंचायत समित्यांचे सभापती मिळून एकंदरीत २८२ मतदार होते. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती मिळून ६३, गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषद मिळून ५० नगरसेवक आणि जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या १६९ सदस्यांचा समावेश होता. भाजपच्या मतदारांची संख्या काँग्रेसच्या तुलनेत जास्त असली तरी भाजपच्या मतदारांना अपेक्षित लाभ मिळण्याची स्थिती दिसत नसल्यामुळे त्यांच्यात काहीसा नाराजीचा सूर होता. याचा फायदा घेत काँग्रेसने त्यांना हेरण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात काँग्रेसला यशही आल्याने भाजपने सावध होऊन आपल्या मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्यांना सहलीसाठी हैदराबादला नेले. पण तेथूनही काही मतदार काँग्रेसच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे.
भाजपच्या मतदारांना खुश करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून चालढकल सुरू होती. परंतू शेवटी भाजपने त्यांची शक्य तितकी समजून काढल्याने भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर हे विजयी होतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत होता. मात्र त्यातही कुठे गडबड तर झाली नाही ना, अशी शंकाही पदाधिकाºयांच्या चेहºयावर झळकत होती.
गडचिरोली केंद्राबाहेर टाकलेल्या भाजपच्या मंडपात खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, पक्षाचे निरिक्षक महादेव सुपारे, जि.प.चे माजी अध्यक्ष रविंद्र ओलालवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रकाश अर्जुनवार आदी अनेक पदाधिकारी बराच वेळपर्यंत उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते व इतर पदाधिकारी गडचिरोली केंद्रावर हजर होते. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्गेश सोनवाने, नायब तहसीलदार एस.के.चडगुलवार आदी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
मतदानापर्यंत मतदार नजरकैदेत
आपल्या हक्काचे मतदार दुसऱ्या उमेदवाराच्या हाती लागू नये म्हणून भाजपने त्यांना हैदराबादला सहलीसाठी नेले होते. तेथून ते वेगवेगळ्या वाहनांनी पदाधिकाºयांच्या देखरेखीत ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर पोहोचले. मतदान आटोपल्यानंतरच त्यांची ‘नजरकैदे’तून सुटका झाली. मात्र त्यातही काही मतदारांनी हुलकावणी दिल्याची चर्चा सुरू होती. भाजप प्रमाणेच काँग्रेसचेही मतदार सहलीवरून थेट मतदान केंद्रांवर पोहोचले.
चुरस वाढल्याने उत्सुकता
गेल्या आठवडाभरातील घडामोडींमुळे सुरूवातीला एकतर्फी वाटणाºया या निवडणुकीत नंतर बरीच चुरस निर्माण झाली. त्यामुळे निकाल काय लागतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. येत्या २४ मे रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. कोणी कोणाचे किती मतदार आपल्या बाजुने वळविण्यात यशस्वी झाले हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: Voters reaching live centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.