ओबीसी व आदिवासींना सरकारने बनवले लढाईतील कोंबडे- पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:35 PM2018-09-19T22:35:56+5:302018-09-19T22:36:39+5:30

गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे.

OBC and Adivasis were made by the government | ओबीसी व आदिवासींना सरकारने बनवले लढाईतील कोंबडे- पटोले

ओबीसी व आदिवासींना सरकारने बनवले लढाईतील कोंबडे- पटोले

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा मेळावा : संविधान संपवण्याचा डाव हाणून पाडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे. पण ही वेळ भांडायची नाही. शोषित, पीडित समाजातील माणूस मुख्य प्रवाहात आला पाहीजे हे संविधानाचे मूळ असताना सरकारला ते नको आहे, असे सांगत संविधान संपवण्याचा या सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलचे अध्यक्ष, माजी खा.नाना पटोले यांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पटोले बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी होते. यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.आनंदराव गेडाम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश ईटनकर, डॉ.नामदेव किरसान, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, डॉ.नितीन कोडवते, पेंटाराम तलांडी आदींसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले, भाजप सरकार आल्यापासून राज्यात सतत दुष्काळ पडत आहे. हे सरकार अपशकुनी आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देत नाही पण सामान्य लोकांच्या खिशातून वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून वसुली केली जाते. गोरगरीबांची मुले शिकू नये म्हणून विविध अभ्यासक्रमांची भरमसाठ फी वाढ केली आहे. बहुजन नेत्यांना संपवण्याचे काम ब्राह्मणवादी विचारसरणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी डॉ.उसेंडी यांनी भाजपवर टिका करताना स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काय योगदान होते, ते तर आयत्या बिळात नागोबा झाले असे सांगितले. काँग्रेससोबत भाजपेतर पक्षांनी मिळून लढावे. सोबतच काँग्रेसच्या लोकांनी थोडे जमिनीवर येऊन काम करण्याची गरज आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी इतरही नेत्यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन विनोद खोबे आणि प्रा.दौलत धुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेवक सतीश विधाते यांनी केले. मेळाव्याला किशोर वनमाळी, मनोहर पाटील पोरेटी, जयंत हरडे, संजय चरडुके, रवी शहा, मनिषा डोनारकर, राजू जिवानी, हरिश मोटवानी, संजय पंदीलवार, प्रभाकर तुलावी, प्रल्हाद खराटे, महेंद्र ब्राह्मणवाडे, अधिर इंगोले, वैभव कडस्कर, अमोल भडांगे, जीवन नाट, रहीम शेख, नेताजी गावतुरे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, सी.बी.आवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरजागड तारक तर मेडीगड्डा मारक
यावेळी नाना पटोले यांनी जिल्ह्यातील लोहखनिजाची विपुलता पाहता सुरजागडच्या खाणींमध्ये जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. लोहखनिजाची वाहतूक इतर जिल्ह्यात न करता जिल्ह्यातच प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेला मेडीगड्डा प्रकल्प जिल्हावासियांसाठी मारक असल्याने त्याला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हाणी होत आहे. जंगलाची कटाई झाली, लोक विस्थापित झाले, पण पाण्याचा उपयोग या जिल्हावासियांना होणार नाही, याचा जाब नागरिकांनी विचारावा असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठांचा सत्कार आणि जीआरची होळी
यावेळी कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असलेल्या जिल्ह्यातील वयोवृद्ध काँग्रेस नेत्यांचा नाना पटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी मंचावरील सर्व पदाधिकारी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या ज्येष्ठ नेत्यांजवळ गेले. या कार्यक्रमानंतर ओबीसींवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या जीआरची होळी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
विविध संघटनांच्या वतीने सत्कार
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गडचिरोलीत आल्याबद्दल नाना पटोले यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तसेच विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: OBC and Adivasis were made by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.