ब्रिटिशकालीन विश्रामगृह मोजताहे शेवटच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:13 AM2018-03-19T00:13:13+5:302018-03-19T00:13:13+5:30
एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीचे असलेल्या आष्टी येथील विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे मात्र आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
सुधीर फरकाडे ।
ऑनलाईन लोकमत
आष्टी : एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीचे असलेल्या आष्टी येथील विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे मात्र आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सदर विश्रामगृह व परिसर पूर्णपणे भकास झाला असून विश्रामगृहाची इमारत शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते.
आष्टी शहराचे महत्त्व ओळखून आष्टी येथे इंग्रजांनी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आकर्षक असे विश्रामगृह बांधले. इंग्रज राजवटीत या विश्रामगृहात इंग्रज अधिकाऱ्यांचा राबता राहत होता. या विश्रामगृहाच्या इंग्रज राजवट संपल्यानंतर सदर विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आले. पूर्वी या विश्रामगृहाच्या परिसरात अभियंत्यांची निवासस्थाने होते. या ठिकाणी कनिष्ठ अभियंते राहत होते. विश्रामगृहाच्या अगदी समोर सुंदर असा बगिचा तयार केला होता. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुध्दा वाढली होती. आता मात्र निवासस्थानांमध्ये अभियंते राहत नाही.
सध्या या विश्रामगृहाचा कुणीच वाली नाही. परिणामी या परिसरात कचरा जमा झाला आहे. मुलांसाठी असलेली खेळणी नष्ट झाली आहेत. बगिचातील झाडे करपली आहेत व त्यांच्या ऐवजी गवत वाढले आहे. विश्रामगृहाच्या समोरील भागात एक मोठी छत्री बांधण्यात आली होती. त्यावरील टिन आता तुटले आहेत. विश्रामगृहाच्या आवारातील लोखंडी गेट पडले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांवरील कवेलू उडून गेले आहेत. संरक्षण भिंत सुध्दा कोसळली आहे. काही दिवसाने विश्रामगृहाच्या मुख्य इमारतीलाही धोका आहे.
रिसॉर्ट बनविण्याचे स्वप्न अपूर्णच
या विश्रामगृहाला रिसॉर्ट बनविण्याचा प्रशासनाचा विचार होता. मार्र्कंडा ते चपराळा येथे जाणाºया पर्यटकांच्या जेवनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार होती. वैनगंगा नदीत जलपर्यटन प्रायोगिक तत्वावर सुरू केले जाणार होते. मात्र हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.