आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:01 AM2019-01-18T00:01:30+5:302019-01-18T00:02:15+5:30

१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.

Breathing with the roads in Ashtani | आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतने हटविले अतिक्रमण : फळविक्रेत्यांनी लावली कठड्यांच्या आतमध्ये दुकाने; भाजीविक्रेतेही हटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : १० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.
आष्टी हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. चामोर्शी, गोंडपिपरी, आलापल्लीवरून येणारे रस्ते आष्टीतील चौकात एकमेकांना मिळतात. तिनही मार्गावर बसथांबे आहेत. चंद्रपूर, आलापल्ली, चामोर्शी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फळ व इतर साहित्याची दुकाने लावण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये येणारे दुकानदार रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. बरेचदा चामोर्शी व गोंडपिपरीवरून आलेली वाहने फळांच्या दुकानामध्ये शिरल्याने अपघात झाले आहे. १० जानेवारी रोजी फळांच्या दुकानाजवळ एक युवक दुचाकी वाहनावर बसून पाहुण्यांची वाट बघत होता. दरम्यान एका पीकअप वाहनाने चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीला धडक दिली. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. याच अपघातात चार जण जखमी सुद्धा झाले. याअगोदर चंद्रपूरवरून आलापल्लीकडे जाणाऱ्या ट्रकने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला होता.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात चारही मार्गाने येणारी वाहने, आष्टी शहरातील वाहने, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पायदळ नागरिक व इतर प्रवाशी यांची नेहमी वर्दळ राहते. त्याचबरोबर छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ट्रेलरनेही बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी होते. दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरूंद झाला आहे. त्यामुळे पायदळ जाणाºयालाही पुरेशी जागा राहत नाही. जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर व्यापारी, ग्राहक व इतर नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. ही वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस शिपायाने पुढाकार घेण्याची गरज आहे. काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. त्याचबरोबर समोर दुकानाएवढे शेडही उभारले आहे.
या सर्व परिस्थितीमुळे आष्टी शहरात दरदिवशी लहान-मोठे अपघात होत असतात. अपघात होण्याची अनेक कारणे असली तरी अतिक्रमण हा त्यातील मुख्य कारण आहे.
१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली. ग्रामपंचायतीने सर्व फळविक्रेत्यांना नोटीस बजावून १६ जानेवारीपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मुदत दिली होती. स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास ग्रामपंचायत कारवाई करून आपल्या पद्धतीने अतिक्रमण हटवेल, असा इशारा नोटीसमधून दिला होता. या नोटीसमुळे हादरलेल्या दुकानदारांनी १७ जानेवारी रोजी सकाळीच दुकाने हटविली. ही दुकाने कठड्याच्या आत लावली आहेत.

पुन्हा अतिक्रमण न होण्याबाबत खबरदारी गरजेची
ग्रामपंचायतीच्या नोटीसनंतर फळविक्रेत्यांनी १७ जानेवारी रोजी स्वत:हून दुकाने हटवून कठड्यांच्या मागे लावली. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, ग्रामविकास अधिकारी बारसागडे, यांच्या नेतृत्त्वातील पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाºयांनी चौकात असलेली भाजीविक्रेत्यांची दुकानेही हटविली. चंद्रपूर मार्गावर ठेवण्यात येत असलेली अ‍ॅटो सुद्धा हटविण्याचे निर्देश दिले.
अतिक्रमण हटवून काही दिवस झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर दुकानदार आपले बस्तान मांडतात. हा अनुभव अनेकवेळा आष्टीवासीयांना आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या परिसरात ग्रामपंचायतीने फलक लावावा, या फलकावर अतिक्रमण करणाºयांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Breathing with the roads in Ashtani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.