‘पौराणिक कथांमुळेच जग उलगडते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:06 AM2017-07-26T01:06:28+5:302017-07-26T01:06:32+5:30

जगात बरेचसे असे आश्चर्य आणि गूढ आहेत, जे पौराणिक कथांमुळे उलगडतात. त्यामुळे संस्कृतीत जरी वेगाने बदल होत असले तरी, ...

world unravels with Mythological stories | ‘पौराणिक कथांमुळेच जग उलगडते’

‘पौराणिक कथांमुळेच जग उलगडते’

googlenewsNext

जगात बरेचसे असे आश्चर्य आणि गूढ आहेत, जे पौराणिक कथांमुळे उलगडतात. त्यामुळे संस्कृतीत जरी वेगाने बदल होत असले तरी, पौराणिक कथांचे महत्त्व कमी होणार नाही. पौराणिक कथा या वाहत्या नदीसारख्या आहेत. त्या एका पिढीकडून दुसºया पिढीकडे वाहत राहणार आहेत. त्यामुळे भविष्यातही पौराणिक कथा या मार्गदर्शक ठरतील, असे मत कथाकार देवदत्त पटनायक यांनी व्यक्त केले. एका टीव्ही शोच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद...
प्रश्न : तुम्हाला कथेमागची कथा मांडण्याचे कौशल्य प्राप्त आहे; या क्षेत्रात तुम्हाला केव्हापासून रुची निर्माण झाली. कोणती अशी बाब होती, ज्यामुळे तुम्हाला या क्षेत्राचे आकर्षण वाटले?
- प्रत्येक सजीवामध्ये आत्मा आहे हे जेव्हा मला कळले, तेव्हा प्रत्येक शब्दाचा एक अर्थ आहे आणि प्रत्येक कथेमागे एक बोध आहे, याचीही जाणीव झाली. चिन्हे आणि धार्मिक विधी ही आपल्या देशात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या बाबी आहेत. मला असे वाटले, की आपण त्यातले ज्ञान मिळवावे आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवावे. या कामामुळे मला आनंद मिळत गेला. अशी अपेक्षा करतो, की माझे वाचक आणि प्रेक्षक सुद्धा यामुळे आनंदी झाले असतील.
प्रश्न : पौराणिक कथांचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे? तेही आपल्यासारख्या वेगाने बदलणाºया संस्कृतीत?
- पौराणिक कथांमुळे आपल्याला हे समजण्यास मदत होते की, विविध लोकांच्या विविध ठिकाणी श्रद्धा असतात. त्याकडे आपण सकारात्मकपणे बघितले पाहिजे. पौराणिक कथांमुळे आपली मानसिकता, विविधता आणि बदलांना सकारात्मकता येते. जग हे आनंददायी ठिकाण आहे. त्यात अनेक आश्चर्य आणि गूढ गोष्टी आहेत. हे आपल्याला पौराणिक कथांमुळेच समजते.
प्रश्न : या टीव्ही शोमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता; लिखाणापेक्षा टीव्हीवर कथा सांगणे सोपे वाटले काय?
- खरं तर या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले. खरं तर कॅमेºयासमोर उभं राहण्याचा मला अनुभवच नव्हता. मात्र माझे प्राधान्य प्रेक्षक असल्याने मी सहजपणे कॅमेºयासमोर गेलो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मी सुरुवातीपेक्षा आता चांगले हिंदी बोलू लागलो आहे. या टीव्ही शोच्या ‘सीझन-१’च्या सूत्रसंचालक हिमांशी चौधरी आणि सीझन-२ व ३च्या रसिका दुग्गल यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. दोघेही व्यावसायिक कलाकार आहेत. दोघांनीही मला बरेच काही शिकविले. त्यांच्या सूचनाच मला स्वत:ला बारा तासांच्या शूटिंगदरम्यान ताजेतवाणे ठेवण्यासाठी कामी आल्या.
प्रश्न : सीजन-३ मधून प्रेक्षकांना काय नवीन मिळणार आहे?
- प्रेक्षकांना सीजन-३ दरम्यान अनेक नवीन कथा तसेच रामायण, महाभारत, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मांशी संबंधित बाबींवर चर्चा ऐकण्यास मिळणार आहेत. या सर्व गोष्टी करताना त्यांचा मूळ गाभा आणि श्रद्धेच्या बाबी आहे तशाच राहतील. आम्ही फक्त आम्हाला माहीत असलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर

मांडणार आहोत. आमचे ज्ञान मर्यादित आहे. पण पौराणिक कथांमधील ज्ञान अमर्यादित आहे.
प्रश्न : भारतीय पौराणिक कथांमधील सर्वांत मौल्यवान गोष्ट कुठली? अशा कुठल्या गोष्टी पौराणिक कथांमध्ये आहेत, ज्या आपल्याला माहीत नाहीत?
- जीवनाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, असा आपल्याकडे समज आहे. पण सुरुवातीच्या अगोदर आणि अंताच्या नंतर काही तरी असलेच पाहिजे. कुठलीही गोष्ट अमर नसते. इतकेच नाही तर मृत्यूसुद्धा खूप काळ थांबत नाही. राम आणि कृष्णासारख्या देवतांनाही अडचणींना आणि मृत्यूला सामोरे जावे लागले होते. आपण या पृथ्वीवर आपला वेळ जग बदलण्यासाठी नाही, तर जग समजून घेण्यासाठी व्यतित केला पाहिजे. आपण या जगाच्या पाठीवर दयावान सजीव म्हणून ओळखले जातो.
प्रश्न : सध्या एक तक्रार अशी केली जाते की, आपल्या नव्या पिढीला पौराणिक कथांमध्ये रस नाही, हे खरे आहे काय? त्यांना यात रस वाटावा म्हणून काय करायला हवे?
- मला नाही वाटत की, एखाद्या पिढीला पौराणिक कथांमध्ये कमी किंवा अधिक रस असतो. पौराणिक कथा या वाहत्या नदीसारख्या आहेत. अनेक कथा, प्रतीके, विधी आणि ज्ञान यांच्यामुळे पौराणिक कथा आपले आयुष्य सुखी करीत असतात. आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण नदी शोधून आपली तहान भागवितो. यासाठी आपल्याला कुठलेच बाजारी उपचार करावे लागत नाहीत. माझे लिखाण आंब्याच्या झाडासारखे आहे. जे अधिकाधिक आंब्याचे उत्पादन देत असते. आंब्याचे फळ हे फार काळ झाडाच्या ताब्यात राहत नसते.
प्रश्न : तुमचे पुढचे उपक्रम कोणते?
- या टीव्ही सिरीज-३ च्या बाबतीत माझी उत्सुकता वाढली आहे. या सिरीजच्या पुस्तकांचे प्रमोशन सुरू आहे. पुढील उपक्रम या शोचे सिरीज-४ असणार आहे. अशी अपेक्षा करतो, की सध्या चालू असलेल्या सर्व गोष्टी सुखरूप पूर्ण व्हाव्यात.

Web Title: world unravels with Mythological stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.