लिखाणानेच क्रांती आणायची आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 02:49 PM2018-09-20T14:49:14+5:302018-09-20T14:53:10+5:30

चेतन भगत सोमवारी ‘वॉव’या महिला क्लबच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी लोकमतच्या कार्यालयास भेट दिली. येथे एका छोटेखानी मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, ‘समाजात बदल आणण्याचे खूप प्रकार आहेत. यासोबतच ‘मोदी समर्थक’ ते ‘घरी राहणारा पिता’ अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास आणि काही वेळा सडेतोड उत्तरे दिली. 

will bring revolution by Writing - Chetan Bhagat | लिखाणानेच क्रांती आणायची आहे

लिखाणानेच क्रांती आणायची आहे

googlenewsNext

- शब्दांकन : सुमेध उघडे 

राजकारण, समाजकारण हा माझा पिंड नाही. मी लिहू शकतो आणि हेच माझे काम आहे. मला लिखाणाने क्रांती आणायची आहे’ अशी भूमिका देशातील अनेक प्रश्नांची अचूक नस ओळखणारे लेखक चेतन भगत यांनी मांडली.  चेतन भगत सोमवारी ‘वॉव’या महिला क्लबच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी लोकमतच्या कार्यालयास भेट दिली. येथे एका छोटेखानी मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, ‘समाजात बदल आणण्याचे खूप प्रकार आहेत. यासोबतच ‘मोदी समर्थक’ ते ‘घरी राहणारा पिता’ अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास आणि काही वेळा सडेतोड उत्तरे दिली. 

प्रश्न : लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण आपण ‘मोदी समर्थक’ होतात, अशात आपल्या मतात बदल दिसतो ?
उत्तर :
हो. २०११-१२ मध्ये भ्रष्टाचाराबाबत लोकांच्या मनात प्रचंड राग होता, लोक रस्त्यावर आले होते. देशाला बदलाची आवश्यकता  होती. तेव्हा नरेंद्र मोदी एकमेव पर्याय म्हणून पुढे आले. माझ्यासहित अनेक देशवासीयांनी त्यांना निवडून दिले, प्रधानमंत्री बनवले. सर्वच देशभक्तांनी त्यांना देशाची सेवा करण्यासाठी निवडले आहे. मात्र, या पदावरील व्यक्तीकडून केवळ ठराविक विचारांना पुढे करावे त्याचे स्तोम माजवले जाईल असे कृत्य करावे हे कदापी अपेक्षित नाही. अस काही नाही कीत्यांनी जे निर्णय घेतले ते सर्वांनाच आवडतील. जेव्हा एखाद्यास संधी मिळाते तेव्हा त्याच्याकडून चांगले किंवा वाईट काम होतेच. फक्त आपल्याला यावर तटस्थ राहून मत द्यावे लागेल. 

प्रश्न : म्हणजे देशात खराब काम होत आहे ?
उत्तर :
काही निर्णय असे आहेत, आता वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे मध्यवर्गीय त्रासलेले आहेत. इंधनावर खूप कर आहे. मी यावर नुकतेच लिहिले आहे. प्रत्येक वेळी हाच वर्ग अधिक जास्त त्रास सहन करतो. 

प्रश्न : सध्या असे म्हटले जातेय की, या सरकारच्या काळात देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय. तुमचा काय अनुभव आहे ?
उत्तर :
काही अंशी हे खर आहे. मात्र मला याने फरक पडत नाही. माझे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे, मी बोलू शकतो. 

प्रश्न : तुम्ही एक ‘निरीक्षक’ सुद्धा आहात, यामुळे तुम्हाला काय वाटते ? 
उत्तर :
कुठे न कुठे काही तरी होत आहे. मात्र, हे सगळेच ‘मोदी समर्थक’ मुळे होतेय अस नाही. देशात सोशल मिडियाचा वाढता वापर आणि मोदी यांचा प्रधानमंत्री असा उदय एकाच वेळी झाला. सोशल मिडियावर लोक आपली चूक मान्य करत नाहीत, तुमचे म्हणणे कोणी चुकीचे ठरवले तर ते अपमानजनक वाटते. यावर विचारांचे धुर्वीकरण झाले असून कट्टरपंथीय विचारसुध्दा वरचढ ठरत आहेत. आपण काहीही बोलो तर त्यावर लगेच वाईटआणि टोकाच्या प्रतिक्रिया येतात, धमकावणे सुरु होते,आपला आवाज दाबला जातो. यामुळे मवाळ विचारांच्या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय असे वाटते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कोणास विनाकारण शिव्या देणे असेही नाही. यातून तुम्ही खूप शूरवीर आहात असे दिसत नाही.  

प्रश्न : आपले नवे पुस्तक येत आहे का ? 
उत्तर :  
‘दि गर्ल इन रूम १०५’ हे माझे नवे पुस्तक आहे. ते पुढील महिन्यात येईल. यावेळी आम्ही पुस्तकाच्या प्रचारासाठी नवी कल्पना राबवली आहे. पहिल्यांदाच आम्ही एखाद्या पुस्तकाचे चित्रपटासारखे ‘ट्रेलर’ प्रदर्शित केले. दिग्दर्शक मोहित सुरी यांनी हे तयार केले आहे. या माध्यमातून नवी पिढी जी वाचनापासून दूर जात आहे तिला परत वाचनाकडे वळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रश्न : तुमच्या कथांमध्ये तरुण आणि मध्यमवर्ग केंद्रस्थानी असतो. कथा लिहिताना तुमच्या डोक्यात काय असते ?
उत्तर :
प्रत्येक लेखकाच्या डोक्यात लिहिताना काही तरी असतेच. भारत तरुणांचा देश आहे. देशात ७० टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. यामुळे नवे पुस्तक लिहिताना मी तरुणांना केंद्रस्थानी ठेऊन लिहितो. 

प्रश्न : तुम्ही देशात सर्वात जास्त वाचले जाणारे इंग्रजी लेखक आहात, हे कसे घडले ?  
उत्तर :
मला वाटते कि मी योग्य वेळी लिहता झालो. माझे पहिले पुस्तक २००४ साली आले. त्यावेळी भारतात इंग्रजी भाषेची एकप्रकारे क्रांती झाली होती. देशात मोबाईल, कॉम्पुटर यामुळे इंग्रजीचा वापर वाढत होता. अनेक लोकांना इंग्रजी समजायला लागली होती. मात्र ते लागलीच सलमान रश्दींचे पुस्तक वाचू शकत नव्हते. माझ्या इंग्रजी लेखनात साधे आणि सरळपणा आहे. यामुळे अशा नव्या इंग्रजी वाचकांसाठी माझी पुस्तके पर्वणी ठरली. 

प्रश्न : काही दिवसांपूर्वी 'संजू' चित्रपट प्रदर्शित झाला. यात एका अपराध्याला 'हिरो' दाखविण्यात आले. तुम्ही अस काही लिहिणार आहात का ?
उत्तर :
प्रत्येक गुन्हेगाराला एक वैयक्तिक आयुष्य असते. तुमच्या घरात कोणी गुन्हेगार असेल तर तुम्ही त्याचा द्वेष नाही करू शकत. मात्र, यामुळे त्याच्या कृत्याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. कोणताही गुन्हा घडण्यामागची गोष्ट दाखवली जाऊ शकते. तुम्ही गुन्हेगारास सहानभूती दाखवू शकता, मात्र त्याच्या गुन्ह्याचे उद्दातीकरण करता येणार नाही.  

प्रश्न : कोणाचे आत्मचरित्र लिहायला आवडेल ?
उत्तर :
मला सलमान खानचे आत्मचरित्र लिहायला आवडेल. एखाद्याच्या आयुष्यात चढ उतार आलेले असतील तेव्हाच ते आत्मचरित्र आकर्षणाचे ठरते. आत्मचरित्र केवळ  ‘हिरोईक’ नसायला हवे. माझ्या नजरेतून एखादा हमाल जो स्टेशनवर अभ्यास करून यशस्वी झाला आहे, त्याच्या आत्मचरित्रात सांगण्यासारखे खूप आहे.

प्रश्न : तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात ‘क्रमांक’ असतो
उत्तर :
कारण, मी एक इंजिनीअर आहे, मी एमबीए केले आहे, बँकेत पण काम केले आहे. हा माझा इतिहास आहे आणि मला तो विसरायचा नाही. यामुळे माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात ‘क्रमांक’ असतो.

प्रश्न : तुम्ही ‘घर सांभाळणारा पिता’ आहात, हा अनुभव कसा आहे ?   
उत्तर :
मी तिशीत होतो, तेव्हा सगळ सोडून घरी बसलो होतो. मला ओळखणारे, शेजारी यावर खूप टीका करायचे. आपण प्रत्येकाच्या भूमिका ठरवल्या आहेत. आपला समाज अजूनही काही बदल स्वीकारायला तयार नाही. आता करिअर असे झाले आहेत की, कोणा तरी एकाची प्रगती होत असेल तर दुस-याने इतर जबाबदारी स्वीकारावी. असे झाले तरच आपली, समाजाची प्रगती होईल. 

प्रश्न : शेवटी, आपण ‘फिल्मी’ आहात का  ‘इल्मी’ ? 
उत्तर :
अर्थातच मी 'इल्मी' म्हणजे विचारी आहे. आयआयटी, आयआयएममध्ये शिकलेल्यास  ‘फिल्मी’ होणे रुचणारे नाही, तो त्याच्या मूळ स्वभावाकडे परतेल. मला चित्रपट व्यवसायाबद्दल थोडी माहिती आहे. मी ‘फिल्मी’ बनण्याचा प्रयत्न केला परंतु, ते शक्य झाले नाही. मला वेगवेगळ्या कथा लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत आणि यासाठी चित्रपट हे एक सशक्त माध्यम आहे.   

हायलाईट्स : 
'फिटनेस'साठी जागरूक 

मी पंजाबी आहे, मला खायला आवडते. मी रोज काही कसरत करत असतो. आपले आयुष्य सध्या खूप सुखसोईयुक्त आहे. तरुणपणी शरीराच्या काळजीबद्दल काही वाटत नाही मात्र चाळीशीनंतर 'फिटनेस' बदल जागरुकता येते. 

नवीन ‘वॉव’ समिती झाली सज्ज 
वाईडर अपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन (wow) या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेतन भगत यांच्याशी संवादानंतर नव्या ‘वॉव’ समितीने पदग्रहण केले. ‘वॉव’च्या संस्थापक अध्यक्षा रुचिरा दर्डा यांनी चेतन भगत यांच्यासोबतच नवीन अध्यक्षा प्रियंका दरक, उपाध्यक्षा रिचा माछर, सचिव मनदीप ओबेरॉय, कोषाध्यक्षा प्रार्थना मिश्रा आणि रि-ट्रीटहेड मोना चोटलानी यांचे स्वागत केले. यावेळी चेतन यांनी, ‘मी विजयी आणि यशस्वी होण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेतले आहे, कारण शक्तिशाली किंवा बुद्धिमानांपेक्षा जुळवून घेणारेच जिवंत राहतात’ अशा शब्दात ‘वॉव’ सदस्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: will bring revolution by Writing - Chetan Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.