वन्य जीव सप्ताह : निसर्गपूरक जीवनशैली हाच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 07:14 AM2018-10-04T07:14:18+5:302018-10-04T07:14:46+5:30

सध्या वन्यजीव सप्ताह सुरू असून, आपला निसर्ग छोट्या बदलांबाबत सुद्धा खूप संवेदनशील आहे. मानवी हस्तक्षेपामुळे ही संवेदनशीलता आणखी वाढली आहे.

Wildlife Week: An Alternative to Lifestyle | वन्य जीव सप्ताह : निसर्गपूरक जीवनशैली हाच पर्याय

वन्य जीव सप्ताह : निसर्गपूरक जीवनशैली हाच पर्याय

Next

शिरीष मेढी

सध्या वन्यजीव सप्ताह सुरू असून, आपला निसर्ग छोट्या बदलांबाबत सुद्धा खूप संवेदनशील आहे. मानवी हस्तक्षेपामुळे ही संवेदनशीलता आणखी वाढली आहे. आता आपण मानवजातीची ओझोन छिद्राच्या महासंकटापासून अगदी छोट्या अंतराने कशी सुटका झाली याबाबत माहिती करून घेणार आहोत. हवामान वैज्ञानिकांचे इशारे का महत्त्वाचे आहेत हे आपणास ओझोन छिद्राबाबत घडलेल्या घटनांपासून शिकता येते.

अठराव्या शतकाच्या शेवटास मानवास ज्ञात झाले की सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशातील अतिनील किरण अत्यंत अल्प प्रमाणात पृथ्वीवरील पृष्ठभागावर पोहचतात. वातावरणातील वरच्या स्तरातील ओझोन वायू सूर्यप्रकाशातील सर्वात लहान वेव्हलेंथच्या म्हणजेच अतिनील किरणांना व मध्यम वेव्हलेंथच्या किरणांना वरतीच अडकवून ठेवतो. १९३१ मध्ये चँपमन नावाच्या ब्रिटिश वैज्ञानिकाने शोधले की वातावरणाच्या वरच्या स्तरात अतिनील किरणे व ओझोन यामधील प्रक्रियेमुळे आॅक्सिजन व ओझोन यांचे एकमेकांत रूपांतर होत असते. यामुळे आॅक्सिजन व ओझोन यांच्या प्रमाणांचे सातत्य राखले जाते.
हे प्रमाण एक कोटी आॅक्सिजनचे अणू व तीन अणू ओझोन असे आहे. या रूपांतरामुळे मानव जातीस हानिकारक असणारे अतिनील किरणे वातावरणाच्या खालच्या स्तरात येत नाहीत. या अतिनील किरणांचा निर्जंतुकीकरणासाठी वापर केला जातो. तसेच या अतिनील किरणांमुळे समुद्रातील अन्नमालिकेतील प्राथमिक जीवाणू म्हणजेच फायटोप्लँकटन मरण पावतात. तसेच या किरणांमुळे सर्व वनस्पतींमधील प्रकाश संस्लेक्षणाची (फोटोसिंथिसिसची) प्रक्रिया बंद पडते. या अतिनील किरणांमुळे मानवांना मोतिबिंदू व अन्य डोळ्यांचे विकार होतात, तसेच त्यांच्या प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो. काही जणांना अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग सुद्धा होतो. अमेरिकन वैज्ञानिक शेरवुड रोलँड व त्यांची मदतनीस मारियो मोलिना या दोघांनी सीएफसीच्या अणूंबाबत संशोधन करायचे ठरविले. त्यांना आढळून आले की वातावरणाच्या खालच्या स्तरातील ओझोनवर पावसाचा काहीच परिणाम होत नाही. तसेच हे अणू दुसºया कुठल्याही अणुबरोबर संयुग निर्माण करीत नाहीत. मात्र, जेव्हा हा सीएफसी वायू वातावरणाच्या सर्वोच्च स्तरावर पोहचतो, तेव्हा अतिनील किरणांमुळे या वायूचे अणू नष्ट होतात व या प्रक्रियेत क्लोरिन वायू निर्माण होतो. या क्लोरिन वायूमुळे वातावरणातील ओझोनचे अणू नष्ट होत आहेत. प्रत्येक क्लोरिनच्या अणूद्वारा एक लाख ओझोनचे कण नष्ट केले जातात. ही बाब रोलँड यांनी १९७४ साली जगासमोर ‘नेचर’ मासिकातून मांडली, तसेच अमेरिकन केमिकल सोसायटीसमोरही मांडली. त्यांनी सांगितले की, २०५० पर्यंत वातावरणातील निम्मा ओझोन नष्ट होईल. त्यामुळे मानवास मोठ्या प्रमाणात कर्करोगास तोंड द्यावे लागेल. सॅटेलाइटच्या मदतीने वातावरणातील ओझोनचे मापन करण्याचे काम १९८० च्या आसपास सुरू झाले होते. पण या आधीची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे किती प्रमाणात ओझोन कमी होत आहे हे सिद्ध करता येत नव्हते.

१९८२ साली ओझोनच्या संख्येत अचानक मोठी घसरण आढळून आली. १९८० च्या आधीच्या मोजमापात ओझोन कमी होत असल्याचे आढळून येत होतेच. १९८० नंतर या कपातीच्या धीम्या स्वरूपात बदल झाला. ही कपात तीव्र वेगाने व असरळ रेषेत होऊ लागली. दक्षिण ध्रुवावरील ओझोनच्या कपातीने २००६ मध्ये उच्चांक गाठला व उत्तर ध्रुवावरील ओझोन कपातीने २०११ मध्ये उच्चांक गाठला. अंदाज व्यक्त केला जातो की, २००० सालापर्यंत ओझोनच्या छिद्राच्या हानीमुळे दहा लाख लोकांना कर्करोग झाला व दहा ते वीस हजार जणांचे कमी वयातच निधन झाले. ज्या अतिनील किरण व ओझोन स्तर यामधील आपसातील मेटँबोलिक प्रक्रियांमुळे पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण ४५० कोटी वर्षे झाले. शिवाय जीवन नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हवामान वैज्ञानिक गेली ३० वर्षे सांगत आहेत की मानवाने फोसील इंधनाचा (पेट्रोल, डिझेल, कोळसा व नैसर्गिक वायू) वापर ताबडतोबीने थांबविला पाहिजे. या संदर्भात १९९२, २००२ व २०१५ अशा एकूण तीन जागतिक वसुंधरा परिषदा घेण्यात आल्या. पण मानवी जीवापेक्षा नफ्यास प्राधान्य देणाºया जगातील क्युबा वगळता सर्व देशांनी आपल्या फोसील इंधनाच्या वापरात कपात करण्यास नकार दिला आहे.

ओझोन संकटातून बाहेर पडणे त्या मानाने खूप सोपे होते, पण जागतिक फोसील उत्पादन व्यवस्थेत बदल करणे अशक्य नसले तरी खूप कठीण आहे. आता एकच मार्ग शिल्लक आहे व तो म्हणजे फोसील इंधनास पर्याय म्हणून सोलार (सूर्य) व पवन ऊर्जेचा वापर करणे आणि त्याचबरोबर निसर्गपूरक जीवनशैली अमलात आणणे, अन्यथा जेवढा विलंब होईल तेवढी निसर्गाची हानी अधिक होईल व जीवन खडतर होत जाईल.


(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आहेत )

Web Title: Wildlife Week: An Alternative to Lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग