विहिंप व बजरंग दल तालिबानांच्या रांगेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:44 AM2018-06-19T00:44:37+5:302018-06-19T00:44:37+5:30

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघाच्या संघटनांना अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर यंत्रणेने धर्मांध, अतिरेकी व दहशती ठरविल्याचा आपल्यातील अनेक सज्जनांना धक्का बसला

VHP and Bajrang Dal quits Taliban? | विहिंप व बजरंग दल तालिबानांच्या रांगेत?

विहिंप व बजरंग दल तालिबानांच्या रांगेत?

Next

- सुरेश द्वादशीवार

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघाच्या संघटनांना अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर यंत्रणेने धर्मांध, अतिरेकी व दहशती ठरविल्याचा आपल्यातील अनेक सज्जनांना धक्का बसला असला तरी या आरोपातील तथ्य व जागतिक स्तरावर काम करणाऱ्या सीआयएसारख्या संस्थेची त्याविषयीची धर्मनिरपेक्ष व सत्तानिरपेक्ष दृष्टी समजून घेणे व आपल्याही संघटनांच्या वाटचालींची जरा तटस्थपणे पाहणी करणे गरजेचे आहे. इसिस, तालिबान किंवा बोको हराम या दक्षिण मध्य आशियातील मुस्लीम देशात हिंसाचार माजविणाºया दहशतवादी संघटना, ज्यूंच्या धर्मरक्षणार्थ सिद्ध असलेल्या झिओनिस्टांच्या सशस्त्र संघटना आणि कॉकेशियन लोकांच्या वर्णशुद्धत्वाचे रक्षण करण्यासाठी शस्त्रसज्ज असणाºया कू क्लक्स क्लॅनसारख्या अमेरिकेतील गोºया दहशतवाद्यांच्या संघटना यांचे स्वरूप लक्षात घेतले की एकाचवेळी भूतलावर व भूमिगत कामे करणाºया जगभरच्या धर्मांधांचे खरे चित्रही आपल्या डोळ्यासमोर येते. एक शाखा अधिवेशन भरविते, चर्चासत्रे आणि व्याख्याने ठरविते तर दुसरी त्याचवेळी आपल्या उद्दिष्टांना बाधा पोहचवू पाहणाºयांचा ‘बंदोबस्त’ करीत असते. अशा संघटनांचा विचार त्यांच्या समग्र स्वरूपाची चर्चा करूनच व्हावा लागतो. नेते काय बोलतात, त्यांची माध्यमे काय सांगतात आणि त्यांचे हस्तक नेमके त्याचवेळी काय करतात या गोष्टी मग एकत्रच पाहणे आवश्यक होते. नेते उदात्ततेची भाषा बोलत असताना त्यांच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी त्यांचे अनुयायी बॉम्बस्फोटापासून बंदुकापर्यंतच्या हिंसक हत्यारांचा वापर करीत असतील तर ते दोघेही सारखेच दोषी व अपराधी असतात. अनुयायांच्या हिंसाचाराबाबत हे नेते गप्प राहतात किंवा शांत स्मित करतात. ते त्यांचा वा त्यांच्या कृत्यांचा निषेध करीत नाहीत आणि एरवीही त्यांची चर्चा ते टाळत असतात. गांधीजींच्या खुनाचा निषेध आजवर टाळणाºया आणि चर्चेत मात्र त्यांच्या मोठेपणाच्या निवडक कथा सांगणाºया संस्था आपल्या माहितीच्या आहेत की नाही?
गेल्या पाच वर्षात देशात किती पत्रकारांच्या, लेखकांच्या व स्वतंत्रपणे विचार करणाºयांच्या हत्या झाल्या. त्यांची कारणे त्यांनीच प्रकाशात आणलेल्या धर्म व समाज यात शिरलेल्या अंधश्रद्धांविरुद्धच जाणारी होती की नाही. दाभोळकरांचे कुणाशी खासगी वैर होते आणि पानसºयांचे व्यक्तिगत वैरी कोण होते? ‘मी माझ्या धर्मश्रद्धेसाठी गौरी लंकेशचा बळी घेतला’ अशी कबुली तिच्या खून प्रकरणात सापडलेल्या आरोपीने दिली आहे की नाही? मालेगावमधील स्फोटाच्या आरोपात ‘साध्व्या’ कशा काय अडकतात? समझोता एक्स्प्रेस, हैदराबाद, बंगलोर वा अन्यत्र घडलेल्या हिंसक कारवाया एका विशिष्ट धर्माविरुद्ध का होतात आणि त्यात अडकलेले संशयित पुन्हा दुसºया एका विशिष्ट धर्माचेच का असतात? काही काळापूर्वी ओरिसात ख्रिश्चनांची १२०० पूजास्थाने जाळली गेली. त्यांच्यातील कुष्ठसेवकांना त्यांच्या मुलाबाळांसह बंद जीपमध्ये जिवंत जाळले गेले. गुजरातमध्ये ६०० मशिदी उद्ध्वस्त झाल्या. नंतरच्या काळात तेथे दोन हजारांवर अल्पसंख्यक जीवानिशी मारले गेले. या साºया अपराधात पुढाकार घेणारे ‘धर्मवीर’ होते की अतिरेकी? सीआयए ही संघटना नेहमी फारशी तटस्थ वा स्वच्छ असते असे नाही. पण ती प्रत्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आपल्या अध्यक्षांनी त्यांच्या निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याच्या आरोपाची चिकित्सा शेवटच्या टोकापर्यंत नेऊन त्याला आरोपीच्या पिंजºयापाशी उभी करते. हा इतिहास नाही, हे वर्तमान आहे. या संघटनेने आपल्याच देशातील किती नेत्यांना आजवर पायउतार केले वा तुरुंगाचा रस्ता दाखविला. त्यात स्पायरे अ‍ॅग्न्यु आहे, निक्सन आहे आणि आधीचे ज्यो मॅकार्थीही आहेत.
भारतातील गुप्तचर संघटनांची क्षमता एवढी नाही आणि ती त्यांच्यात येणार नाही याची काळजीही आजवरच्या सरकारांनी घेतली आहे. येथे छापे पडतात ते विरोधकांवर, तपासण्या होतात त्यांच्या आणि वाढीव मालमत्ता हुडकली जाते तीही त्यांचीच. सरकारातील माणसे या यंत्रणांना स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त व सत्तेत येण्यापूर्वी होती तशीच राहिलेली का दिसतात? जे सामान्यांना समजते ते आपल्या आर्थिक अन्वेषण विभागाला व गुप्तचर म्हणविणाºया संघटनांना का दिसत नाही? त्याचमुळे राम जेठमलानीसारखा विधिमंत्री राहिलेला कायदेपंडितही ‘येथील गुप्तचर यंत्रणांचा वापर सरकार आपल्या राजकीय हितासाठी व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करते’ असे म्हणतो आणि ते खरेही असते. आपल्या यंत्रणा केवळ पक्षसापेक्षच नसतात. त्या जात व धर्मसापेक्षही असतात. गेल्या पाच वर्षात धार्मिक अपराधातून निर्दोष सुटलेले कोण आणि शिक्षा झालेले कोण हे नुसते पाहिले तरी या यंत्रणांचे सत्तासापेक्ष असणे लक्षात येते. कायद्यासमोर सारे समान असतात असे म्हणतात. पण दादरी कांडात सारे कुटुंब नाहिसे करणाºया गुन्हेगारांना काहीच कसे होत नाही? इक्लाखच्या घरातील मांस गाईचे होते की बकºयाचे यावरच माध्यमे चर्चा करतात आणि चौकशी यंत्रणाही त्यातच अडकतात.
गुजरातेतील दलित मुलांना एका जीपला बांधून मरेस्तोवर मारले जाते. मात्र त्या हल्लेखोरांचे पुढे काय झाले हे कुणाला कळत नाही. साडेसोळा वर्षे उपवास केलेली शर्मिला इरोम किती जणांना ठाऊक असते? मनकर्णिकेवरचा सामूहिक बलात्कार व तिची हत्या कुणाच्या स्मरणात असते? या घटनांमधील आरोपींच्या मागे सशक्त व बलाढ्य संघटना असल्याखेरीज त्या होत नाहीत आणि खपत नाहीत. त्या पाहण्याचा जो डोळा सीआयएला आहे तो आपल्या यंत्रणांना का नाही? ती गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने व तिला स्वायत्तता नसल्याने असे होते की स्वायत्तता दिली तरी राजकीय मालकांवरील निष्ठेपायी तिचे डोळे मिटले असतात?
आताचा प्रश्न विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा आहे. त्यांचे कार्यकर्ते स्टॉर्म ट्रुपर्ससारखे किंवा ब्लॅकशर्ट संघटनेसारखे बेछूट व बेबंद का असतात? ते स्वधर्मातील मुलामुलींचे आनंद का हिरावतात? संस्कृतीच्या नावाने फ्रेंडशीप डे व व्हॅलेंटाईन डे वर का तुटून पडतात? अशा हल्ल्यांनी किती जणांना आजवर मारले? या संघटनांना संरक्षण कोण देतो? त्याहूनही हे हल्ले धार्मिक असतात की बेकायदा? तालिबान, इसिस किंवा बोको हराम या संघटना आपले सशस्त्रपण उघडपणे सांगतात. आपण धर्मरक्षणार्थ व मूळ धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसाचार करतो असेही त्या जाहीरपणे सांगतात. त्यासाठी त्या सरकारशीही लढा देतात. विहिंप वा बजरंग दल सरकारशी लढत नाही. त्यांना सरकारची छुपी साथ असते. त्यांच्यात स्वधर्मप्रेमाहून परधर्मद्वेष व दुष्टावा अधिक असतो. त्यांची खरी अडचण त्यांचे सरकार स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेते ही असते. खरे तर ती अडचण त्यांच्या सरकारलाही जाचकच ठरणारी असते. या संघटना शस्त्राचार मिरवीत नाही. मात्र तो त्यांना वर्ज्य नसतो. तेवढा फरक वगळला की त्या विदेशी आणि या स्वदेशी संघटनांमधला वेगळेपणा फक्त धर्माचा असतो. पण अपराध, खून, हत्या व बलात्कार यांना धर्म नसतो. हे सारेच अधर्म असतात आणि या अधर्मात इसिस आणि तालिबानएवढ्याच आपल्याही संघटना सहभागी असतात.
(संपादक, नागपूर)

Web Title: VHP and Bajrang Dal quits Taliban?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.