उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

By सुधीर लंके | Published: April 30, 2018 01:48 AM2018-04-30T01:48:11+5:302018-04-30T01:48:11+5:30

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़ राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे

Uddhavji, everybody is worthless | उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

Next

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़
राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नगर दौऱ्यात केली. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर शेजारी बसले असताना त्यांच्यासमोरच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे वाभाडे ठाकरे यांनी काढले.
सरकार निकम्मे आहे म्हणजे उद्धवजींची सरकारमध्ये सहभागी असलेली सेनाही निकम्मी आहे, असा अर्थ निघतो. कायदा सुव्यवस्था ढासळली असेल तर त्यास केसरकरही जबाबदार ठरतात. केसरकर यांनी नगरची घटना मंत्री म्हणून हाताळण्यापेक्षा पक्ष प्रवर्तक म्हणून हाताळली आहे. पोलिसांना त्यांनी नि:पक्षपाणीपणे काम करु दिलेले दिसत नाही. पोलीसही मंत्र्यांच्या दबावाला बळी पडलेले दिसतात. खरेतर शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने सूत्रे हलवली. राष्टÑवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली. आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले गेले. या सर्वांचा हत्याकांडात कसा सहभाग आहे, याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. पण, तरीही पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयावर जगताप समर्थकांनी हल्ला केला म्हणून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक करण्यात आली. यातून जरब निर्माण झाली. कारण, हत्याकांडाइतकाच हा गुन्हा गंभीर आहे. पण, ही एक बाजू झाली. जी राज्याला ठळकपणे दिसली.
दुसरी बाजू असे सांगते की, हत्याकांडानंतर शिवसेनेनेही केडगाव येथे धुडगूस घातला. तेथे दगडफेक झाली. स्थानिक नागरिकांना, गोळीबारातील जखमी पोलिसांना वेठीला धरले गेले. पोलीस, पत्रकार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. याबाबत गुन्हाही दाखल झाला. सेना नेते अनिल राठोड यांची चिथावणीखोर भाषा असलेले ‘व्हिडीओ’ व्हायरल झाले. या प्रकाराबाबत मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. शिवसैनिकांनी गुन्हा केला असेल तर त्याचे पुरावे द्या, असे केसरकर पत्रकारांना म्हणाले. वास्तविकत: पोलिसांसमक्ष हा प्रकार घडला. पोलीसच फिर्यादी आहेत. असे असताना गृहराज्यमंत्री पत्रकारांना पुरावे मागताहेत. एकाच प्रकरणात सरकार कसे पक्षपाती वागते याचा हा नमुना आहे. त्यामुळे उद्ववजी म्हणतात ते खरे आहेच. सरकार निकम्मेच आहे.
नगरमध्ये कोतकर, जगताप, कर्डिले या परिवारांनी सामूहिकपणे नात्यागोत्याचे राजकारण केले. त्यांची दहशतही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनातून या ना त्या प्रकारे दिसते. पण, सेनेनेही या शहरात सतत भावनांचे, भडकाविण्याचे व आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारणच केले. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या परिवाराला ठाकरे यांनी स्वत: भेट दिली. या घटनेनंतर अटकेत असलेल्या राष्टÑवादीच्या कैलास गिरवले या नगरसेवकाचा मृत्यू झाला. तिकडे ठाकरे गेले नाहीत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे गिरवले परिवाराकडे गेले पण, केडगावात फिरकले नाहीत. ज्याने त्याने आपापले पाहिले. या जिल्ह्यात ‘प्रशासन’ आणि राजकीय संस्कृती अशी संपली आहे.
दरम्यान शनिवारी पुन्हा राष्टÑवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येने नगर ढवळून निघाले. यातून कोणते राजकारण बाहेर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सुधीर लंके

Web Title: Uddhavji, everybody is worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.