आजचे आपले अस्वस्थ वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:53 AM2018-02-17T02:53:52+5:302018-02-17T02:54:08+5:30

९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज बडोदा येथे होत आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही ठळक मुद्दे

Today's Your Unhealthy Present | आजचे आपले अस्वस्थ वर्तमान

आजचे आपले अस्वस्थ वर्तमान

Next

जेव्हा साहित्यिक-कलावंत सद्यस्थितीवर सत्ताधाºयांना न रुचणारं परखड भाष्य करतो किंवा एखाद्या चळवळीला समर्थन देतो आणि त्यात भाग घेतो, तेव्हा राजकीय माणसं-पक्ष कधी साळसूदपणे तर कधी छद्मीपणे विचारतात, ‘तुम्ही तुमचं साहित्य- बिहित्य, लेखन-बिखन खुशाल करा, इथं कशाला लुडबूड करता?’ याद्वारे साहित्यिकांचं राजकारण हे क्षेत्र नाही, असं त्यांना सांगायचं असतं! त्यांना आज मला हे या पवित्र मंचावरून सांगू द्या की केवळ कला व सौंदर्यबोध हेच साहित्याचं प्रयोजन नाही, तर वास्तव दर्शन आणि भविष्य सूचन हेही साहित्याचं सामाजिक प्रयोजन आहे. लेखक-कवी जेव्हा माणसाच्या दु:ख, वेदना आणि शोषणाची कहाणी सांगत असतो व त्याचा आवाज बनत असतो, तेव्हा त्याला ज्या व्यवस्थेमुळे ते दु:ख होतं, त्यावर भाष्य तो करतो. व्यवस्था-सिस्टिम जी राजकीय, सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा नियंत्रित करते आणि प्रसंगी सामान्य माणसाची कोंडी करते, त्यावरचं निर्भीड लेखन व चिंतनशील भाष्य करणारं साहित्य हे व्यापक राजकीय भाष्यच असतं! दबलेली-पिचलेली माणसं व्यवस्थेनं हतबल असतात. त्यातील काही बंडखोर होत आवाज उठवतात, व्यवस्थेला आव्हान देतात, त्यामुळे व्यवस्था काही प्रमाणात हादरते- बदलते. पण व्यवस्थेची मूळ प्रवृत्ती असते, मूठभरांचं बहुसंख्य जनतेवर नियंत्रण राखणं, त्यांना दाबात ठेवणं, आपल्यावर विसंबून राहायला भाग पाडून त्यांना पंगू-कमजोर ठेवणं... पण लेखक- कलावंत हे स्वभावत:च या बहुसंख्य असलेल्या ‘नाही रे’ वर्गाच्या, शोषित पीडितांच्या मानवी दु:खानं द्रवणारे असतात आणि त्यांचं लेखन हे जी परिस्थती माणसाला दु:ख, वेदना व शोषण देते, त्यावर प्रहार करतं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगतं. म्हणून त्यांचं हे व्यवस्थेवर प्रहार करणारं लेखन राजकीय असतं, व्यापक-सामाजिक असतं. म्हणून खरा जातीवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो. राजकीय भाष्यकारच असतो! तो त्याला भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे.
मित्रहो, मी ही व्यवस्थेवर प्रहार करणारा व ती बदलावी म्हणून लेखन करणारा राजकीय लेखक आहे. जेव्हा मी ‘पाणी! पाणी!!’ कथासंग्रहात पाणी टंचाई व दुष्काळाचा मानवी नातेसंबंधावर कसा परिणाम होतो याच्या कथा लिहिल्या तेव्हा त्याला कारणीभूत असणाºया राजकीय नेते व नोकरशहांच्या भ्रष्ट युतीवर कथेच्या ओघात भाष्य केलं ते माझं राजकीय लेखनच आहे, असं मी मानतो. कारण मला मानवी दु:खाला कारणीभूत असणारी निरंकुश सत्ता व नियंत्रणाची राजकीय व्यवस्था मान्य नसते. म्हणूनच भाष्य करतो. हिंदी कवी दुष्यंतकुमाराच्या ‘मैं फरिश्ता हूँ, सच बताता हूँ!’ या कवितेचा संदर्भ देत हे सांगू इच्छितो की, मीही त्याच जातकुळीचा फरिश्ता असलेला लेखक आहे व आजवर माझ्या कथा-कादंबºयातून भ्रष्ट व्यवस्थेचं रूप नग्न करून कोरडे ओढणारं भाष्य केलं आहे. ते राजकीय आहे व त्याला माझा नाईलाज आहे. मी माझ्या भवताली व माझ्या राज्यात-देशात जे घडतं आणि सामान्य माणसाच्या पदरी दारिद्र्य, वंचना आणि हतबलता इथली राजकीय -सामाजिक- प्रशासकीय व्यवस्था व संस्था/ पक्ष टाकतात, तेव्हा मी स्वस्थ बसू शकत नाही.
भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषी संस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा शेतकºयाच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे. मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न-दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. म्हणून शेतकºयांच्या संदर्भात ‘टाइम्स आॅफ इंडिया’च्या नव्या वर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीच्या बातमीकडे मला आपलं लक्ष वेधू द्या. ‘शेतकरी घरातील स्त्रियांना नवरा हवा आहे. शिपाई पण चालेल, पण शेतकरी नको’ त्या बातमीत दरमहा २० हजार रुपये शेतीतून उत्पन्न कमावणाºया एका शेतकºयाची सत्यकथा आली आहे. गेली दहा वर्षे त्याला एकही मुलगी चांगली शेती असूनही पसंत करत नाही. मागच्या वर्षी या संदर्भात काही गावांचं सर्वेक्षण झालं होतं, त्यातून शेती करणाºया तरुणांचं लग्न होणं किती कठीण झालं आहे, हे विदारक चित्र समोरं आलं आहे. त्यामुळे व शेती परवडत नसल्यामुळे मागील काही वर्षात एक कोटीहून जास्त शेतकºयांनी शेती सोडली आहे. जे शेती करतात ते नाईलाजानं. त्यांना दुसरा रोजगार मिळाला असता तर त्यांनीही शेती सोडली असती. जगण्यासाठी शिक्षण-आजारपणासाठी पुरेसं उत्पन्न काबाडकष्ट करूनही मिळत नसेल, आत्महत्येला प्रवृत्त करत असेल, धड लग्नही होत नसेल तर शेतकºयांनी काय करायचं? एकेक शेतकºयाचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. या साºयांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे, मीही लिहिलं आहे... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार? किती काळ आपण असा अंत पाहणार आहात शेतकºयांचा? दंडकारण्य भागात आदिवासींवर अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून त्यातून नक्षलवाद जन्मला. आपल्याला हे शेतकºयांच्या संदर्भात परवडणारं नाही. शेतकरी सोशिक आहे, त्याचं काळ्या आईवर प्रेम आहे व न परवडणारी शेती करीत तो देशाचं पोट भरत आहे. सबब आपण समाज व सरकार त्यांचं जगणं कसं सुखाचं करणार आहोत, हा या घडीचा कळीचा प्रश्न आहे.
मी एका इंग्रजी वृत्तपत्रामधली एक बातमी सांगणार आहे. तिचं शीर्षक आहे,  ‘No country for women, children and Dalit’  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा २०१६ च्या अहवालाच्या आधारे या बातमीत हा तुमचा-माझा देश स्री, मुले व दलितांसाठी त्यांच्यावरील वाढत्या गुन्हे व अत्याचारामुळे कसा व किती असुरक्षित झाला आहे, यावर भेदक प्रकाश टाकला आहे. अल्पवयीन मुले-खास करून मुलीवरील बलात्कार आणि ‘प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल आॅफेन्स’ (पोक्सो) या कायद्याखाली नोंदलेल्या गुन्ह्यात ८२% वाढ एका वर्षात झाली आहे. गरिबी, कंटाळवाणी शाळा आणि शिकून उद्या काय नोकरी मिळणार आहे? तर मग आजच कामास लागून पैसा कमवावा म्हणून लाखो बालकांचं बालपण हिरावून घेतलं जातंय. बालमजुरी हा देशावरचा सर्वात मोठा कलंक आहे. लहान वयात मुलांना उबदार घर व सुरक्षित बालपण-शिक्षण व मनोरंजन, क्रीडा सोडून दहा-बारा तास उरस्फोडी काम करावं लागणं किती भयानक आहे? त्यामागे भ्रष्ट राजकारणी व नोकरशहांची नफेखोर मालकांशी झालेली युती आहे... हे मी माझा ‘हरवलेले बालपण’ कादंबरीत दाखवले आहे. ज्या देशाचं बालपण असुरक्षित आहे, तो देश कसा सुरक्षित राहील? यावर अभ्यासकासोबत कलावंतांनी पण आवाज उठवला पाहिजे. बालमजुरी बंद झाली पाहिजे. बालकांवर अत्याचार होणार नाहीत यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे, तर समाजानं याबाबत ‘झिरो टॉलरन्स’ दाखवला पाहिजे.
आपल्या भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचे उच्चाटन केले आहे पण ७० वर्षे झाली तरी तथाकथित वरिष्ठ जातिजमातीची मानसिकता फारशी बदललेली नाहीय. २०१६ या एका वर्षात लखनौ, हैदराबाद व बेंगळुरू शहरात दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ती प्रामुख्याने ‘प्रिव्हेंशन आॅफ अ‍ॅट्रोसिटीज अ‍ॅक्ट’ अंतर्गत झाली आहे. याच कायद्यांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्या महाराष्ट्राची पण परिस्थिती फार चांगली नाही. खैरलांजी ते नगर जिल्ह्यातील मागील काही वर्षांत घडलेल्या अंगावर काटा आणणाºया घटनांची आठवण महाराष्ट्र विसरला नसणार... नितीन ओगे या दलित तरुणाचे त्याच्यापेक्षा उच्च जातीच्या मुलीशी तथाकथित प्रेम किंवा मैत्री आहे. तो तिच्याशी बोलत होता म्हणून त्याचा खून झाला. नुकतेच त्यातील सर्व आरोपी पुराव्याअभावी म्हणजे साक्षीदार फितूर झाल्यामुळे सुटल्याच्या घटनेनी दलितांवरील अत्याचाराचा व त्यांना न्यायव्यवस्था योग्य न्याय देत नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उनाला गोहत्या केल्याच्या संशयावरून दलित तरुणांना उघडे करून पट्ट्यानं मारणं असो की २०१८ च्या प्रथम दिवशी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जमा झालेल्या लाखो दलित बांधवांच्या अभिवादन समारंभाच्या निमित्ताने झालेली दंगल असो... उच्चवर्णीय हिंदू समाजास संविधानाच्या शस्त्राने व शिक्षणामुळे आलेल्या आत्मभानातून जागी झालेली दलित अस्मिता सहन होत नाही. कारणे काहीही असू देत, पण पीएच.डी. करणाºया बुद्धिवान दलित तरुण रोहित वेमुलास आत्महत्या करावी लागते, ही का केवळ त्या समाजाची शोकांतिका आहे? नव्हे, ती सर्व भारताची शोकांतिका आहे. दलित समाजाचा प्रश्न केवळ शिक्षण व रोजगाराचा नाही तर, तो आहेच पण त्याहून जास्त त्यांच्या जागृत झालेल्या आत्मभानाचा व अस्मितेचा उच्चवर्णीय समाज स्वीकार करत नाही, उलट ती प्रसंगोप्रसंगी ठेचायचा प्रयत्न करतो हा अधिक आहे. मराठीतला विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या व जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सामना’ चित्रपटातील मास्तरांचा आर्त व नैतिक प्रश्न ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही तेवढाच जिवंत व प्रखर आहे. मारुती कांबळे हे केवळ रूपक नाही, तर दलित व ‘नाही रे’ वर्गाच्या दडपल्या जाणाºया अस्मितेचा आकांत आहे. आता सुदैवानं दलितातून नवं नेतृत्व पुढे येत आहे, जे भारतीय संविधानानं त्यांना दिलेले अधिकार मागत आहेत. त्यासाठी संघर्ष व्हावा, हे भारतीय समाजाला एकविसाव्या शतकात शोभत नाही. त्यामुळे सरकार, राजकीय पक्ष व व्यवस्था आणि आपण साºया सुशिक्षित विचारी माणसांनी यावर बोललं पाहिजे. सामूहिक आवाज बुलंद केला पाहिजे.
आता मी आणखी एका अस्वस्थ समाजघटकाबद्दल बोलणार आहे. भारताच्या लोकसंख्येच्या १८ टक्के असणाºया मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडे मला तुमचं लक्ष वेधू द्या. मी मूळचा मराठवाड्याचा आहे, त्यामुळे साहजिकच हिंदू-मुस्लीम धर्मीयांच्या ‘मिलजुली’, ‘गंगा-जमनी’ संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. भारताची धर्मावर आधारित झालेली फाळणी हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. पण भारत ही आपली भूमी मानून इथं राहणाºया मुस्लिमांकडे आपल्या हिंदू समाजातील काही तथाकथित कट्टर लोक शंका व विद्वेषानं आजही का पाहत आहेत? संविधानानं त्यांनाही समान नागरिकत्व व सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत, पुन्हा त्यांना आपली भाषा व संस्कृती व धर्म जपण्याचे पण अधिकार दिले आहेत. पण एका बाजूला त्यांचा मतासाठी अनुनय करणारे पक्ष तर दुसरीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे - त्यांना प्रतिनिधित्व नाकारणारे पक्ष, या दोन्हींनी मुस्लीम समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांना असुरक्षित केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या ‘आयडेंटिटी’चा प्रश्न जीवन मरणाचा बनला आहे.
ही गुजरातची भूमी आहे, म्हणून मला या संदर्भात महात्मा गांधी काय म्हणाले होते, याची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यांच्या विपुल लेखनातील काही विचारांचं ‘इन्स्पायरिंग थॉट्स’ हे मीरा जोहरीनी संकलित केलेल्या पुस्तकातील खालील विचारांकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणतात.
‘Free India will be no Hindu raj. It will be Indian raj based not on the majority of any religious sect or community but on the representive of the whole people without distinction of religion.’अर्थात ‘स्वतंत्र्य भारत हे हिंदू राज्य असणार नाही, ते कुण्या बहुसंख्याक पंथ किंवा समाजाचं राज्य नसेल तर धर्माधारित भेदभाव न करतात सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करणारं भारतीय राज्य असेल !’
मित्रहो, मी विस्तृतपणे आजच्या परिस्थितीचं चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामागे एक साहित्यिक म्हणून माझा काही एक उद्देश आहे. एक विचारवंतानं ‘कवी हा प्रेषित असतो’ असं म्हटलं आहे. त्या अर्थाने लेखक-कलावंत हे समाजासाठी मार्गदर्शक असतात, ते समाजपुरुषापुढे लेखनातून आरसा धरतात व त्याच्या चेहºयावर चढलेली व मनात घर करून असलेली काजळी व विद्रुपता-कुरुपता दाखवतात व सांगतात की, ती कमी करीत आपला मूळचा मानवी चेहरा व सुंदर नैतिकता असलेलं विवेकी मन अधिक सुंदर-अधिक उजळ बनव! भारतीय संस्ृकतीचं सार तीन शब्दांत सांगायचं झालं तर, ते ‘सत्य-शिव-सुंदर’ असं सांगता येईल. सत्य कठोर असलं तरी, ते शिव म्हणजे अंतिमत: मंगलमय लोककल्याणी असतं म्हणूनच ते सुंदर असतं आणि म्हणूनच जीवनातील विषमता व द्वेषरूपी कुरूपता नष्ट करून ते सुंदर व शिव करणं हेच साहित्याचं नैतिक व सामाजिक प्रयोजन असतं. ते करण्याचा मी माझ्या कुवतीनं आजवर प्रयत्न केला आहे व पुढेही करीत राहीन, त्यामुळे मला जो थोडा फार नैतिक अधिकार प्राप्त झाला असेल तर, तो वापरून मी माझ्या सहप्रवासी साहित्यिक-कलावंतांना समाजातली विषमता व द्वेषरूपी कुरूपता कमी करीत मानवी जीवन शिव व सुंदर करीत खºया अर्थाने सौंदर्यवादी व्हा म्हणजे व्यापक अर्थाने जीवनवादी व कलावादी पण एकसमयी व्हाल, हे नम्रपणे सांगू द्या! हेच जीवनाचं व कलेचं सत्य आहे, हे ठासून सांगू द्या !

मुस्लीम बांधवांना दिलासा देऊ या.
आपण गांधीजींना राष्ट्रपिता मानतो, आदर्श मानतो, तर मग त्यांचं सर्व धर्मांना समान लेखणारं व केवळ हिंदू बहुसंख्याक म्हणून त्यांचं हिंदू राज्य असावं हे अमान्य असणारे विचार लेटर अ‍ॅण्ड स्पिरिटमध्ये उतरविणं व तसं वागणं याची आज कधी नाही एवढी गरज आहे आणि त्यासाठी ‘प्यार की राह दिखा दुनिया को, रोके जो नफरत की आंधी. तुझमे ही कोई होगा गौतम, तुझमें ही कोई होगा गांधी.’ या प्रसिद्ध गीताप्रमाणे आपणही थोडे गौतम बुद्ध होत प्रेम व करुणेची कास धरू या. थोडे गांधी होत हिंदू-मुस्लीम ऐक्य व सर्वधर्मसमभावाचं वागण्या-बोलण्यातून आपल्यापुरतं तरी आचरण करू या. एका प्रसिद्ध शायरनं भारतमातेचा एक डोळा हिंदू तर दुसरा मुसलमान अशी कल्पना केली आहे. मी ती कल्पना विस्तारत असं म्हणतो की, दोन्ही डोळ्यांतून एकच वस्तू एकसंध दिसते, तसंच आपण साºयांनी एका डोळ्याच्या हिंदू नजरेनं व दुसºया डोळ्याच्या मुस्लीम नजरेनं पाहत समोरचा माणूस एकच व पूर्ण पाहू या. तो फक्त माणूस आहे, मग नंतर तो हिंदू-मुस्लीम आहे... आज जागतिक स्तरावर वहाबी इस्लामी कट्टरवाद्यांचं आव्हान उभं ठाकलं असताना भारतीयांनी आपल्याच मुस्लीम बांधवांना आरोपीच्या पिंजºयात उभे न करता ते याच भूमीत आपल्यासारखेच जन्मलेले व मरणारे भारतीय आहेत, असे मनापासून मानू या. तसे वागू या व त्यांना दिलासा देऊ या.

तरुणांचे लाखो रोजगार हिरावले जात आहेत
भारताचं दुसरं भळभळतं दु:ख म्हणजे तरुणांची बेरोजगारी. आजचा आपला देश तरुणांचा भारत आहे, इथले ६५% लोक हे ३५ वर्षाखालचे आहेत आणि त्यांना पुरसं व सन्मानजनक वेतन देणारं काम निर्माण होणं कमी कमी होत चाललं आहे. जागतिकीकरण, बाजारी अर्थ शास्त्र आणि डब्ल्यू.टी.ओ. आदीवर भरपूर बोलून झालं आहे. उत्पादन क्षेत्रातलं यांत्रिकीकरण आॅटोमायझेशन एवढं वाढलं आहे की, तिथे नव्या रोजगाराला वावच उरला नाही. रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातलं उच्च संशोधन व त्याचं उत्पादनवाढीसाठी वापरणं यामुळे उद्योगपतींचा उत्पादन खर्च कमी होतोय व नफा वाढतोय, पण त्याचवेळी तरुणांचे लाखो रोजगार हिरावले जात आहेत. नवे उच्च बुद्धिमत्तेचे नवे रोजगार निर्माण होत आहेत, हे खरे असले तरी त्याचा लाभ मूठभर बुद्धिमंतांनाच मिळणार आहे. इतर लाखो सामान्य तरुणानंचं काय?

स्त्री घरातही सुरक्षित नाही
आजची भारतीय स्त्री पण कुठे सुरक्षित आहे? निर्भया प्रकरण ताजं आहे. रस्त्यावर ती बेगुमान झालेल्या पुरुषी वासनेला बळी पडते आहे, पण घरी तरी, ती कुठे सुरक्षित आहे? घरातली मोठी माणसंच आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करीत आहेत व त्यांची संख्या वाढत आहे. विवाहित स्रीला पण नवºयाकडून छळ, मारहाण, हुंड्याची मागणी आणि बळजबरी नव्हे बलात्कार यांना हरघडी सामोरं जावं लागत आहे. काय झालं आहे भारतीय पुरुषी मानसिकतेला? जातीबाहेर लग्न केलं म्हणून ‘आॅनर किलिंग’ घडवून आणणं, आंतरधर्मीय विवाह केला म्हणून धार्मिक थयथायाट करणं व नवदाम्पत्यास जगणं नकोसं करणं, मुलाच्या हव्यासापायी स्रीभ्रूण हत्या करणं, बालविवाह, कुपोषण, मुलीच्या आधुनिक पेहरावाबाबत-मोबाईल वापरण्याबाबत बंदी घालणाºया जातपंचायती, जबानी तलाकाला बळी पडणाºया मुस्लीम स्त्रिया व त्यांना संरक्षण देणे दूर, पण त्याबाबतच्या कायद्यावरून राजकारण व धार्मिक लांगुलचालन करणे... किती व काय सांगावं?

 

Web Title: Today's Your Unhealthy Present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.