वाघांचे अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:15 PM2018-07-16T23:15:07+5:302018-07-16T23:15:21+5:30

हल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात.

Tigers good day! | वाघांचे अच्छे दिन!

वाघांचे अच्छे दिन!

Next

- नंदकिशोर पाटील
हल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात. मायानगरी मुंबापुरीत तर त्यांचं येणं-जाणं नित्याचंच झालं आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीपासून बालघाटाच्या डोंगरदऱ्यांपर्यंत कधीकाळी वाघांचा खूप दरारा होता. पण हल्ली जंगलात त्यांचं मन रमत नाही. शहरांतील ‘हायफाय’ जीवनशैलीची त्यांना भुरळ पडली असावी. शहरांतली माणसं जसं ‘वीकएन्ड’ला जंगलाकडे धाव घेतात, तसं आपणही शहरांत येऊन वीकएन्ड साजरा करावा असंही कदाचित त्यांना वाटत असावं. परवा मालाडच्या एका मल्टीप्लेक्समध्ये बिबट्या आढळला म्हणे. शहरी माणसांना बिबट्या आणि वाघातला फरकही धड कळत नाही. तो बिबट्या नव्हे, तर बिबट्याचा वेष धारण केलेला वाघ असण्याची शक्यता अधिक. सध्या वांद्रेतील सेनेतही बिबट्याची चलती असल्यामुळे आला असेल बिचारा वेषांतर करून! वाघांना शहराचं आकर्षण असण्यामागे तशी अनेक कारणं आहेत. शहरांत रस्तोरस्ती लागलेल्या होर्डिंग्ज्वरील ‘वाघां’ची चित्रे बघून खरेखुरे वाघही मनोमन सुखावत असतील. शहरात तसेही पोट भरण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. जर तुम्ही वाघकुळातील असाल, तर बसल्याजागी काम फत्ते होऊन जाते. फक्त गुरगुरता आलं पाहिजे! मागच्या आठवड्यात एक वाघोबा पाय मोकळे करायला म्हणून गिरगावात आलेले. समोरच्या गल्लीत शर्टावर ‘वाघसेने’चा बिल्ला लावलेला एक गल्लीदादा तिथल्या व्यापाºयांना जाम घाम फोडत होता. ते दृश्य बघून खºयाखुºया वाघाला हसू आवरेना. पण हसरा वाघ म्हणून लहान मुलांनी आपणास गुदगुल्या करायला नकोत, म्हणून त्यानं हसू आवरतं घेतलं. शहरातली पॉश रेस्टॉरंट्स, बार, पब्स बघून वाघांनाही ‘बसण्याचा’ मूड होत असेल का, ही शंका मनात यायला उशीर की, पिझ्झा, बर्गरवर ताव मारणारी माणसं बघून वाघांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं मी पाहिलं आहे. उद्या कदाचित ‘मॅक्डोनॉल्ड’ किंवा ‘केएफसी’च्या काऊंटरवर केंटुकी चिकनची आॅर्डर देणारा एखादा वाघ दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, हल्ली जंगलातील शिकारीला वाघ मंडळी जाम वैतागली आहे. दिवसरात्र धावपळ केल्यानंतर कुठे एखादी शिकार हाती लागते. त्यातही वाटेकरी अधिक. त्यापेक्षा शहरातली खंडणी परवडली. नुसतं धमकावलं, तरी बिल्डर मंडळी खोकीभर ‘माल’ पाठवतात! फेरीवाल्यांकडून मिळणाºया चिरीमिरीवर पॉकेटमनी सहज निघून जातो. वाघ म्हटलं की, सहसा कुणी रिकाम्या हातांनी परत पाठवणार नाही. सत्ताधाºयांनाही व्याघ्रकोप परवडणारा नसतो. नाणारच्या नावानं नुस्ती डरकाळी फोडली तरी ‘लादणार नाही’ असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागतो आणि ‘बाहेर पडणार’ अशी नुसती धमकी दिली तर शहेन‘शाहां’ना वांद्रेत येऊन पायधूळ झाडून जावी लागते. आपले वनमंत्री तर सतत कागदीवाघ नाचवित असतात.
गतवर्षी तर त्यांनी चक्क भुसा भरलेला एक वाघ ‘मातोश्री’वर पाठवला होता. त्यातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं होतं, याचा खुलासा अद्याप केलेला नाही. वनमंत्र्यांवर आता सेनेचे वाघ सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. शहरी वाघांचे चाललेले हे लांगुलचालन बघून जंगली वाघांची पावलं शहरांकडे पडली नाहीत तरच नवल!

Web Title: Tigers good day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ