खुजेपणाला नको थारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:28 AM2018-01-14T01:28:36+5:302018-01-14T01:28:58+5:30

वर्षाच्या सुरुवातीलाच एक मेसेज आला ‘सारे जग २0१८ मध्ये प्रवेश करत होते तेव्हा महाराष्ट्र १८१८ मध्ये प्रवेश करीत होता...’ या एका संदेशाने प्रागतिक, पुरोगामी महाराष्ट्राचा शतकाचा इतिहास पायदळी तुडविल्याची भावना निर्माण झाली.

Threatened Thaana! | खुजेपणाला नको थारा!

खुजेपणाला नको थारा!

Next

- विनायक पात्रुडकर

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि त्यानंतर उमटलेल्या तीव्र पडसादाने महाराष्ट्राची भूमी विव्हळते आहे. याला कारण गेल्या काही वर्षांत क्षीण झालेला विवेकाचा आवाज. कुणालाच या राज्याच्या प्रगतीचे, विकासाचे, सौहार्द वातावरणाचे काहीच प्रश्न पडले नाहीत का, असा आतल्या आवाजाचा प्रश्न निर्माण होत नाही का?

वर्षाच्या सुरुवातीलाच एक मेसेज आला ‘सारे जग २0१८ मध्ये प्रवेश करत होते तेव्हा महाराष्ट्र १८१८ मध्ये प्रवेश करीत होता...’ या एका संदेशाने प्रागतिक, पुरोगामी महाराष्ट्राचा शतकाचा इतिहास पायदळी तुडविल्याची भावना निर्माण झाली. गेल्या काही वर्षांपासूनच जाती-भेदाच्या भिंती अधिक बलदंड होताना दिसताहेत. यामागे कुणाचा स्वार्थ असला तरी त्यातून माणूसपण संपत चालल्याची वेदना तीव्रतेने दिसते आहे. आपल्या देशात तीन हजारांहून अधिक जाती आहेत. त्याहीपेक्षा २५ हजारांहून अधिक पोटजाती आहेत. या अवाढव्य जातव्यवस्थेतून वाटचाल करताना संवेदनशील माणसाची अक्षरश: दमछाक होते. आधीच जातव्यवस्थेचा संघर्ष, आयुष्य पायावर उभा करण्याचा संघर्ष, तो स्थिरावण्यासाठीचा संघर्ष करताना तो कधी आयुष्याच्या शेवटासमीप येऊन ठेपतो त्यालाच कळत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे म्हटले तर सध्या जातीचे सुभेदारच उभे ठाकले आहेत. कोरेगाव-भीमा आणि त्यानंतर उमटलेल्या तीव्र पडसादाने महाराष्ट्राची भूमी विव्हळते आहे. ज्या संतभूमीने शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले घडविले, त्याच भूमीतील भावंडे एकमेकांच्या जिवावर उठली आहेत. याला कारण गेल्या काही वर्षांत क्षीण झालेला विवेकाचा आवाज. कुणालाच या राज्याच्या प्रगतीचे, विकासाचे, सौहार्द वातावरणाचे काहीच प्रश्न पडले नाहीत का, असा आतल्या आवाजाचा प्रश्न निर्माण होत नाही का? आपल्या मुख्यमंत्र्यांवर एकदा ब्राह्मणी शिक्का मारला की चौकट टांगून ठेवायला मोकळे. देशाच्या सत्तेवर नेतृत्व असणाºया रा. स्व. संघाचे सामाजिक समरसता धोरण अपयशी ठरल्याचे चित्रही दंगलीच्या घटनेवरून दिसते. समाजाच्या सर्व घटकांना जोडण्यात सध्याच्या शक्तिशाली रा. स्व. संघाला अपयश आल्याने बौद्धिक बैठक नव्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शरद पवारांसारखा एकमेव राष्ट्रीय नेता महाराष्ट्र पेटलेला असताना चटकन प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर ‘मराठा’ शिक्का मारून तोही चौकटीत बंद केला आहे. काँग्रेस पक्षामधून महाराष्ट्र शांत होईल, असा आवाज सध्यातरी नाही. अण्णा हजारेंसारख्या नेत्याला महाराष्ट्रात फॉलोअर नाही. मुंबई पेटलेली असताना शिवसेनाही राजकीय हेतूपोटी मूग गिळून बसते. मनसे सध्या संकुचित अवस्थेत आहे. नितीन गडकरी केंद्रात मश्गूल आहेत. महाराष्ट्र पेटलेला राहिला तर फडणवीसांच्या अडचणी वाढतील, त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधी गटात सुप्त आनंद आहे. अस्वस्थ एकनाथ खडसे फिनिक्स पक्षाप्रमाणे संधीच्या शोधात आहेत. गोपीनाथ मुंडेंएवढे सर्वमान्य नेतृत्व अद्याप पंकजा मुंंडेंना प्राप्त झालेले नाही. या व अशा अनेक नेतृत्वाच्या मर्यादांमुळे महाराष्ट्राची मानसिकता अधिकाधिक विघटित होत चालली आहे. एक मराठी स्वयंपूर्ण राज्य म्हणून वाटचाल करताना प्रचंड अडथळे निर्माण होताना दिसताहेत. हा तुकड्या-तुकड्यात वाढणारा महाराष्ट्र आणखी किती संक्रमणे झेलणार? सर्व जातींना जोडणारा, तारतम्य बाळगणारा, व्यवहारी, सर्वमान्य उत्तुंग नेता सध्या का दिसत नाही? इथली जाती व्यवस्था, त्याच्यातली तेढ हाताशी धरून इथल्या तरुणांना कोण खेळवतंय? ही भडकलेली तरुणांची माथी घेऊन कोणता महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे? मुंबईच्या तोंडावर भव्य शिवस्मारक आणि इंदू मिलवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे. या स्मारकांमागे महाराष्ट्राची खुजी माणसे दाखविणार आहोत का? खरेतर यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, काही प्रमाणात सुशीलकुमार शिंदे आणि आजचे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. बºयाचअंशी तो यशस्वीही झाला. मात्र जातीच्या अस्मितेच्या राजकारणात राज्याचे नेतृत्व अनेकदा कमी पडताना दिसते. अर्थात हे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर इतर सर्वच राज्यांत कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. गुजरातच्या निवडणुकीत जातीचे राजकारण सर्वच स्तरावर आणि सर्वच पक्षांकडून खेळले गेले. त्यांची महाराष्ट्राची तुलना करता येत नसली तरी इथल्या जातीच्या राजकारणाने सध्या व्यवस्थेवर मोठी पकड घेतली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शांत-संयमी नेते प्रकाश आंबेडकर दलित नेतृत्वाच्या अग्रस्थानी आले. अभिजात (क्लास) वर्गाचे नेते एकदम ‘मास लीडर’ बनून गेले. हसमुख रामदास आठवले केंद्रात भाजपाच्या वळचणीला गेल्याने त्यांचीही अडचण झालीच होती. परंतु प्रकाश आंबेडकरांसारख्या सुसंस्कृत नेत्याने त्वरित संवादाची भाषा सुरू करायला हवी. दुभंगलेली जाती - मने जोडण्याचे काम कुणीतरी हाती घ्यायला हवे. इथला मराठी माणूस एक व्हायला हवा. आम्ही महाराष्ट्रीय म्हणून कधीच एक नसतो ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जातीयवादी असतो, आम्ही शिवसैनिक असतो, भीमसैनिक असतो, ब्रिगेडी असतो, आर्मी असतो; नसतो ते केवळ एकसंघ मराठी, जाती-भेदापलीकडचे मराठी, आपले विविधांगी मराठीपणच आपली खरी ओळख असायला हवी. नव्या संक्रमणाच्या काळात अशी ओळख देणाºया नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र पुन्हा अशा भव्य, उत्तुंग नेतृत्वाची आशेने वाट पाहात आहे.

(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: Threatened Thaana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.