पर्याय आहेत; धोरणात्मक बदलाच्या दृढ संकल्पाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:58 AM2018-01-10T02:58:59+5:302018-01-10T02:59:39+5:30

सरले १७, उजाडले १८. काय आहे देश व दुनियेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव? वर्ष, दशवर्ष, शतक, सहस्रक अशी मोजदाद आपण करतो ती मानवाच्या वाटचालीची दशा, दिशा समजण्या, जोखण्यासाठी उत्क्रांती, मानवी धडपड, कौशल्य नि वैचारिक क्रांती, वैज्ञानिक शोधबोध, तंत्रज्ञान विस्तार करीत मानवाने कला, शिल्प, संगीत, साहित्य व एकंदर सांस्कृतिक सोपान रचले. प्रतिभा, सौंदर्य, संवेदना वृद्धिंगत केल्या.

There are options; Need for a consolidation of policy changes | पर्याय आहेत; धोरणात्मक बदलाच्या दृढ संकल्पाची गरज

पर्याय आहेत; धोरणात्मक बदलाच्या दृढ संकल्पाची गरज

googlenewsNext

- प्रा. एच. एम. देसरडा
(नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळय)

सरले १७, उजाडले १८. काय आहे देश व दुनियेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव? वर्ष, दशवर्ष, शतक, सहस्रक अशी मोजदाद आपण करतो ती मानवाच्या वाटचालीची दशा, दिशा समजण्या, जोखण्यासाठी उत्क्रांती, मानवी धडपड, कौशल्य नि वैचारिक क्रांती, वैज्ञानिक शोधबोध, तंत्रज्ञान विस्तार करीत मानवाने कला, शिल्प, संगीत, साहित्य व एकंदर सांस्कृतिक सोपान रचले. प्रतिभा, सौंदर्य, संवेदना वृद्धिंगत केल्या.
परिणामी कालौघात अनेकविध संस्कृती उदयास आल्या, उन्नत पावल्या व अस्तंगतदेखील झाल्या. सिंधू, माया, युनान, मिश्र, रोमन व तत्सम संस्कृती उत्थान कालखंडात मानवाचे खानपान, रहनसहन, कलाकौशल्य, तंत्रयंत्र, ज्ञान-विज्ञान, तसेच वृत्ती-प्रवृत्ती यात लक्षणीय बदल झाले. कमी-अधिक फरकाने निसर्गाशी तादात्म्य राखत काही हजार वर्षांचा प्रवास मानवाने केला.
तंत्रज्ञान विकास षड्यंत्र
तथापि या सर्व प्रक्रियेत एक नवे युग अवतरले, ज्याला औद्योगिक युग (इंडस्ट्रियल ऐज) म्हटले जाते. निसर्ग, मानव व समाज या त्रयींचे नाजूक नाते, परस्परावलंबन या औद्योगिक व्यवस्थेने आरपार बदलले. निसर्गावर हुकमत गाजविणे हाच पुरुषार्थ? ‘विकास’ इत्यादी मानून पृथ्वीच्या अद्भुत रचनेत अविवेकी, अनाठायी हस्तक्षेप करण्याचा चंग बांधून व दंभ चढवून (आजच्या भाषेत दुनिया कर लें मुठ्ठी में) उद्दामपणे वसुंधरेवर आक्रमण केले.
४६० कोटी वर्षांत उत्क्रांत झालेल्या स्थिरावलेल्या रचनेची घडी विस्कटविणाºया (एनट्रापी) वाढवृद्धीला विकास (!) मानले. हेच आहे कूळमूळ, आज अवघ्या जगासमोर आ वासून उभ्या असलेल्या पर्यावरणीय संकटाचे! ज्याचे भयावह परिणाम कमीत कमी विध्वंसक व्हावे यासाठी आज जगभरचे मानवतावादी शास्त्रज्ञ, समाजधुरीण, सच्चे पत्रकार, विवेकी, विद्वान व इमानदार लोक प्रयत्नशील आहेत. अर्थात जगभरचा सत्ताधीश वर्ग (ट्रम्प, पुतीन, जीनपिंग, मोदी आदी) व त्यांचे जी-हुजरे नोकरशहा, नफांध उद्योजक, पुरस्कार आसक्त साहित्यिक, भाडोत्री विद्वान, वसुंधरेच्या या आक्रमणाची विकासाच्या गोंडस नावाने तरफदारी करीत आहेत. मौजमस्ती, चैन-चंगळवाद, विश्वसंचार, बाजार विस्तार, भोगविलास या राक्षसाला ‘विकास’देव (ग्रोथ गॉड) म्हणून महिमा मंडीत करणाºया या नेत्या व व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेला संघटित, खºयाअर्थी शिक्षित, प्रबुद्ध बनविणे हे आजघडीला मानव समाजासमोरील सर्वोच्च आव्हान आहे.
विध्वंस की विकास?
उपरिनिर्दिष्ट विवेचनाचा अर्थ विकास, विज्ञान व तंत्रज्ञानाला आंधळा विरोध नाही, तर आंधळ्या (विध्वंसक, विनाशकारी प्रारूपाला) वाढविस्ताराला ठाम विरोध आहे, ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी.
खेदाची बाब म्हणजे जगभरचे सत्ताधीश गरीब, वंचित, उपेक्षितांच्या नावाने हे विकास घोडे चलाखपणे दामटत आहेत. अर्थात, खोटी आश्वासने, घोषणा, जाहिरातबाजीने ते या शोषित-पीडित जाती वर्गाला भूलवत-झुलवत सत्ता हस्तगत करून त्याच असाह्य जनतेला वेठीस धरीत आहेत. येथे प्रश्न हा आहे की, याला उपाय-पर्याय नाहीत का? याचे स्पष्ट उत्तर आहे : आहेत, स्वस्त, जलद, सुरक्षित नि स्थानिक (चीपर, क्विकर, सेफर अँड लोकल) असे ठोस पर्याय.
लोकशिक्षण-संघटन-संघर्ष
२०१८ वर्षात पदार्पण करताना जगातील किमान २५ टक्के लोक अभावग्रस्त जीवन जगत आहेत. किंबहुना, मृत घोषित नाही म्हणून ‘जिवंत’ संख्या आहे. शुद्ध हवा, स्वच्छ व आरोग्यदायी पाणी, किमान उष्मांक, माफक निवारा, प्राथमिक शिक्षण व आरोग्यासाठी आवश्यक वस्तू, साधने व सेवा उपलब्धतेपासून वंचित आहे.
दारिद्र्य, कुपोषण, आजार, अभाव ग्रस्तता, अन्याय-अत्याचार, अनेकविध शोषण हे याचे भौतिक जीवन (खरे तर मरण) वास्तव आहे. भारतात यांची संख्या जवळपास ४० टक्के म्हणजे तब्बल ५० (होय, ५०) कोटी एवढी आहे.
जग असो, भारत असो की, महाराष्टÑ या सर्व ठिकाणी या यच्चयावत स्त्री-पुरुष व बालकांना तमाम मूलभूत गरजा व सेवासुविधा पुरवणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे : विकासाची दिशादृष्टी आमूलाग्र बदलण्याची. प्रचलित-प्रस्थापित -प्रभावशाली विकास ढाचा हा मूलत: मानव व निसर्गविरोधी आहे. या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम जीवाश्म इंधन (फॉसिल फ्युअल) आधारित ऊर्जा, वाहतूक, औद्योगिक व शेती उत्पादन पद्धतीला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. सोबतच अजगरी पाणी, वीज, रस्ते, बांधकाम, प्रकल्प थांबवावेत, पर्जन्यजलाचे विकेंद्रित संकलन, सौर व अन्य अक्षय ऊर्जा, सायकलसह अन्य सार्वजनिक वाहतूक साधने, सेंद्रिय शेती, स्थानिक सामग्री, प्रधान आवास, मूलभूत शिक्षण, सार्वत्रिक स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, विकेंद्रित उत्पादन आणि अर्थात पर्यावरण स्नेही, श्रमप्रतिष्ठा आधारित जीवनशैली, हेच पर्याय आहेत समतामूलक शाश्वत विकासाचे.
यासंदर्भात महात्मा गांधी यांनी शंभर वर्षांपूर्वी (१ जानेवारी १९१८) अहमदाबाद येथे केलेल्या भाषणात मानव समाजासमोरील येऊ घातलेल्या मुख्य बाबींचा निर्देश केला आहे. या भाषणाचे शीर्षक मुळी हवा, पाणी, अन्न असे होते. गुजरातीत केलेल्या या भाषणात गांधीजी म्हणतात ‘हवा, पाणी, आने अनाज हे खुराकना मुख्य तत्वोछे’ खरे तर त्यावेळी गांधीजी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ अथवा महायुद्ध संपलेल्या परिस्थितीबाबत बोलतील असे लोकांना वाटले. तथापि, त्यांनी या विषयावरच भाषण करणे पसंत केले.
एवढेच नव्हे तर त्याच दिवशी दुपारी गुजरात सभेच्या (ज्याचे ते अध्यक्ष होते) बैठकीत खेडा जिल्ह्यात त्यावर्षी झालेल्या पीक बुडीबाबत मुंबईच्या सरकारला पत्र लिहून शेतकºयांचा शेतसारा तहकूब अगर माफ करण्याचे निवेदन पाठविण्याची सभेला विनंती केली. म्हणजेच गांधीजींनी २१ व्या शतकात मानव समाजाला कोणत्या प्रश्नाला सामोरे जावे लागेल याचा इशारा दिला होता. सोबतच पाश्चात्त्य औद्योगिक व्यवस्थेची त्यांनी जी परखड समीक्षा ‘हिंद स्वराज’ मध्ये १९०९ साली केली होती. त्याचादेखील इत्यर्थ नेमका हाच आहे की, विकासाच्या अघोरी लालसेने निसर्ग व्यवस्थेवर जो प्रतिकूल परिणाम होत आहे. त्याविषयी गांभीर्याने पुनर्विचार करणे आवश्यक आहे. तात्पर्य, निसर्ग मानव समाजाचे परस्परावलंबी नाते याचे भान न राखता केलेली वाढवृद्धी हा विकास नव्हे तर विनाश आहे.

Web Title: There are options; Need for a consolidation of policy changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.