अण्णांशी भेट हा प्रारंभ ठरावा!

By यदू जोशी | Published: November 6, 2017 02:50 AM2017-11-06T02:50:56+5:302017-11-06T02:52:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले.

Start meeting with Anna! | अण्णांशी भेट हा प्रारंभ ठरावा!

अण्णांशी भेट हा प्रारंभ ठरावा!

googlenewsNext

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले. महाराष्ट्रात समाजसेवेची अखंड ऊर्जाकेंद्रे असलेल्या काही संस्था आणि स्वकर्तृत्वाने स्वत:च एक संस्था बनलेल्या मान्यवर व्यक्तीदेखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटून त्यांच्या कार्याचा पॅटर्न शासनाच्या सहकार्याने अन्यत्र राबविता येईल का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले सातारा जिल्ह्याचे. त्यांनी आपल्या संस्थेत विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांचे संगोपन चालविले आहे. नागपूरचे रामभाऊ इंगोले या फकिराने वेश्यांच्या मुलांसाठी प्रचंड कार्य उभे केले. कुष्ठरोग्यांची अव्याहत सेवा करणारे आमटे कुटुंब आणि आदिवासींच्या सेवेत हयात व्यतित करीत असलेले बंग कुटुंबीय तर दीपस्तंभ आहेतच. शेकडो रुग्णांना मुंबईत आश्रय देणाºया गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख आहेत. मेळघाटच्या आदिवासींसाठी देवदूत असलेले डॉ.रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, ‘सेवांकुर’ चालविणारे डॉ.अविनाश सावजी, पारधी मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा चालविणारे मतिन भोसले, जळगाव जिल्ह्यातील मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा. कष्टकºयांच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ.बाबा आढाव, मुक्तांगणचे अनिल अवचट, आधारवड बनलेले शांतिलाल मुथ्था, अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, सांगली, सातारा, कोल्हापुरात एचआयव्हीबाधितांसाठी कार्यरत मीना शेषू, वृद्धाश्रम चालविणारे माजी आमदार शरद पाटील, परभणी व आजूबाजूच्या परिसरात मातंगांसाठी झटणारे गणपत भिसे असे एक ना अनेक लोक आहेत. सगळ्यांचा उल्लेख शक्य नसला तरी सत्ताधाºयांना आव्हान देण्याच्या भानगडीत न पडता स्वत:ची समाजसेवेची चौकट समृद्ध करणाºया या व्यक्ती व संस्थांच्या पायाशी सरकारने नतमस्तक व्हावे. त्यांना राजाश्रयाची आवश्यकता नाही पण त्यांच्या उत्तुंग कार्याची व्याप्ती सरकारच्या पुढाकाराने वाढली तर त्यातून सरकारची प्रतिमा उंचावेलच पण वंचित समाजाला त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य, अर्थकारण, संशोधन, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांशी वैयक्तिक स्नेह निर्माण करण्याचे काम यशवंतरावजी, पवारसाहेब करीत असत. ते स्नेहबंधन वैचारिक भिंतींपलीकडचे असे. सध्याच्या गढूळ वातावरणात तसे पुन्हा एकदा घडण्याची आवश्यकता वाटत आहे. आजच्या सुविद्य आणि सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून तीच अपेक्षा आहे. हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. सीएसआर फंडाच्या मदतीने एक हजार गावांचा एका वर्षात कायापालट करण्याच्या शासनाच्या योजनेत तसेच अन्य उपक्रमांशी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. ‘उद्या कुठला पुरस्कार घेतला तर माऊलींच्या चरणावरील हात हटतील ना!’ असे म्हणून पुरस्कार नाकारणारे शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील आहेत. अशा सर्वांच्या कार्याचा प्रकाश राज्यभर पोहोचविण्याची मायबाप सरकार अन् मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे.
 

Web Title: Start meeting with Anna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.