Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

By अतुल कुलकर्णी | Published: November 24, 2018 06:05 PM2018-11-24T18:05:18+5:302018-11-24T18:07:02+5:30

उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे.

shiv sena chief uddhav thackeray rss bjp vhp plays ayodhya ram mandir card development not on agenda | Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

Next

- अतुल कुलकर्णी

‘सबका साथ, सबका विकास’ असे म्हणत भाजपाशिवसेना राज्यात आणि देशात सत्तेवर आली. लोकांना विकासाची गंगा आता आपल्या दारी येणार अशी स्वप्न पडू लागली. चांगल्या योजना येतील, जनतेसाठी अच्छे दिन येतील या आनंदात जनता असताना केंद्र सरकारचा कालावधी कधी पूर्ण होत आला हे कळाले देखील नाही. पहाता पहाता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि अचानक विकासाची भाषा बदलली. ‘सबका साथ, सबका विकास’ हे विधान मागे पडले, ‘अच्छे दिन’ गले में अटकी हड्डी निकली...! (हे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेच आहे) आणि अचानक राम मंदिराचा मुद्दा पुढे आला. आधी हा मुद्दा सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढला. त्यानंतर गडकरी यांच्या मुलाच्या लग्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरला गेले तेव्हा ते मोहन भागवत यांना भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड काय गुफ्तगु झाले माहिती नाही, पण त्यानंतर उध्दव यांनी राम मंदिराचा मुद्दा हळूच जनतेत सोडून दिला...

काही दिवस गेले. त्यानंतर पुन्हा सरसंघचालकांनी जो कोणी राम मंदिराची भूमिका ठामपणे मांडेल ते आमचे असतील, अशा आशयाचे विधान केले. नंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूरला संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा सकाळीच राम मंदिराचा मुद्दा काढला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनीही राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्याची घोषणा केली.

ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. त्याची कारणमिंमासा वेगवेगळ्या पध्दतीने केली जात आहे. हे सगळे आताच का? असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात पडत आहेत. एका नेत्याने याचे केलेले विश्लेषण योग्य की अयोग्य माहिती नाही पण त्याचा तर्क पटणारा आहे. तो नेता म्हणाला, भाजपाला आणि संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे वागणे आता पटेनासे झाले आहे. उद्या हे दोघे पुन्हा सत्तेत आले तर संघही दुबळा करतील की काय? अशी भीती संघाच्या वरिष्ठांमध्ये आहे. त्यामुळेच जो कोणी हिंदुत्वाची पताका जाहीरपणे खांद्यावर घेईल तो आपला, असा मुद्दा संघाने पुढे केला आणि तो शिवसेनेने उचलला. महाराष्ट्रात मोदी विरोधाची ठिणगी चेतवायची आणि पुढे त्याचे स्वरुप वाढवत न्यायचे अशी व्यूव्हरचना यामागे असल्याचेही भाजपाचा एक नेता म्हणाला. एकदा का स्पष्ट बहूमत भाजपाला मिळाले नाही आणि जोडतोड करुन केंद्रात सरकार बनवायचे झाले की आपोआपच मोदींचा पर्याय दूर होऊन संघाला हव्या असलेल्या नितीन गडकरींचे नाव पुढे येईल असा दावा त्या नेत्याने केला आहे. त्यामुळेच मंदिरप्रेमाचे सगळ्यांना अचानक भरते आले आहे.

यामुळे विकासाविषयीचे बोलणेच बंद झाले आहे. महाराष्ट्रात पडलेल्या तीव्र दुष्काळावर नेत्यांचे बाईट बंद झाले आहेत आणि माध्यमांपासून सगळ्यांना राममंदिराचा विषय टीआरपी वाढवून देण्यासाठी योग्य वाटू लागला आहे. एकदा या देशाने या विषयावरुन विद्वेशाचा पेटलेला वणवा कसातरी विझवलेला असताना पुन्हा एकदा हा वणवा पेटवण्याचे काम सुरु होईल की काय? याची चिंता देशातील विचारी जनतेपुढे आ वासून उभी राहीली आहे. 

गरज आता संयमाची आहे. हे सगळे रामासाठी नाही तर त्याचे नाव वापरुन सत्तेची खूर्ची हस्तगत करण्यासाठी चालू आहे हे एव्हाना जनतेला कळत असले तरी वळताना दिसत नाही. त्यातच जर धार्मिक व जातीय विद्वेशाचा वणवा भडकलाच तर मग विवेक, संयम, विचारीपणा त्यात जळून खाक होतो, उरते ती फक्त ‘स्व’ ची अस्मिता...! या अशा अस्मितेला आपण कवटाळून धरायचे की ‘सबका साथ , सबका विकास’ या घोषणेचे या पाच वर्षात काय झाले याचा जाब विचारायचा? अच्छे दिन कधी आणि कसे येणार हे विचारायचे की गावोगावी बेकारीत फिरणाºया तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार हे विचारायचे? 

राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर काही काळ विरोधी बाकावर बसणाºया शिवसेनेने त्यावेळी राज्यभर शेतकºयांच्या हितासाठी म्हणून मोर्चे काढले होते, राज्यपालांना निवेदने दिली होती, मात्र काही महिन्यातच शिवसेना सत्तेवर आली, तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यपालांना दिलेल्या त्या निवेदनातील मागण्यांचे काय झाले हे शिवसेना विचारायचे की त्यांनी राम मंदिरासाठी अयोध्या गाठली याचे कौतुक करायचे? 

हे प्रश्न प्रत्येक विवेकी माणसाने आपल्या मनाला विचारायचे आहेत. पटले तर ते सत्तेवर बसलेल्यांना विचारायचे आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीने असंख्य चुका केल्या, त्याची शिक्षा त्यांना सत्तेबाहेर बसवून जनतेने दिली मात्र काही चांगले व वेगळे करावे या अपेक्षेने ज्यांच्या हाती याच जनतेने सत्ता सोपवली त्यांनी या काळात काय केले हे कोणी विचारायचे? पाच वर्षात कधी ज्यांना अटलविहारी बाजपेयी यांची आठवण झाली नाही ते सरकार अचानक प्रत्येक व्यासपीठावर अटलजींचे फोटो का लावू लागले? हा प्रश्नही जाता जाता विचारता आला तर नक्की विचारा....

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

Web Title: shiv sena chief uddhav thackeray rss bjp vhp plays ayodhya ram mandir card development not on agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.