शरद पवारांच्या "गुगली"ने दांड्या गुल !

By राजा माने | Published: March 13, 2019 04:31 PM2019-03-13T16:31:49+5:302019-03-13T16:33:33+5:30

पवारांनी टाकलेल्या गुगलींचे टायमिंग अचूक असे, इतिहास सांगतो.

Sharad Pawar's "Googly", Turns on madha loksabha election and predict about modi | शरद पवारांच्या "गुगली"ने दांड्या गुल !

शरद पवारांच्या "गुगली"ने दांड्या गुल !

Next

राजा माने

"भाजप सर्वात मोठा पक्ष असेल पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", अशी भविष्यवाणी करुन पवारांनी देशाच्या राजकारणात पुन्हा एक "गुगली" टाकली. सतराव्या लोकसभेच्या निवडणूक लगीनघाईत देशातील सर्वच राजकीय पक्ष गुंतले असताना पवारांना भविष्यवाणीची हुक्की उगाचच येणार नाही. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या वाणीने राजकारण ढवळून निघाले. त्यांनी यावेळी टाकलेल्या गुगलीने राजकारणातील किती बरे दांड्या गुल झाल्या असतील? आपण राजकारणात मारलेल्या एका दगडात अनेक पक्षी मारणे, हा पवारांचा हातखंडा! आपल्या भविष्यवाणीने त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे आणि कितीजणांच्या दांड्या गुल करायच्या आहेत, हा खरा कळीचा मुद्दा!

पवारांनी टाकलेल्या गुगलींचे टायमिंग अचूक असे, इतिहास सांगतो. २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनी टाकलेली गुगली आठवा ! ".. भाजपला आम्ही बाहेरुन पाठिंबा देवू !",असे पवार म्हणाले अन काही क्षणात शिवसेनेने सारीपटावर मांडलेला सत्तेचा डाव विस्कटला! पुढे साडेचार वर्षे काय काय घडले, याचा अनुभव उभ्या महाराष्ट्राने घेतला. आता तर उमेदवारही ठरले नाहीत तोवर "भाजप मोठा पक्ष असेल पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत!", असा निकालच जाहीर केला!

पवार असं का बोलतात ? हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला वर्षानुवर्षे पडणारा प्रश्न ! पवार साहेब जे बोलतात नेमके त्याच्या उलटे करतात, हा अलिखित नियमही तुम्हा-आम्हाला आता पाठ झालेला आहे. हे त्यांनाही ठाऊक असूनही पवार का बदलत नाहीत? त्यांच्या संदर्भाने नेहमीच अनेक प्रश चर्चिले जातात. बहुसंख्य राजकारण्यांच्या मनात त्यांच्याजवळ राहूनही त्यांची "अनामिक भीती" का असते? कुठे काहीही घडले की,"पवारांचा हात असावा", असे अनेकजण का म्हणतात? बोटावर मोजण्याएवढेच खासदार असतानाही दिल्ली दरबारात पवारांना अनेक मंत्रीपदे सोनिया गांधींनी का दिली होती? २०१४ च्या निवडणुकीत हुकमी बहुमत मिळविणाऱ्या नरेंद्र मोदींनाही बारामतीत जावून पवारांचे कौतुक करुन ते मित्र आहेत, असे का म्हणावे वाटते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण फक्त शोधत राहतो..आज पुन्हा तशाच प्रश्नांना जन्मी घालण्याचे काम त्यांनी टाकलेली गुगली करते. अशातली एक गुगली म्हणजे कुणाच्याही मनी-ध्यानी नसताना माढा लोकसभा मतदार संघातून लढण्याचा व नंतर न लढण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, या प्रश्नाचे समर्पक उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यांच्या प्रत्येक गुगलींचा अन्वयार्थ ज्याने त्याने स्वतःच्या सोयीने लावावा, अशीच पवारांची अपेक्षा असावी. २०१४च्या निवडणुकीत ५४३ जागांच्या लोकसभेत नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बहुमतासाठी २७२ चा आकडा पार करुन एकटया भाजपच्या २८२ जागा जिंकण्याचा विक्रम झाला. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा झेंडा हाती घेवून लढलेल्या घटक पक्षांना केवळ ५४ जागा मिळाल्या. त्या जागा सत्ता स्थापनेत "फोडणी" पुरत्याच राहिल्या पण ३३६च्या संख्याबळासह मोदींना "हुकमी" बहुमत मिळाले होते व त्याच जोरावर मोदी-शहांनी देशावर एकहाती राज्य केले. या पार्श्वभूमीवर २०१९च्या निवडणुका आणि आजच्या अनेक संदर्भाचा विचार करुजाता यावेळची गुगली तर्कसंगत वाटते. त्याला विविध संस्थांनी २०१९ च्या निवडणूक निकाल सर्वेक्षण निष्कर्षाचे आकडे पुष्टी देतात. मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतानाच नितीन गडकरी, संघ परिवार, भाजप सोबतचे मित्र पक्ष यांना डिवचताना भाजप विरोधी पक्षांनाही त्यांनी इशारा दिला.

मास बेस नेता!

शरद पवार यांच्या प्रदीर्घ आणि व्यापक वाटचालीमुळे त्यांच्या प्रत्येक कृतीस राजकीय-सामाजिक मूल्य असते. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या १९६०नंतरच्या राजकारण-समाजकारणातील हरएक बदल-परिवर्तनाचा साक्षीदारच नव्हे तर अनेक टप्प्यात सक्रीय सहभागी राहिलेला हा माणूस! राजकारणात राहूनही नवा विचार, पुरोगामी आणि वास्तवाचे भान राखत चौफेर अभ्यासू भूमिका घेणारा "मास बेस" मुरब्बी, धूर्त तरीही लोकप्रिय नेता, अशी प्रतिमा त्यांनी आयुष्यभर वाहिली...विद्यार्थी चळवळीतून पुढे १९६७ साली विधानसभेत जाणारा तरुण महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा "मानसपुत्र" म्हणून नावारुपास येतो. त्याच वयात आपल्या राजकारणाचा कॅनव्हास राष्ट्रीय आणि प्रसंगी ग्लोबल राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो..संधी येताच वयाच्या पस्तिशीत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत तथाकथित "खंजीर" खुपसून" डाव्या-उजव्या" ची मोट बांधून महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास घडवितो. ते करतानाही आपले "राजकीय पिता" यशवंतरावांच्या गळी आपले बंड उतरविण्यासाठी किसन वीर यांच्या सारख्या ज्येष्ठांची मदतही घेतो. खरं तर त्याकाळात महाराष्ट्रात घडणाऱ्या त्या घटना राज्याचा नवा इतिहास घडविणाऱ्या अशाच होत्या. त्या शरद पवारांनी घडविल्या!
दिल्ली दरबाराशी नेहमी दोन हात करण्याची हिम्मत दाखविणाऱ्या शरद पवारांनी १९७८ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा चेहरा दिला. महिलांना आरक्षण देण्यापासून ते मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यापर्यंतचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. भावी पंतप्रधान हे राष्ट्रीय बिरुद संपादन करतानाच क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. आयपीएल आयोजनाचा इतिहास घडविला. कॅन्सरसारख्या राक्षसाला अक्षरशः त्यांच्या पुढे गुडघे टेकायला लावले. आजही तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि १८-१८तास काम करण्याची सवय, ही त्यांची बलस्थाने आहेत.

आपल्या कर्तृत्वाने देशाच्या राजकारणात दखलपात्र "स्वतंत्र संस्थान" बनलेल्या शरद पवारांनी मोदी आणि भाजपच्या विरोधात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याच्या वचनापासून बेरोजगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त भारतासह "अच्छे दिन" ची मोहिनी २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी देशावर लिलया टाकली होती. त्या मोहिनीतून नोटबंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांना घेवून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजप-मोदी विरोधी तब्बल२२-२३ पक्षांची मोट बांधण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या नव्या "गुगली" संघ परिवारापासून अनेक घटकांना त्या दिशेनं विचार करायला उद्युक्त केले असले तरी कुंपणावरील नेत्यांना भाजपमध्ये उडी घेण्यास अनुकूल वातावरण असल्याचा, अप्रत्यक्ष सल्लाही दिल्याचे, कोण नाकारणार?

(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)
 

Web Title: Sharad Pawar's "Googly", Turns on madha loksabha election and predict about modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.