आर.आर. आबा, तुम्ही आज असता तर...

By अतुल कुलकर्णी | Published: August 16, 2017 01:44 PM2017-08-16T13:44:11+5:302017-08-16T13:48:47+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा आज साठावा जन्मदिन. यानिमित्ताने लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत लिहिलेले अनावृत पत्र...

R.R. Aba, if you were today ... | आर.आर. आबा, तुम्ही आज असता तर...

आर.आर. आबा, तुम्ही आज असता तर...

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा आज साठावा जन्मदिन. यानिमित्ताने लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत लिहिलेले अनावृत पत्र...

प्रिय आर.आर. उर्फ आबा,
नमस्कार...
तुम्हाला जाऊन अवघी अडीच वर्षे झाली. तुम्ही असता तर आज तुमची साठी साजरी करण्याची संधी मिळाली असती. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार वाढदिवसाच्या दिवशी नेहमीप्रमाणे कुठेतरी अज्ञातस्थळी जाऊन बसला असता, तो भाग वेगळा... 
काळ कोणासाठी थांबत नाही. तुमच्या जाण्यानेही कोणी थांबले नाही, पण तुमची आठवण निघाली नाही अशी एकही घटना नाही किंवा एकही प्रसंग नाही. 

...आता विधीमंडळात श्रीमती सुमनताई पाटील, वहिनी येतात. आमदार म्हणून... अत्यंत शालीनपणे, शांतपणे त्या विषय मांडताना दिसतात. बोलण्यात स्पष्टपणा आणि ठामपणा असतो. त्या दिसल्या की आधी तुम्ही आठवता... त्यांच्याशी बोलतानाही अनेकदा तुम्हीच आठवता... गेल्या अडीच वर्षात विरोधीपक्षाला सगळ्यात जास्त तुमची कमतरता जाणवली. #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांनी जी स्वच्छ प्रतीमा जोपासली ती तुम्ही प्रत्यक्ष जगलात. त्यापोटी अनेकदा तुम्ही तुमच्या जवळच्यांना, नेत्यांना दुखावलेत पण तुमच्या प्रतीमेपेक्षा तुम्ही स्वत:लाही मोठे होऊ दिले नाही. आज तुम्ही असता तर भाजपा शिवसेना सरकारवर विरोधी पक्ष म्हणून तुमची हीच प्रतिमा सगळ्यात मोठे शस्त्र बनली असती..! सामना बरोबरीचा झाला असता...

तुम्ही असता तर महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याचा चिक्की घोटाळा, आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या खात्याचा २९७ कोटींचा औषध खरेदी घोटाळा, शिक्षणमंत्री विनोदतावडे यांच्या खात्याचा वॉटर प्युरीफायर खरेदी घोटाळा, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा एसआरए घोटाळा, आदिवासी मंत्री विष्णू सवरा यांच्या खात्यातल्या आदिवासींसाठीच्या खरेदीचा घोटाळा, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या खात्यातला एमआयडीसीच्या जमिन घोटाळा या सगळ्या विषयात तुम्ही काय केले असते? अवघे राज्य डोक्यावर घेत तुम्ही विधानसभा गाजवली असती... विधीमंडळाच्या लायब्ररीत बसून आत्ताचे मंत्री तेव्हा विरोधात असताना काय भाषणं करायची हे सगळे तुम्ही शोधून काढून त्याचे दाखले सभागृहात दिले असते... माध्यमांना रोज नवीन बातमी देण्यासाठी जीवाचा आटापिटा केला असता... सभागृहात दांड्या मारणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही बरोबर सभागृहात हजर केले असते... तुम्ही गृहमंत्री असताना गोळा केलेल्या अनेकांच्या फाईलीतली माहिती तुम्ही चपखल वापरली असती. पण आता हे सगळे जर तरचे प्रश्न उरले...

नाही म्हणायला या पावसाळी अधिवेशनात अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, धनंजय मुंडे, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अनेक विषय लावून धरले. भाजपा सरकारच्या कामाकाजाविषयीचे परसेप्शन बदलण्याची सुरुवात करण्यात या नेत्यांना यश आले. पण तरीही विषय निघतो तो तुम्ही असता तर कसे रिअ‍ॅक्ट झाला असतात..? या अधिवेशनाच्या वेळी काही पत्रकारांसोबत अजित पवार, दिलीप वळसे पाटील गप्पा मारत बसले होते. अचानक अजितदादांना तुमची आठवण आली. ‘‘आज आर.आर. असते तर त्यांनी सगळं सभागृह डोक्यावर घेतलं असतं... काय भाषण केलं असतं त्यांनी...’’ असं ते म्हणाले. पण हे म्हणताना तुमच्या आठवणीने आलेला अस्वस्थपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तुमची आठवण ही अशी पदोपदी निघते. कधी कोणी बोलून दाखवतं तर कधी कोणी बोलत नाही एवढाच काय तो फरक...

व्यक्तीगत आठवणींचे तर असंख्य किस्से माझ्यासाठी मोठा ठेवा आहेत. त्या सांगायला बसलो तर एक मोठा पट उभा होईल... राजकारणी असताना, राज्याचे गृहमंत्रीपद जवळ असताना, तुमच्यातला माणूस असंख्यवेळा मी हळवा होताना पाहिला... गृहमंत्र्यानी कसं कठोर रहावं असं म्हणालो की तुम्ही गालातल्या गालात हसून विषय बदलुन टाकायचात... तुमच्याकडे येणाऱ्याचे काम तुम्ही ज्या आपुलकीने ऐकून घ्यायचा ती आपुलकी आता सहा मजल्यात कुठेही दिसत नाही, तो ओलावा तर नाहीच नाही...

तुम्ही ठरवून माध्यमांना बातम्या देत होतात, असा आक्षेप अनेकदा घेतला गेला. नक्षलवादाच्या प्रश्नांची उत्तरं मंत्रालयाच्या सहा मजल्यांमध्ये दडलेली आहेत असं तुम्ही म्हणाला होता तेव्हा लोकांनी त्याचा राजकीय अर्थ काढत सहाव्या मजल्याकडे बोट दाखवले होते...
पण तुम्ही नक्षलग्रस्त भागातील मुलांना मुंबई दाखवण्यासाठी आणले, त्याची कधीही बातमी होऊ दिली नाही... अनेकदा तुम्ही गेट वे ऑफ इंडियाच्या समोरच्या रस्त्यावर गृहमंत्री असताना बंदोबस्त न घेता फिरायला जात होता, तेथे येणारे अनुभव, भेटणारे लोक, त्याचीही तुम्ही कधी बातमी छापू दिली नाही... तुम्ही एकपाठी होता. एकदा सांगितलेली माहिती तुमच्या डोक्यात पक्की बसायची. गृहमंत्री असताना तुम्ही बदल्यांची फाईल घेऊन तेव्हाचे मुख्यमंत्री विलासरावांकडे गेला होता. विलासराव ऐकेक नाव वाचत होते आणि तुम्ही हातात कोणताही कागद न धरता त्या अधिकाऱ्याची कागदावरची आणि कागदावर नसलेली सगळी कुंडली त्यांना सांगत होता... बदलीच्या कारणांसह... नंतर विलासरावांनी तुमच्या या अफाट स्मरणशक्तीचे कौतुकही केले पण तुम्ही त्याचीही कधी बातमी होऊ दिली नाही... २६/११ च्या अतीरेक्यांच्या प्रेतांची तुम्ही विल्हेवाट लावली पण ते अनेक महिने कोणाला कळू दिले नाही, विधानपरिषदेत सहा महिन्यांनी तुम्ही ते जाहीर केले आणि पत्रकारांनाच कुठे गेली तुमची शोध पत्रकारिता म्हणून प्रश्न केला, आजही ती प्रेतं कुठे दफन केली हे समोर आणता आले नाही... कशाची बातमी करायची आणि कशाची नाही याचे तारतम्य तुमच्यात अंगी अंगी होते...

आज तुमची आठवण पुन्हा प्रकर्षाने आली... तसेही तुम्ही तुमच्या वाढदिवसाला कधीच कोणाला भेटत नव्हता... आजही भेटणार नाहीतच... पण तुम्ही नसलात म्हणून काय झाले, तुमची "साठी" आम्ही साजरी करु... तुमच्यासारखे नेते लाखात एक होत असले तरीही तसे नेते समाजाने आणि पक्ष प्रमुखाने जाणीवपूर्वक तयार करायला हवेत...
जास्त काय लिहू,
 

Web Title: R.R. Aba, if you were today ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.