गाजराची पुंगी !

By सचिन जवळकोटे | Published: October 14, 2018 12:48 AM2018-10-14T00:48:27+5:302018-10-14T00:48:55+5:30

गेली अनेक दशके ‘हात’वाल्यांची सत्ता होती. त्यांनी त्या काळात गटबाजी केली. मस्तीही केली. मात्र त्यांच्याकडूनही कधी झालं नसेल, इतकं ...

politics between deshmukhs in solapur district | गाजराची पुंगी !

गाजराची पुंगी !

Next

गेली अनेक दशके ‘हात’वाल्यांची सत्ता होती. त्यांनी त्या काळात गटबाजी केली. मस्तीही केली. मात्र त्यांच्याकडूनही कधी झालं नसेल, इतकं कुरघोडीचं राजकारण सध्या दोन देशमुखांमध्ये दिसू लागलंय. लोकांनी या दोघांना सोलापूरच्या भल्यासाठी निवडून दिलंय.. पार्टीनंही त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी लाल दिव्याची गाडी दिलीय, हेच बहुधा दोन्ही गट विसरून गेलेत. विशेष म्हणजे, या दोघांमधलं ‘देशमुखी युद्ध’ आता जिल्हाभर इतरांना गाजरं दाखवत रंगू लागलंय. 


तानवडेंना ‘आनंद’... पण सचिनदादांचं ‘कल्याण’ कसं ?
४एकमेकांना संपविण्यासाठीच आपल्याला सत्ता मिळालीय, या भ्रमात दोन्ही नेत्यांकडून ज्या पद्धतीनं पैंतरे आखले जाताहेत, ते खरंच धक्कादायक. अक्कलकोटमध्ये आपल्या लाडक्या सचिनदादांचं ‘कल्याण’ करण्यात सुभाषबापू रमले असतानाच विजय मालकांनी त्यांना नुकताच एक धक्का दिला. शिरवळच्या कार्यक्रमात त्यांनी ‘तुम्हाला आमदार करतो, लागा कामालाऽऽ’ असा शब्द देताच ध्यानीमनी नसताना ‘तानवडें’ना भलताच ‘आनंद’ झाला. मालकांच्या गाजराचा भाव वाढला. कमळाचा सवतासुभा अधिकच रंगला. लगाव बत्ती!
४दुसरीकडं होटगी स्टेशनवर मालकांच्या जवळच्या एका कार्यकर्त्यानं डोळे तपासणीचं मोफत शिबीर ठेवलं. यातून किती जणांची दृष्टी चांगली होईल, हे माहीत नाही. मात्र, ‘उत्तर’मध्ये बसून ‘दक्षिण’वर ‘तिरकी नजर’ ठेवत स्वारी करणाºया मालकांमुळं बापूंचा गट अस्वस्थ झालाय, हे नक्की. 


बापू अन् महाराजांची गुप्त भेट
४दुसरीकडं बापूंनी अक्कलकोटच्या गौडगाव मठातील महाराजांचीही थेट भेट घेतली. ‘तुम्ही इच्छुक असाल तर सांगा, मी लोकसभेला तिकीट आणून देतो’, असं अजून एक नवं गाजर म्हणे त्यांनाही दाखविलंय. बापरेऽऽ किती या गेमावर गेमा? एकीकडं म्हणे साबळेंसाठी ‘रान’ तयार करायचं अन् दुसरीकडं महाराजांच्या नावाची ‘पेरणी’ करायची. याचा अर्थ बनसोडे वकिलांची ‘कापणी’ शंभर टक्के फिक्स. लगाव बत्ती!


दिलीप मालकऽऽ जागा जाऊ देऊ नका!
४जुळे सोलापुरातील आरक्षित मैदानावरून भलतंच काहूर माजलंय. या आंदोलनात दिलीप मालकांनी घेतलेला पुढाकार सर्वांच्या दृष्टीनं चर्चेचा अन् कौतुकाचा विषय बनलाय. खरंतर, कोट्यवधी रुपयांच्या या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी ‘हात’वाल्यांची सत्ता असतानाच यंत्रणा हललेली. त्यावेळी सोलापुरातल्या फायली पृथ्वीबाबा कºहाडकरांच्या मंत्रालयात पोहोचलेल्या. आरक्षण उठवून जागा स्वस्तात ताब्यात घेण्याची खेळीही रंगलेली. मात्र, अकस्मात सत्ता बदलली.

‘हात’वाल्यांनी शिजवून ठेवलेला ‘भूखंडाचा घास’ आयताच ‘कमळ’वाल्यांच्या घशात गेला. नेहमीच आरक्षणाच्या जागा आवडणाऱ्या बापूंनी या जागेचंही भलं केलं. कमळाच्या नावाखाली लोकांचं मंगल झालं. मग काय रावऽऽ आमची तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही तर काय होणार ? आंदोलन पेटणार नाही तर काय होणार ? मला नाय नां.. तर मग तुम्हालाबी नाय मिळणार !

असो. ‘अशक्य ते शक्य करून दाखविण्यात दिलीप मालक लईऽऽ हुश्शाऽऽर,’ असा म्हणे कुमठ्यातल्या भोळ्या-भाबड्या लोकांचा आजपावेतो समज. मात्र, सुभाषबापू त्यांच्याही पुढचे निघाले. ‘पैसे फेकून केवळ माणसं गोळा करता येतात, टिकविता येत नसतात.’ हे ओळखलेल्या बापूंनी अनेक नव-नवे फंडे ‘दक्षिण’मध्ये अंगीकारले. आजपावेतो कुमठ्यात जेवढी ‘गाजरं’ पिकली नसतील, तेवढी बापूंनी हातोहात खपवली.

त्यामुळंच म्हणे, जुळे सोलापुरातला ‘सोन्याचा तुकडा’ असलेला ‘गाजराचा हलवा’ बापूंनी अलगद गिळल्यानं संतापाचा उद्रेक झाला. गाजराची पुंगी वाजली. आंदोलनाची द्वाही दाहीदिशेला फिरविली गेली. बिच्चाºया जनतेला वाटलं, आपल्यासाठी कुणीतरी लढा उभारतंय.. पण आतली गेम खूप कमी लोकांना माहिती होती. नेत्यांना कधीच विकासाशी देणं-घेणं नसतं, स्वत:ची पोळी भाजण्यासाठीच तापत्या तव्यावर तेल ओतायचं असतं.. लगाव बत्ती !


भारत नानांच्या दाढीला कमळाचा सुगंध!
विजय मालकांच्या शहाला काटशह देण्यात सुभाषबापू तर कुठं कमी पडलेत म्हणता? जिल्ह्यात सध्या ‘शहर उत्तरचे मालक, पंढरपूरचे पंत अन् माढ्याचे मामा’ यांची ‘कॉर्पोरेट कंपनी’ जिल्ह्याच्या मार्केटमध्ये स्वत:ची ‘मोनोपॉली’ तयार करतेय, हे लक्षात येताच बापूंनी इतर लोकल कंपन्यांमध्ये आपले ‘शेअर्स’ वाढवायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच मुंबईत राज्य बँकेच्या एका छोट्याशा सोहळ्यात बापूंनी पंढरपूरच्या भारत नानांची देवेंद्रपंतांशी गाठ घालून दिली. पंढरपूर-मंगळवेढा टापूतल्या नव्या समीकरणांची रुजवात केली. अजून एका नव्या गाजराची पुंगी वाजली. म्हणूनच की काय, ‘माझा पक्ष कोणता, हे लवकरच सांगतो’, असा बॉम्ब नानांनी टाकलेला. एकंदरीत काय, ‘बापूकृपे’मुळे नानांच्या दाढीला कमळाचा सुगंध येण्याची शक्यता अधिक. मात्र, नाना लईऽऽ  हुश्शार. असली बक्कळ कमळंं अन् घड्याळं खिशात घालून ते आजपर्यंत राजकारण करत आलेत.


बापू-दादांसाठी ‘तम-तम मंदी’ बनली लाडकी!
अकलूजचे मोठे दादा कधी आक्रमक झाल्याचं ऐकिवात नाही. परवा मात्र ते सोलापुरात ज्या पद्धतीनं गराऽऽ गराऽऽ फिरले, दोन खानदानी घराण्यांच्या दोन्ही ‘राजूअण्णां’ना भेटले, ते पाहता शहरातील दादा गटाच्या मूठभर (!) कार्यकर्त्यांना क्षणभर का होईना बळ चढलं. यात अजून एक गंमत म्हणजे, विजय मालकांना शह देण्यासाठी मोठ्या दादांनी जी भूमिका घेतली, तीच स्टाईल सुभाषबापूही अनेक दिवसांपासून राबविताहेत. कसब्यातल्या ‘तम-तम मंदीं’ना जवळ करण्याची. आलं का लक्षात...लगाव बत्ती!

असो. ध्यानीमनी नसताना अकस्मातपणे अकलूजचे दादा येऊन भेटल्यामुळे शिवदारेंचे ‘राजूअण्णा’ म्हणे चमकले. त्यांनी दचकून ‘जनवात्सल्य’वर हळूच कटाक्षही टाकला. ‘उगाच साहेब नाराज व्हायला नको ना?’.. खरंतर, एकेकाळी जिल्ह्याच्या सहकारात मोठ्या अण्णांचा काय दरारा होता ? बाजार समितीत ‘अण्णा-आप्पा’ जोडी असेपर्यंत मान वाकडी करून बघायचीही कुणाची टाप नव्हती. मात्र, काळ बदलला. पिढी बदलली. मंगळवार बाजार परिसरातली ‘आप्पां’ची भावकी केवळ भाऊबंदकीतच अडकली. इकडं ‘अण्णां’ची नवी पिढीही आक्रमकतेत कमी पडली. आपलीच खुर्ची टिकविण्यासाठी दुसºयांच्या काठीची मदत घेऊ लागली. काळाचा महिमा... अजून दुसरं काय?


सांगोल्याच्या आबांना फलटणकरांचं गाजर...

 सत्तेचा सुवर्णकाळ एकेकाळी अकलूजच्या दादांनी पाहिलेला. अक्कलकोट किंवा दक्षिण सोलापुरातल्या एखाद्या छोट्याशा गावचा सरपंच कोण असावा, याचा निर्णयही त्याकाळी थेट अकलूजमधूनच व्हायचा. मात्र, ‘बारामतीचा राजाश्रय’ तुटताच ‘दादांची मनसबदारी’ संपुष्टात आली. अकलूजच्या वाड्याऐवजी माढ्याच्या गढीला मान प्राप्त जाहला. एकेकाळी माढा-करमाळ्यात अकलूजची ढवळाढवळ व्हायची. आता माढा अन सांगोल्याची उघड उघड लुडबूड अकलूजमध्ये सुरू झालीय.


  सांगोल्याच्या दीपकआबांना म्हणे माढ्याचा खासदार झाल्याचं स्वप्न पडू लागलंय. माणदेशातले सनदी देशमुख पंढरपुरात येऊन जाताच आबाही खडबडून जागे झाले. त्यांनीही आपली इच्छा जाहीर केलीय. मात्र या मागचा कर्ताकरविता कोण, याचा शोध घेण्यासाठी अकलूजचे दूत फलटणमध्ये घुसलेत. फलटणचे राजे आबांचे पै-पाहुणे. फलटणकरांना अकलूजचे दादाही नकोत अन् माणदेशातले प्रभाकरही. त्यामुळे आबांचा पत्ता ऐनवेळी ओपन झाला तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे, माढा अन् करमाळ्याचीही आबांना आतून म्हणे साथ.
लगाव बत्ती !
सचिन जवळकोटे, सोलापूर

Web Title: politics between deshmukhs in solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.