देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:19 AM2019-02-05T06:19:59+5:302019-02-05T06:20:38+5:30

कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत.

Literacy should increase in relation to native tree plantation | देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी

देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी

Next

- महेश गायकवाड
(पर्यावरणतज्ज्ञ)

कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. जंगलात राहणारा माणूस म्हणतोय रान लाल झाल्याशिवाय जंगलात प्राणी आहेत की नाहीत हे कळतच नाही, म्हणजेच उंबराला फळं लागली की समजायचं शाकाहारी प्राणी आलेच लाल फळं खायला आणि त्यांना खायला मांसाहारी प्राणी, एवढं सोपं आहे त्याचं वन्यजीव पाहण्याचं गणित.

अगदी आपण सहजपणे भटकायला निघालो तर आपल्याला वाटतं की काहीतरी फळ खायला मिळावं. पण त्यासाठी फक्त देशी झाडं उपयोगी असतात. त्याशिवाय आपल्याला फळं कशी मिळणार? गुलमोहर-निलगिरी यांची फळं आपण खाऊच शकत नाही. उपयोगी झाडं लावणं नितांत गरजेचं असताना आपण परदेशी शोभिवंत झाडं लावल्यामुळे काहीच खायला मिळत नाही आणि मग जंगल आणि माणूस असं नातं तुटत चाललंय की काय, असं म्हणायला हरकत नाही.

पिंपळाच्या झाडाखाली लाखो बिया पडल्याचं पाहून खूप समाधान वाटतं. कारण रात्रभर शेकडो वाटवाघळं ताव मारीत असतात तर दिवसभर पक्षी आणि इतर जीव ताव मारतात. खरं तर अशी बहुपयोगी झाडं असतील तर, शेतीवरील हल्ले होताना ही झाडं जास्त प्रमाणात लावली तर मग द्राक्षं, बोरं या पिकांवर हल्लेच होणार नाहीत. खरं तर प्रत्येक गावात १00 अशी बहुपयोगी झाडं लावून जतन केल्यास सर्व हल्ले बंद होतील आणि पर्यायाने अनेक पक्षी व वाटवाघळं यांचं शेतीपिकावर अवलंबून राहणं बंद होईल.

आपल्या भागात ग्रामपंचायत स्तरावर याबाबत जनजागृती होणं अत्यावश्यक आहे. कारण आजकाल गावात तर परदेशी झाडं लावण्याचं पीकच आलेलं आहे. त्यामुळे असणारी वड, उंबर, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी उपयोगी झाडं तोडण्याचा सपाटाच लावलेला आहे. अर्थात हे अज्ञान मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज असताना कुठलीही शासकीय योजना नाही. शिवाय परदेशी वृक्ष लागवडीत वन विभाग आघाडीवर आहे, मग शहाणपण कोठून येणार? आता सर्वांनी निसर्गवाचन शिकणं गरजेचं आहे. किमान येणारी नवीन पिढी तरी पर्यावरण साक्षर झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. निसर्ग वाचवायचा असल्यास तो वाचता आला पाहिजे हे सूत्र सर्वांसमोर आलं पाहिजे कारण हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.

आपल्या परिसरातील वृक्षसंपदा सोडून चुकीची झाडं लावून परिसर व अधिवास नष्ट करण्याचं मोठं काम शासन करीत आहे. याला वेळीच थांबवलं पाहिजे नाहीतर आपला शेवट नक्कीच. आजचा शेतकरी वन्यजीव संघर्ष वाढीस लागण्यास परदेशी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. कारण बांधावरील उपयोगी झाडांची जागासुद्धा परदेशी निलगिरी-गुलमोहर- सुभाभूल - रेन ट्री - खोटा अशोक - खोटा काटेसावर अशी नानाविध विनापयोगी झाडे लावल्याने संघर्ष अटळ आहे. त्यात भर म्हणजे शहरात तर ८0 टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी झाडं लावून आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडं, गवत, झुडपं, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाडं सर्व काही नष्ट करून शेतीवरील वन्यजीवांचं अतिक्रमण अर्थात हल्ले वाढले. यात बोर, द्राक्ष, डाळिंब अशा वास येणाऱ्या पिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले. कारण परिसरातील उंबर, वड, पिंपळ, भोकर, जांभूळ, आंबा अशी शाकाहारी वन्यजीवांची खाद्याची झाडं तोडल्यामुळे या सर्व जीवांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला. यात वटवाघळं, पक्षी, माकडं, वानरं, हरणं असे अनेक वन्यजीव शेतीकडे आकर्षित होऊन आपली खाद्याची जागा शेती म्हणून पाहू लागले.

शाळेतील मुलांना कचरा म्हणजे झाडांची वाळलेली पानं, गवत असं चुकीचं शिक्षण दिलं जात आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे. कारण हीच वाळलेली पानं, फुलं, गवत हे वनस्पती स्वत:साठी खत म्हणून निर्मिती करतात. प्रत्येक झाड एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाही म्हणून आपल्याच अंगावरील पाने गाळतात आणि त्याचा वापर स्वत:च्या वाढीसाठी करून घेतात.

अर्थात शेती आणि शेतकरी अशी अतिशय बिकट असलेली परिस्थिती आणि संघर्ष फक्त सामान्य शेतकºयाच्या वाट्याला येऊ लागल्या, आणि संघर्ष वन्यजीवांना संपवण्यापर्यंत पोहोचला आहे. आपण सर्व जण एकच चांगलं काम करू शकतो ते म्हणजे आपल्या भागातील जैवविविधता आहे तशी नैसर्गिकरीत्या जोपासणं. सर्वात जास्त बहुपयोगी असलेला वड, आपल्या भारताचं राष्ट्रीय झाड म्हणून ओळखलं जातं. दिवसातील जास्त वेळ व मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन देणारं झाड असून वटपौर्णिमा साजरी करण्याचं मोठं कारण म्हणजे हा जीवनदायी वृक्ष आहे. अनेक समाजांत अशी समजूत आहे की, प्रत्येकाने किमान दोन तरी वड लावलेच पाहिजेत म्हणजे घडलेल्या पापांचं परिमार्जन होतं. सूरपारंब्याचा खेळ लहानपणी खेळणारे आपण, यापुढे किमान आपापल्या गावात एक तरी वड लावला पाहिजे.

Web Title: Literacy should increase in relation to native tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.