वारकऱ्यांचा आधार, वाळूमाफियांचा कर्दनकाळ; भेटा सोलापूरच्या 'सिंघम'ला

By राजा माने | Published: June 20, 2018 12:31 AM2018-06-20T00:31:42+5:302018-06-20T12:32:26+5:30

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...

Khaki's uniform also includes 'Prabhu' ... | वारकऱ्यांचा आधार, वाळूमाफियांचा कर्दनकाळ; भेटा सोलापूरच्या 'सिंघम'ला

वारकऱ्यांचा आधार, वाळूमाफियांचा कर्दनकाळ; भेटा सोलापूरच्या 'सिंघम'ला

Next

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...
पोलीस आणि खाकी वर्दी या विषयीची मते व्यक्तिपरत्वे बदलतात. खाकी वर्दीतल्या माणसाशी मैत्रीही नको अन् पंगाही नको असे म्हणणारे आपल्याला पदोपदी भेटतात. पोलिसांविषयीच्या अशाच मतप्रवाहांना छेद देण्याचे काम सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. विरेश प्रभू या अधिका-याने आपल्या कर्तबगारीने केले आहे.
महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणा-या लाखो वारक-यांच्या आगळ्यावेगळ्या सेवेनेच प्रभू यांनी आपल्या वेगळेपणाची सोलापूर जिल्ह्याला झलक दाखविली. केवळ बडगा आणि अरेरावीची भाषा असेल तरच गर्दीला शिस्त लावता येते हा समज त्यांनी मोडून काढला.
पोलीस कर्मचा-यांमधील समन्वय राखत असताना त्यांचा उत्साह जतन करणारी कार्यपद्धती त्यांनी आषाढी वारी बंदोबस्त नियोजनात अवलंबिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पंढरीत दाखल होणा-या प्रत्येक वारक-याला शहरातील प्रवेशापासून दर्शन रांगेत आनंदाने थांबून शिस्तबद्ध दर्शनाची नैसर्गिक सवय लावली.
आषाढीसारख्या उत्सवात पोलीस केवळ बंदोबस्तातच न राहता त्याचा येणा-या वारक-यांशी संवादही झाला पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला. त्या प्रयत्नाला व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यासाठी वारक-यांना विरंगुळा व करमणुकीबरोबरच ग्रामविकासाचा नवा विचार देणारे समूह विकसित केले. हे समूहच आषाढी वारी कालावधीत वारक-यांशी नाते जोडण्याचे काम करीत असतात.
सोलापूर जिल्ह्याला धार्मिक-अध्यात्मिक तसेच स्वातंत्र्य समृद्ध चळवळीची जशी परंपरा आहे तशीच दुर्दैवाने गुंडगिरी टोळ्या आणि त्यांच्या कारवायांची देखील अनिष्ठ परंपरा आहे. ही परंपरा खंडित करण्याचे ऐतिहासिक काम प्रभू यांनी केले, याबद्दल सोलापूरकरांना त्यांचे विशेष कौतुक वाटते. तीन वर्षांच्या कारकिर्दीसाठी जिल्ह्यात येणा-या अधिका-यांना गुंड आणि त्यांच्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची इच्छा नसते.
प्रभू यांनी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांना शिस्तबद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत जेरबंद केले. ७४ लोकांवर मोक्कासारखी कारवाई करतानाच १५५ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची हिंमत दाखविली. त्याचाच परिणाम म्हणून सामान्य माणसापासून ते पोलीस दलातील प्रत्येक सदस्याचे मनोबल उंचावले.
एकीकडे अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावत असताना दुसरीकडे ग्रामीण विकासाचा नवा कृतिशील विचार खाकी वर्दीत त्यांनी रुजविला. ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव दत्तक योजना’ यासारखा पोलिसी संस्कृतीच्या बाहेरचा उपक्रम हाती घेतला. पोलीस अधिकारी भुजंग तथा नाना कदम यांच्या माध्यमातून उपरोक्त दत्तक योजना गतिमान केली. ग्रामसभा घेणे, शिक्षण आणि आरोग्यविषयी प्रबोधन करणे, जलयुक्त शिवार योजनेसह ग्रामविकासाला पायाभूत ठरणाºया उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम कदम यांनी केले.
गाव समाधानी राखण्याचा प्रयत्न करीत असतानाच प्रभू यांनी वाळू माफियांच्याही मुसक्या आवळल्या. तब्बल ३४ कोटी रुपयांची अवैध वाळू हस्तगत केली. अशी कामे करणारा हा माणूस खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’च नाही काय?

Web Title: Khaki's uniform also includes 'Prabhu' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.