विजेच्या महागाईवर बचतीचा तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:48 AM2018-12-14T04:48:40+5:302018-12-14T04:48:59+5:30

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनात देशभरातील नागरिकांना हातभार लावण्याचा निर्धार आजच्या जागतिक ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने करावा लागेल.

how to save electricity and money | विजेच्या महागाईवर बचतीचा तोडगा

विजेच्या महागाईवर बचतीचा तोडगा

googlenewsNext

- अशोक पेंडसे

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनात देशभरातील नागरिकांना हातभार लावण्याचा निर्धार आजच्या जागतिक ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने करावा लागेल. सर्वांना ऊर्जेच्या दोन मुख्य स्रोतांमध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो. एक म्हणजे आपल्या वाहनांना लागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात कपात. कारण मुख्यत: पेट्रोल आणि डिझेलसाठी लागणारे तेल हे आयात केले जाते. फारच थोडे तेल भारतातून मिळते. त्यामुळे आपण जर यात कपात केली तर भारताचे इतर देशांवरील तेलासंबंधीचे अवलंबित्व कमी होईल.

दुसरे म्हणजे विजेचा कमी वापर. भारतात मुख्यत: कोळसा जाळून वीज निर्माण केली जाते. या कोळशामुळे होणारी आणि गाड्या व दुचाकीच्या वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही सगळ्यात जास्त असते. त्यामुळे पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी याने मदतच होईल. वीज कमी वापरल्याने वीज ग्राहकाचा कसा फायदा होईल, हे एका लहानशा उदाहरणाने समजून घेऊया. महावितरण कंपनीला सर्व वीजग्राहक स्थिर आकार देतात. त्याशिवाय विजेच्या वापराप्रमाणे उर्वरित पैसे महावितरणला पुढील दरानुसार देतो. ०-१०० युनिटसाठी ४.३० रुपये, १०१-३०१ युनिटसाठी ७.९९, ३०१-५०० युनिटसाठी १०.९४ तर ५०१ पेक्षा अधिक युनिटसाठी १२.४३ दर आहे. समजा एखाद्या ग्राहकाने शंभर युनिट एवढी वीज वापरली तर त्याला ४३0 रुपये बिल येईल. परंतु जर का त्याने तीच वीज १३० युनिट एवढी वापरली तर त्याला ४३० अधिक २४०, असे एकूण ६७० एवढे बिल येईल. म्हणजेच थोडी जरी जास्त वीज वापरली तरी त्याचे बिल ५५ टक्क्यांनी वाढते. याचे कारण म्हणजे शून्य वापरापासून जसजसा वापर वाढतो. त्याप्रमाणे विजेचा दर वाढता जाणारा आहे. पहिल्या टप्प्याच्या सुमारे तिप्पट दर हा चौथ्या टप्प्याला आहे. तात्पर्य वीजबचत म्हणजे वीजबिल कमी करण्याचा हुकमी मार्ग.

वीजबिल मुख्यत: दोन-तीन प्रकारांनी कमी करता येईल. एक म्हणजे कमी वीज लागणारी उपकरणे वापरणे. अर्थात याची किंमत जास्त आहे. परंतु वीजबिल कमी झाल्यामुळे वर्षा-दोन वर्षात वाढीव किंमत वसूल होते. पूर्वी वापरत असलेल्या आपल्या पिवळ्या दिव्याऐवजी आता एलईडी दिवा वापरणे हे फायद्याचे आहे. पूर्वीच्या साठ व्हॅटच्या दिव्याच्या उजेडाइतकाच एलईडीच्या नऊ व्हॅटच्या दिव्यापासून प्रकाश मिळतो. याची किंंमत सुमारे १२० ते १५० रुपये आहे. जुन्या पंख्यांना सुमारे ७५ ते ८० व्हॅट वीज लागत होती. त्यातून सुधारणा झालेले पंखे साधारण: ४५ ते ५० व्हॅटवर चालत आहेत. हजार रुपयांऐवजी बाराशे ते चौदाशे रुपयांपर्यंत हा कमी व्हॅटचा पंखा मिळू शकतो. आणखी कमी व्हॅटचे पंखे बाजारात आले आहेत. याची किंमत सुमारे २८०० रुपये आहे. परंतु हे पंखे सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यांचे व्हॅटेज वीस ते पंचवीस एवढेच आहे.

जुन्या प्रकारातल्या एसीमध्ये तापमान वाढले की कॉम्प्रेसर सुरू होतो. तापमान थोडे वाढले तरी कॉम्प्रेसर पुर्ण शक्तीनिशी सुरू होतो. सध्या आलेल्या इन्व्हर्टर एसीमध्ये थोडेसे जरी तापमान वाढले तर कमी शक्तीने कॉम्प्रेसर सुरू होतो आणि त्यामुळे वीज वाचते. अशा पद्धतीचा इन्व्हर्टर फ्रीज वापरल्याने वीज कमी लागेल. एसीमध्येसुद्धा अशाच पद्धतीचे इन्व्हर्टर एसी असतात. त्यामुळे विजेची बचत होते. पाणी तापविण्यासाठी गिझर किंवा स्टोरेज टाइप गिझरचा वापर केला जातो. स्टोरेज टाइप गिझर म्हणजे आणि त्याची पाण्याची टाकी बरोबर असली तरी विजेची बचत होते.

दुसरा भाग म्हणजे आपल्या सवयींमध्ये बदल करून वीज वाचविणे. सध्या बहुतेक ठिकाणी रिमोट कंट्रोलचे टीव्ही असतात. रिमोट कंट्रोलने जरी टीव्ही बंद केला तरी त्याचा मेन स्वीच म्हणजे मुख्यत: टीव्ही जेथून जोडलेला असतो ते बटण बंद केले नसल्याने विजेचा थोडा तरी वापर सुरूच राहतो. आणि हा एवढा थोडा वापरसुद्धा २४ गुणिले ३६५ दिवस सुरूच राहतो. त्यामुळे टीव्ही मुख्य बटणाने बंद करा. असाच प्रकार आपण मोबाइल चार्जिंगमध्ये करतो. जरी मोबाइल चार्ज होत नसला तरी मुख्यत: बटण बंद केले जात नाही. ते करणे गरजेचे आहे.

फ्रीजचा दरवाजा अधिक वेळ उघडा राहिला तर तापमान बरेच वाढते. अर्थात त्यामुळे दरवाजा बंद झाल्यानंतर तापमान खाली आणण्यासाठी फ्रीजकडून मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर केला जातो. यावरील उपाय म्हणजे फ्रीजचा दरवाजा उघडण्याधी आतमध्ये ठेवायच्या वस्तू हाताजवळच ठेवा. त्यामुळे दरवाजा कमीत कमी वेळ उघडा राहील. तसेच कुठलीही गरम वस्तू फ्रीजमध्ये न ठेवता ती बाहेर ठेवून थंड करा आणि मगच फ्रीजमध्ये ठेवा. दरवाजा कमी वेळा उघडा आणि उघडल्यानंतर कमीत कमी वेळ उघडा ठेवा. एसीमध्ये २४ अंश सेल्सिअस एवढेच तापमान ठेवा. तसेच त्याचा फिल्टर नेहमी स्वच्छ असल्याची काळजी घ्या.

वीज २४ तासांत कधी वापरतो त्यावर विजेचा दर अवलंबून असतो. कमाल वीज मागणीच्या ऐवजी किमान मागणीच्या वेळेत वीज वापरली तर साहजिकच दर कमी होईल. अशा सूत्रांच्या मदतीने सर्व वीज ग्राहक विजेचा वापर कमी करू शकतील.

(लेखक वीज तज्ज्ञ आहेत)

Web Title: how to save electricity and money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज